Saturday 19 March 2016

तेलबैला वाघजई घाट सुधागड सवाष्ण घाट तेलबैला - ऊन्हाळ्यातील कसदार भटकंती - भाग दुसरा.









“यूहीं नही लाखो हसते हसते सुलीं चढे यहॉं पे, 

तेरा जलवा ही कुछ और है !"


सह्याद्रीमध्ये भटकंती करताना येथल्या ऊजाड अवशेषांच्या रोमारोमात भरलेल्या ऐतिहासिक क्षणांची अशी प्रचिती खरया शिवप्रेमीला नक्की येते.सुधागडचा परिसर असाच अनेक रोमहर्षक आणि महत्वाच्या ईतिहासातील क्षणांनी संपन्न आहे.अकबराची पायथ्याची छावणी असो की अष्टप्रधान मंडळींच्या शंभूराजांच्या विरोधातील कारस्थाने असोत, गैरसमजातून त्यापैकी काहींचा देहदंड असो किंवा भोरच्या पंतसचिवांची संपन्न राजधानी म्हणून अनुभवलेले क्षण असो, राजांनी राजधानी म्हणून केलेली पाहणी असो की हिरोजी ईंदुलकरांनी केलेले महाद्वाराचे बांधकाम असो, भृगू ञूषींची समाधी असो अशा अनेक परिचित अपरिचित घटनांची साक्षीदार असलेली ही भूमी बारकाव्यासह भटकण्यासाठी माझ्या भटकंतीच्या कार्यक्रमात नोंदवून सुधागड निरोप घेण्याची वेळ झाली.




कालचा दिवस ईतर आम्ही आजमावलेल्या घाटवाटांच्या तुलनेत साधारण भासणारया पण ऊन्हामुळे आणि दमटपणामुळे कस बघणारया भटकंतीमुळे आज सर्व जण ऊन टाळण्याच्या मनस्थितीत असल्याने सुधागड गडफेरी रद्द करून लवकरात लवकर सवाष्णच्या मार्गाला लागण्याचे निश्चित करण्यात आले.सुधागडचा एकंदर ईतिहास बघता ईथे आमची पावले पुन्हा वळणारच यात शंका नाही.सर्व जण 7 वाजता तयार होऊन पुन्हा महादरवाजाची वाट जवळ केली.तत्पूर्वी सुधागडहून चौफेर दिसणारा नजारा मनात साठवला.एकीकडे घाटाच्या बाजूने तेलबैला नंतर घनगड ,केवणीचे पठार ,त्यामागे अंधारबन संपल्याठिकाणच्या नागशेत घाटवाटेपर्यंत पोहचलेली अजस्र डोंगररांग, दुसरीकडे खाली कोकण सरसगड पाली परिसर असा 360 डिग्रीचा भारीच असा पॅनेरमा!


ऊगवतीच्या प्रकाशात तेलबैला घनगड अतिशय सुंदर भासत होते.पण तोच सूर्यनारायण वर आल्यावर कसे रौद्र रूप धारण करतो याची चुणूक असल्याने लवकर पावले ऊचलली जावू लागली आणि थेट महादरवाजा ऊतरून खाली तानाजी टाक्यापाशी पावल पाणी भरण्यासाठी विसावली.पाण्याच्या बाटल्या भरताना थोडा पोटोबा ऊरकला पुन्हा पोटभर पाणी पिऊन एका बाटलीत जलजीरा लिंबू साखर यांचे मिश्रण टाकून झकास सरबत करून बाटली भरून घेतली.







परत मारूती मंदीरापासून आल्या वाटेन खाली ओढ्याच्या ठिकाणापर्यंत कालचीच वाट होती.वाटेत सकाळच्या आल्हाददायक वातावरणात संचार करणारे अनेक पक्षी दिसले.त्यात गोल्डन ओरीयल ( हळद्या), एशियन पॅराडाईज फ्लाय कॅचर ( स्वर्गीय नर्तक), कॉपरस्मिथ बार्बेट ( तांबट) असे वैविध्य होते.अनिकेतने त्यातले काही त्याच्या कॅमेरात टिपले. मग खालच्या ओढ्यात सर्व येईपर्यंत विसावलो.



आमचे वाटाडे काका आणि अर्जुन, मुकुंद थोडे पुढे गेले.मग सर्व आल्यावर पुन्हा ओढा ओलांडून ऊजव्या हाताच्या टेकडीला भिडलो.काल आलेल्या मार्गाच्या ऊजवीकडे सवाष्णला भिडणारी वाट चालू होते.





त्यात ओरिएंटेशच्या अंदाजाने काही भिडू जल्लोषात खाली जंगलात घुसले.आम्ही डोंगरधारेने आणि ते खालून मग आवाज देत देत थोडे थांबून वरच्या एका पठारावर ते येऊन मिळाले.




वाटेत सावरीचा कापूस पसरलेला.मग बालपणीची आठवण झाली आम्ही घरासमोरच्या सावरीच्या शेंगाना दगड मारून हवेत ऊडणारा कापूस पळत गोळा करायचो.ईश्वरकाकांना आणि मला नमुना म्हणून थोडा कापूस गोळा केला आणि पुढे निघालो.वर पठारावर ईश्वरकाकांची आणि माझी वाट पहात असणारे सर्व मग झाडाखाली विसावलो.




आता पुढे जंगलात घुसणारा रस्ता बघून थोडे जवळ आले असे वाटले.पण आता तर खरी ऊभी चढण सुरू झाली.पण जंगल असल्याने ऊन कमी लागत होते.मग आणखी एक टप्पा पार केला तर पुढे अजून एक मोठा टप्पा दिसला.अशा खड्या चढाईचा एक फायदा असा असतो की प्रत्येक पाऊल तुम्हाला एक फूट तरी वर घेऊन जाते त्यामुळे थोडा दम लावला तर कमी वेळात आपण वर सरकतो.अर्थात ऊन कमी असले तर जास्त दम नाही लागत पण कोकणाकडून वर चढताना ऊंचीमुळे वातावरणात होणारा बदल जाणवणारा असतो.



शेवटच्या कातळटप्प्याला लागल्यानंतर सुधागड आणि मागे केवणीचे पठार सुंदर दिसत होते.



खाली जंगलही घनगर्द भासत होते.



मग वर एका झाडाखाली विसावलो.पाणी प्यालो.कालपासून आम्हाला साथ करणार्या खंड्यालाही आमच्या ऩाशिककर साथीदाराने पानाच्या द्रोणातून पाणी पाजले.हा खंड्या बिस्कीटांकडे ढूंकूनही न पाहणारा पण सकाळी मुकुंदने दिलेल्या पोळ्या त्याने खाल्ल्या आणि आता पाणी प्याला.



हळूहळू सर्व भिडू कातळटप्पा पार करत पठाराला आले.





आमचीही बरयापैकी विश्रांती झाली होती.मग सॅकऊचलून वरच्या पठारावरची तेलबैलाच्या मागची वाट चालायला सुरूवात केली.मध्येच फोटोग्राफी चालू होती.तेलबैलाच्या कातळभिंतींचे अजस्र रूप डोळ्यात साठवत मार्गाक्रमण चालू होते.



कॅमेराने बॅटरी एक्झॉस्टचा मेसेज दिला आणि वरच्या तळपत्या सूर्यनारायणाने माझी बॅटरी एक्झॉस्ट करण्याच्या आत तेलबैला गाठण्यासाठी कॅमेरा सॅकमध्ये कोंबला आणि सुटलो ते थेट रोकडेंच्या अंगणातच थांबलो.तिथे फ्रेश होऊन कपडे बदलेपर्यंत अर्जुन आणि मुकुंद पण पोहचले.मग आणखीकाही भिडू पोहचल्यावर जेवण तयार असल्यानेआणि एकदम 16 जणांना वाढावे लागू नये म्हणून भोजन ऊरकले.मग आरामात ताणून दिली.एवढ्या श्रमानंतर पण संदीप काकड आणि एक भिडू तेलबैला मंदीरात जाऊन आले.मग सगळ्यांची जेवण आटोपेपर्यंत मस्क पातेलेभर जलजीरा, लिंबू, साखर यांचे सरबत बनवले व सर्वांना मनसोक्त पाजले.


मग आवराआवरी करून नाशिककरांचा आणि ईश्वरकाकांचा निरोप घेऊन समाधानाने गाडी लोणावळामार्गे पुण्याकडे दामटली.

मागे वळून बघताना माझ्या घाटवाटांच्या अविस्मरणीय प्रवासात अजून दोन कसदार घाटवाटा जोडल्याचे समाधान होते.असे धाडस  ऊन्हाळ्यात करणारे जे काही मोजके आहेत  त्यांना माझ्या समाधानाचा अर्थ लवकर समजेल.

ट्रेक दिनांक :   फेब्रुवारी 2016

साथीदार : संजय अमृतकर, डॉ.अतुल साठ्ये, संदीप काकड आणि जल्लोष ग्रुप नाशिक
ईश्वरकाका गायकवाड, प्रशांत कोठावदे, मल्लिकार्जन श्रीशेट्टी, अनिकेत नेमाडे, मुकुंद पाटे आणि मी पुणे.

श्रेणी : मध्यम, ऊन्हाळ्यात कठीण.

पाणी : सुधागड तानाजी टाक्यानंतर थेट तेलबैला गाव.मध्ये पाणी नाही.सवाष्ण घाटात पाणी नाही.

धन्यवाद मित्रांनो भेटू लवकर नवीन आडवाटेसह!

Wednesday 9 March 2016

"तेलबैला - वाघजाई घाट - सुधागड - सवाष्ण घाट- तेलबैला" उन्हाळ्यातील कसदार भटकंती : भाग 1









मागच्या वेळी कधीतरी घनगड आणी तेलबैला ट्रेक करताना रोकडे यांच्या घरी पडवीत रात्री पथारी पसरून विसावताना सहज प्रशांतशी चर्चा करताना सुधागाडचा विषय निघाला होता.त्याने आधी एकदा सुधागड केला असल्याने परत नुसता सुधागड करण्यापेक्षा आपण घाट वाटेने सुधागड करूयात अशी चर्चा झाली होती.पण आमची भटकंती आता थोडी पुढच्या पायरीवर गेली असल्याने नुसता एखादा गड किंवा घाट वाट करून मन भरत नाही तर ऐतिहासिक संदर्भ आणी त्या भागाचे महत्व लक्षात घेऊन कधी जुन्नर  भाग, कधी जावली, तर कधी भोर अशी त्या त्या ठिकाणचा पूर्ण कॅलिडोस्कोप उलगडत  भटकंती चालू आहे.गुरुवर्य नानांच्या मार्गदर्शनाखाली सह्याद्री मधील  अनेक सुंदर पण रौद्र  घाट धुंडाळून ते पादाक्रांत करण्याचा मानस आम्ही ठेवलाय.



अशातच ऊन्हाळी ट्रेक आणि कोकणातून वर येणारया घाटवाटा कशा कसदार असतात आणि अशा वातावरणात सह्याद्रीच्या बेलाग कडेकपारी सर करण्याचा आणि थकलेल्या शरिराला घाटावरच्या वारयाचा स्पर्श होताना काय अवर्णनीय आनंद असतो तो असा सुखाचा जीव दुखा:त टाकायला एका पायावर तयार असणारया थोड्या वेड्यांनाच विचारा!



मग असाच बरेच दिवस पुढे ढकलत असलेला तेलबैला सुधागड ट्रेक करायचा ठरले आणि नाशिक पुणे सह्य मित्रमंडळाचे 15 वेडे आणि असाध्य आजाराशी दोन हात करून विजयी होत परत सह्याद्रीच्या सेवेत रूजू होणारे चिरतरूण ईश्वरकाका गायकवाड यांच्या सहभागाने मोहीमेचे बिगुल वाजले.



तारीख ठरली 27 / 28 फेब्रुवारी.तेलबैल्याच्या पायथ्याशी मुक्काम करायचा आणि शनिवारी सकाळी लवकर तेलबैला पाहून वाघजई घाटाने ठाणाळे येथे ऊतरून घोणसेकडून महादरवाजाने सुधागड गाठायचा, गडफेरी करून मुक्काम करायचा आणि दुसरया दिवशी सुधागड ऊतरून, सवाष्ण घाट चढून तेलबैला परत येऊन ट्रेक संपवायचा असा कार्यक्रम पटलावर होता.
अर्थात आता कुठलाही गड किंवा कुठलीही वाट कशी वाट लावू शकते याचा बराच अनुभव जमा होतोय .
त्यामुळे जरी आम्ही पुणेकर आणि ईश्वरकाका रात्री तेलबैलाला पोहचून आराम करून शनिवारी जागे झालो तरी नाशिककर पोहचले नव्हते त्यावेळीच आता ऊन्हामुळे त्रास होतोय का याची शंका मनात आली आणि म्हणून नाशिककर पोहचल्यावर नाष्टा चहा करून तयार झाल्यावर तेलबैला आल्यावर करू असा प्रस्ताव मांडला व तो मान्य झाला.
स्थानिक वाटाड्या म्हणून तेलबैलाच्या एका 65 वयाच्या काकांना रोकडेंनी बरोबर दिले.सगळे तेलबैल्याच्या कातळभिंतींना डावीकडे ठेवत साधारण 8.30 वाजता वाघजई घाटाकडे मार्गस्थ झालो.साधारण अर्ध्या तासातच कोकणाच्या पाली बाजूकडून खाली ऊतरणारया वाघजई घाटाच्या तोंडाला पोहचलो.



ऊतरणारी वाट ईतर घाटांच्या तुलनेत फार सोपी वाटली म्हणजे एकदम कड्यातून 80 डिग्री ऊतरणारी कोंडनाळ असो की ठिपठिप्याचा प्रवेश असो त्या तुलनेत सामान्य म्हणता यावी अशी! थोडा टप्पा ऊतरल्यावर वाघजईचे ठाणे लागले.



घाट सोडून डावीकडे मंदीर आहे.मंदीरात दर्शन घेऊन परत वाटेवर आलो.



परत टप्प्या टप्प्याने ती खालच्या डोंगरधारेला ऊत्तरेकडे थोडे घेऊन गेली मग यु टर्नने परत दक्षिणेकडे वळली.



 तेथे खडकातील कोरलेले पाण्याचे टाके लागले.कुठल्याही घाटवाटेच्या पुरातन वापराची खूण म्हणजे असे पाणवठे!




थोडे पुढे ऊतरताना दगडात कोरलेल्या रूंद पायरयांचे दोन तीन टप्पे आहेत.



तिथे एका खडकावर थोडे विसावलो.



ठाणाळे लेणींची चौकशी करताना त्याची वाट वर मंदीरापासून जाते अशी ऊपयुक्त माहीती आमच्या वाटाड्यान दिली पण आता खाली ऊतरल्यान थोड नाराज होण्यापलिकडे काही करू शकत नव्हतो.




आणखी काही वेळाच्या चालीनंतर आम्ही ठाणाळे गावात पोहचलो.



तेथे पाणी थांबा घेतला व स्थानिकांनी जंगलातून सुधागडकडे जाणारी वाट समजावली.त्यामुळे बहिरामपाडा न जाता आम्ही महादरवाजाच्या वाटेला पोहचू अस सांगितल.सकाळचे 11 वाजले होते आणि कितीही टाईमपास झाला तरी साधारण 4 तासात गडावर पोहचू असा माझा कयास होता.त्याप्रमाणे जंगलात शिरलो.



पण थोडे अंतर गेल्यावर कुठलीही मळलेली वाट दिसेना मग अंदाजाने गडाच्या दिशेने चालणे चालू ठेवले.पण ऊन वाढताच पाण्यासाठी थांबे वाढले.आणि वाट ठळक नसल्याने सर्वांचा वेग मंदावला.साधारण 40 डिग्री तापमान आणि भयंकर ऊकाडा याने आता आम्हा घाटावरच्या लोकांना जेरीस आणायचे ठरवले असावे बहुतेक.जोर लावून दोन टेकड्या पार केल्या.



 पण सगळे एका चालीने चालणे बंद झाले आणि तळपत्या ऊन्हात वाट बघण्यापेक्षा दुसरा ऊपाय ऊरला नाही.अशावेळी पाण्याचा मोठा आधार असतो पण यावर्षी पाऊस नसल्याने सगळे ओढे नाले कोरडे खट्ट! तरी मागचे नजरेच्या टप्प्यात आल्यावर थोडे पुढे सरकत होतो.तरी गडपायथा अजून किती वेळ लागेल समजेना.आता मला चिंता लागली की पाणी संपले तर अशा ऊकाड्यात फारच कठीण परिस्थिती होईल कारण पाणी थेट गडाच्या तानाजी टाक्यावर! पण आमच्यातल्या दोघांची परिस्थिती अवघड झाली ते बसल्यावर ऊठायला तयार होईनात.अशा निष्पर्ण जागी बसण्यापेक्षा थोडे पुढे गडाच्या घेरयात सावलीत बसू हा माझा आग्रह पूर्ण करण्याची शक्ती त्यांच्यात ऊरली नव्हती.




डॉ.साठ्येनी पल्स चेक केली ती 140 दोघांची! ते म्हटले की हे सनस्ट्रोक किंवा सिवीयर डीहायड्रेशनचे लक्षण आहे.ऊपाय पाणी पिणे आराम करणे मग एकमेव हिरव्या झाडाखाली जेमतेम 7/8 लोक बसतील अशी सावली मग त्यांना बसवून पुढे काही लोक सावलीच्या शोधार्थ निघालो.एक टेकडी ऊतरून नदी पात्र ओलांडून सावलीची झाड होती खरतर 15 मिनीटांवर पण ते लोक आवाजाला ऊत्र देईनात मग आम्ही त्या झाडांखाली विसावलो.जेवणाचे डबे काढले व भोजन केले. थोडी वामकुक्षी घेतली.




आता 4.15 वाजलेले तरी मागचे लोक येईनात.मग ऊन्हाची चिंता न करता मागे गेलो तर ते तिथेच पहुडलेले मग विनवणी करून तयार झाले व थोडे पुढे थांबू अशा आश्वासनावर निघालो.माझ्याजवळ तसेच ईतरांजवळ पाणी संपत आले होते.आणखी जड पावलांनी सर्व मार्गस्थ झाले.थोडे चढून दोन ओढ्यांचे मार्ग ओलांडल्यावर घेरयाचे जंगल चालू झाले.




आता तंदुरूस्त असणारया जल्लोष ग्रुपच्या संदीप काकड व कंपनीला विनंती केली की तुम्ही वर जा गरज पडली तर पाणी घेऊन खाली यावे लागेल.थोड्या अंतरावर रस्त्यातच एक विरगळ लागली.



पुढे 10 मिनीटात मारूती मंदीरापाशी पोहचलो.



तिथे वरून आवाज आला की येथे पाणी आहे.खर सांगतो खूप टेंशन कमी झाले कारण आता हे अंतर खूप कमी होते आणि प्रोत्साहित करून वर आणलेल्या एकाला आता तेथे पोहचणे सोपे होते.मारूती मंदीरासमोर पायरयांचा मार्ग होता.



थोडे वर गेल्यावर थंडगार आणि निर्मळ पाण्याचे सह्याद्री मिनरल वॉटरचे तानाजी टाके लागले.हाततोंड धुवून दोन लि पाणी प्यालो थांबून.सर्व एकदम परत नॉर्मल झाले.पाण्याचे महत्व लक्षात आणून देणारा अजून एक अनुभव गाठीशी जमा झाला.



फ्रेश होऊन वर जाताना दगडगोट्यांनी ढासळलेली वाट व भग्न दरवाजाचे दोन टप्पे लागले.




चढाई ऊभी आहे.वर जाऊन सूर्यास्त अनुभवण्याचा प्रयत्न म्हणून एका दमात दुसरया दरवाजापाशी पोहचलो.वर डाव्या हाताला अजून एक टाके आहे.



पण अजून किती चढावे लागेल याचा अंदाज नव्हता.मग बसलो आणि थोडे खाल्ले पाणी प्यालो.सायंछायेत असा एकांत फार गुढरम्य होता.




15 मि नंतरही खालचे भिडू येईनात मग परत वर निघालो.आणि पाच मिनीटात महादाराचा बुरूज दिसला.



अप्रतिम! राजगड रायगड यांचा महादरवाजा बांधणारया हिरोजी ईंदुलकरांची कमाल कारागिरी पहावी अशीच.महादरवाजा पाहून सुधागड हा महत्वाचा गड होता आणि सुरूवातीला महाराजांनी राजधानीसाठी याचा विचार केला होता आणि नंतर भोरच्या पंतसचिवांची ही राजधानी होती हे पटते.



तेथे सर्व पोहचेपर्यंत आराम केला आता 6.30 वाजले होते.मग पंधरा मिनीटात सर्व आल्यावर अंधाराच्या समयी सुधागड पठाराच्या मंदीरात पोहचलो.



मग पंतसचिवांच्या वाड्यात जाऊन स्वयंपाकाची तयारी केली.संदीपभाऊ आणि जल्लोष ग्रुपने मुकुंद आणि अर्जुनच्या साथीसह अर्ध्या तासात चविष्ट खिचडी चुलीवर बनवली ती सर्वांनी भरपेट हाणली आणि मुंबईच्या ईतर ग्रुपची वर्दळ टाळण्यासाठी मुक्कामी परत भोराईच्या मंदिरात पोहचलो.डॉ.साठ्येंनी गडाविषयी ऊपयुक्त ऐतिहासिक माहीती दिली.आणि पावसाळ्यातला त्यांचा गडावरचा अनुभव कथन केला.मग सर्व शांत झोपी गेले.मला झोप येईना मग बाहेर गडपुजनासाठी खालून आलेल्या सह्यमित्रांशी हितगुज करून 1 च्या सुमारास भोराई मातेच्या छत्रछायेत निद्राधीन झालो.



भाग एक समाप्त.

भेटू दुसरया सुधागड ते तेलबैला  सवाष्ण घाटाच्या भटकंतीत.

सह्य साथीदार:  

 प्रशांत कोठावदे, मुकुंद पाटे, अनिकेत नेमाडे, मल्लिकार्जुन आणि ईश्वर काका गायकवाड पुणे टीम.

संजय अमृतकर, डॉ.अतुल साठ्ये, संदीप काकड आणि जल्लोष टीम, नाशिक.

भाग एक:  पुणे ते तेलबैला आणि तेलबैला ते सुधागड वाघजई घाटमार्गे.

श्रेणी:  ऊन्हाळ्यात खडतर.पावसाळ्यात मध्यम.पाणी 3/4 लिटर स्टॉक ऊन्हाळ्यात जरूरी.

वेळ:  7/8 तास पावसाळ्यात.ऊन्हात 10 तास.

पाणी:  पिण्यायोग्य तेलबैलानंतर ठाणाळे गावात.नंतर बहिरामपाड्यात खाली किंवा गडावर तानाजी टाके.मध्ये पाणी नाही.