Friday 31 March 2017

राजधानीच्या दक्षिणटोकाच्या सर्वांगसुंदर वाटा - सुपेनाळ - गोप्याघाट!


मी झुले मस्तीत माझ्या! भोवती आभाळ नाचे!
संपला अंधार येथे...तेजही येथे निमाले
 - सुरेश भट


 सुरेश भटांच्या ह्या ओळींची अनुभूती सह्याद्रीच्या ऊंचच ऊंच कड्यांमध्ये अन दुर्गम दरयाखोरयात स्वच्छंद भटकंती करणारया प्रत्येक भटक्यास येते.अशाच ह्या सह्याद्रीतील असंख्य लपलेल्या घाटवाटांपैकी अजून दोन धमाल घाटवाटांच्या भटकंतीचा अनुभव आपल्यासाठी!

राजगड आणि रायगड ह्या स्वराज्याच्या दोन बुलंद राजधान्या जोडणारया अनेक वाटांपैकी घाटमाथ्यावरून सर्वात दक्षिणेच्या टोकाच्या वेळवंड खोरे आणि शिवथर खोरे यांना जोडणारया दोन  वाटांची भटकंती करण्याचे नियोजन होते त्याला निमित्त झाले ते सह्यमित्र आणि प्रसिद्ध ब्लॉगर साईप्रकाश बेलसरेच्या नुकत्याच प्रसिद्द झालेल्या सुंदर ब्लॉगचे! तसेही भटकंतीचे वेड स्वस्थ बसू देत नाही पण कडक ऊन, पाण्याची कमतरता ह्या बाबी लक्षात घेता अशा दुर्गम वाटांच्या नादाला लागताना थोडी अनामिक भितीही असते.अर्थात जबाबदारीने ट्रेक करण्यासाठी तीही आवश्यकच आहे.पण काटेकोर नियोजनाने आता कठीणतेकडे झुकणारे अनेक ट्रेक सहजसाध्य होत आहेत अर्थात आमच्या सवंगड्यांच्या  ऊत्सुकतेला सकारात्मक आत्मविश्वासाची ( अति नव्हे) जोडही यासाठी कारणीभूत आहे.असो!



शनिवारी दुपारी पुण्यातून निघून कापूरहोळ भोर वरुन वरंध घाटाच्या सुरूवातीला ऊजवीकडे सांगवीकडे गाडी एकेरी आणि खडबडीत रस्त्यावर वळवली तेव्हा जवळजवळ ३.३० वाजलेले.साधारण २० कि मी चे अंतर कापायला तासभर लागला.डावीकडे कोकण आणि ऊजवीकडे डोंगररांग अशा ट्रॅव्हर्सचा असा हा वाहतूक तुरळक असणारा मार्ग! ४.३० ला सांगवी गावात शाळेसमोर गाडी लावली आणि गावकरयांना ऊद्या येतो ही कल्पना देऊन ,परत गावाच्या अलिकडे असणारया पोल्ट्री ब्रिडींग फार्मच्या गेटसमोरून पश्चिमेला सुपेनाळेच्या वाटेला लागलो.यावेळी निलेश वाघ ह्याने जानेवारीतच गोप्या सुपेनाळ असा ट्रेक केला असल्याने स्थानिक वाटाड्याची आवश्यकता भासली नाही.



ऊन्ह आता मावळतीला होती.थोडा ऊशीरच झालेला.साधारण अर्ध्या तासात कोकणाच्या दऱ्या खोऱ्याला  भिडणारया कड्यापाशी पोहचलो.खाली मावळतीच्या ऊन्हात शिवथर परिसर एका गुढ अशा सांजप्रकाशात वेढला गेला होता.



दरीला अगदी खेटून एक दगडाची भलीमोठी रास दिसली.घाट ऊतरण्याआधी गावकरी १ दगड घाटदेवतेला वाहतात.ईथूनच थेट ८० अंश कातळाचा आणि नंतर घसारयाचा वळसा पार करून आपण नाळेच्या मुखाशी पोहचतो.बहुतांशी घाटवाटांच्या मार्गावर ऊतरण्यासाठी हे जिगसाँ पझल सोडवणे गरजेचे आहे मग तुम्ही मुख्य वाटेला पोहचता.




तशी ही नाळ पूर्णपणे झाकली गेलेली आहे.गुगलवर तर हिचा अंदाज लावणे कठीणच!



नाळेला लागल्यावर तीव्र ऊतार आणि दगडगोटे पार करत एका टप्प्याला डावीकडे घसारयाची पायवाट लागते.




ती पार करत आपण दुसरया टप्प्याला लागतो.ईथे दगड रचून वाट सुकर करण्याचे प्रयत्न केलेले दिसतात.



मग थोडा अजून दगडधोंड्यांचा मार्ग पार करून खाली एका जंगलात पायवाटेला लागता येते.तस अशा आडवाटेवरचे निवांत पहुडलेले दगडधोंडे ,     पालापाचोळा एखादा धनगर किंवा आमच्यासारखे भटके यांचा पदस्पर्श झाल्यावरच कुस बदलतात पण कधीतरी जाग केल्याचा राग म्हणून चितपटही करु शकतात.



आम्ही साधारण पाऊण तासात ह्या ठिकाणापर्यंत पोहचलो.जंगल पार करताना नाळेचा अंदाज यावा म्हणून एक छायाचित्र घेतले.



ईथून सरळ चाल आम्हास सह्याद्रीच्या वाडीत घेऊन गेली.



ईथे एक लग्नसमारंभाचे जेवण करुन मग शिवथरच्या लोकांसोबत जा असे आग्रहाचे निमंत्रण घळीपर्यंत पोहचायचे असल्याने टाळले.सरळ वाडी पार करुन पुढे निघालो.पण कुठेतरी गफलत झाली आणि वापरती वाट पकडून आम्ही गोप्याची वाट पार करुन जंगलातील आंबे शिवथरच्या वाटेला लागलो.



सूर्य मावळला होता आणि खाली ऊतरायची चिन्हे दिसेनात म्हणून चर्चा करून परत आल्या वाटेने माघारी निघालो.नशीब चांगले म्हणून बरोबर जिथे गोप्यातून खाली शिवथरला ऊतरतो तिथेच वर बोपे गावातील दादा भेटले आणि त्यांनी वाट समजवली.या गोंधळात अंधार दाटू लागला.मग भरभर खाली ऊतरत दोन टेकड्या ऊतरून एका वाडीपाशी पोहचलो.पाणी पिऊन तिथून कसबे शिवथरच्या प्रकाशाच्या दिशेने टाँर्च लावून वेग पकडला.अंधारातच पूल पार करून कसबे शिवथरमध्ये पोहचलो.ईथे समर्थ शिवथरमधील बाबू कदम यांनी घळीच्या डांबरी रस्त्याला लावले.

पाऊण तास अजून चालून शिवथर घळीला पोहचलो तेव्हा रात्रीचे ८.३० वाजलेले.शिवथर घळ म्हणजे श्री समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली भूमी.छत्रपती शिवराय आणि रामदास स्वामींचे नाते विशद करणारे काही पुरावे आहेत की नाही कल्पना नाही पण दोन्ही पुरूषांचे कार्य मात्र असामान्यच!किंबहुना राजाला जेव्हा धर्माचा पाठिंबा असतो तेव्हा त्याचे कार्य अधिक सुकर होते.असो.


पावसाळ्यात ह्या जागेचे सौंदर्य बावनकशी! मोठा कोसळणारा धबधबा आणि धीरगंभीर असे वातावरण असणारी घळ! एकमताने खाली साळुंके काकांना झुणका भाकर जेवणासाठी बनवण्याची विनंती केली.मग तडक सुंदर मठात मुक्कामासाठी जागा मिळते का म्हणून विचारायला गेलो.तेथील काकांनी स्वागत करून मामा काणे हाँलची चावी दिली आणि सकाळी निघण्यापूर्वी चहा प्यायला याच असा प्रेमळ आदेश दिला.टाँयलेट, बाथरूम लाईट ,फँन अशा सर्व अनपेक्षित  सुविधांनी सज्ज अशा दालनात  सुखावत पथारया पसरुन ताजेतवाने झालो.नंतर जेवण करण्यासाठी गेलो.ताक, कोकम सरबत यांनी पाण्याची भरपाई करत यथेच्छ भोजन करून परत आलो. थोडक्या गप्पा करत निद्रीस्त झालो.आजचा दिवस संपूर्ण झाला होता आता ऊद्या गोप्या करून परत सांगवी!

दिवस २ :

रात्री लवकर झोप लागली नाही कदाचित आता एवढ्या सुविधा ट्रेकमध्ये शरिराला मानवत नसाव्यात पण सकाळी लवकर म्हणजे ६ ला ऊठून सर्वांनी आवराआवर केली.ऊशीर झाल्यास तळपत्या ऊन्हात तासाभराच्या चालीला ४ तासही लागू शकतात ह्याची कल्पना असल्यानं सर्व गपगुमान कुरकूर न करता चाललेलं.सर्व तयार झाले अनं चावी देण्यासाठी आणि दर्शनासाठी वर मठात गेलो.



दर्शन घेऊन मग चहा घेतला.व्यवस्थापक काकांचे आभार मानून मठ सोडला.खाली साळुंके काकांनी बनवलेल्या पोह्यांनी दुपारी ऊशीरा जेवलो तरी चालेल एवढे पोट भरले.काल आम्ही आलेली डांबरी सडक सोडून सरळ जवळचा शेतातला मार्ग पकडला.जवळच खडकेश्वर मंदिराचे दर्शन घेतले.अनेक पुरातन समाध्या आणि दगडी बांधकामाचे अवशेष नवीन बांधकामात जागा नसल्याने अडगळीत पडलेले बघून वाईट वाटले.



आता सकाळच्या सोनेरी प्रकाशात कसबे शिवथर



नंतर नदीचा पूल पार करत कालच्याच गोप्या घाटेच्या वाटेला लागलो.



सकाळच्या कोवळ्या ऊन्हात सोनेरी धुलीकण ऊडवत झपझप गोप्या घाटाच्या अलिकडे टेकडीला कधी पोहचलो समजलेच नाही.काल अंधारात चाचपडणारी पावले आज सराईतासारखी कदमताल करत होती.



तसा गोप्याघाट हा स्थानिकांच्या रोजच्या वहिवाटीचा! चांगली मळलेली प्रशस्त पायवाट घाटाच्या मुख्यवाटेपर्यंत असून मुख्य वाटही तशी वळणावळणानी सावकाश वर घेऊन जाणारी.एखादा गावकरी बोजा घेऊन आरामात ये जा करु शकेल अशी.



दगडधोंडे आणि दाट सावलीतून वर जाताना एका टप्प्यावर दगडाच्या दोन पायरयाही अस्तित्वात आहेत.





शेवटचा टप्पा मोजून पाऊण तासात सहज गाठला.येथे झाडांची शानदार कमान घाटावर आपले स्वागत करते.
ह्या कमानीआधी ऊजवीकडे थोडा कातळाचा १५ २० फूटाचा चढ चढला की बांधीव थंडगार पाण्याचे टाके आहे.



मनसोक्त पाणी पिऊन मग त्याच थंडगार पाण्याने लिंबू जलजीरा सरबत प्रत्येकाने बाटलीभर बनवून प्यालो.कमानीत शिरताच डावीकडे एक गधेगळ आहे.



( गधेगळ म्हणजे दिलेला शब्द मोडला तर त्याचे परिणाम म्हणून .....स्री वर अत्याचार करणारे गाढव कोरले जाते.) अशी विचित्र आणि अपमानास्पद शिळा कोरण्याची प्रथा का आणि कोणी चालू केली याचे ऊत्तर ईतीहास संशोधकच देऊ शकतील.

गोप्याच्या रोजच्या वापरासंदर्भातील प्रचिती यावी असा अनुभव आम्हाला आला.काल सह्याद्रीच्या वाडीत लागलेल्या लग्नातील नवपरिणीत दांपत्य वर्हाडासोबत आणि आहेराच्या सामानासकट वर प्रकटले.विशेष म्हणजे नवरदेव सुटाबुटात आणि नवरी साडी नेसून!गधेगळीला नारळ वाढवून त्यांनी घाटमाथ्यावर प्रवेश केला..आता जावयाला जेवायला बोलावले तरी वर जेवणाचे पार्सल आणा म्हणून अडून बसायचा असा विनोदी विचार वर्हाड्यांना सांगितला आणि हसत हसत ते बोपे गावाकडे रवाना झाले.



आता ताजेतवाने शरीर घेऊन सांगवीकडे परत निघालो.वाटेत बोपे समाजमंदीरातील असंख्य वीरगळी पाहून आणि खालून सोबत आलेल्या एका नाथपंथीय साधूला बोपे बनेश्वरच्या रस्त्याची दिशा समजावून निघालो.











ऊन तापले होते आणि ५/६ कि मीचा खाली वर तंगडतोड रस्ता पार करताना चांगला घाम निघाला.



शेवटी एकदाचे सांगवी गाठले.शाळेच्या हौदावर मिनी अंघोळ करून परत आल्या वाटेने पुण्याकडे निघालो.दुपारी २ च्या सुमारास हायवेवर कापूरहोळला मनसोक्त भोजन ऊरकून ४ पर्यंत घरी सुखरूप पोहचलो.

स्वराज्याच्या मध्यवर्ती भागात असणारया ह्या वाटा खरोखर शानदार आहेत.जावळीच्या मोरेंच्या ताब्यात असा सुफल आणि अफाट प्रदेश असल्यानेच ते 
छत्रपती शिवरायांच्या अधिपत्याखाली यायला नकार देत असावेत यात शंकाच नाही.एक मात्र नक्की पुस्तकाबाहेरचा ईतीहास समजायचा असेल तर अशा वाटा आणि प्रदेश वारंवार पालथा घालावा लागेल.

धन्यवाद! भेटू लवकरच नवीन वाटांसह!

ट्रेक दिनांक : 18/19 मार्च

सुपेनाळ : 
घाटमाथ्याचे गाव : सांगवी
कोकणातील गाव : सह्याद्रीची वाडी, शिवथर
लागणारा वेळ : ऊतरायला ३.५०/४ तास शिवथर घळीपर्यंत.
पाणी : सांगवी खाली सह्याद्रीची वाडी.
श्रेणी : मध्यम सोपी.

गोप्याघाट :
घाटमाथ्याचे गाव : बोपे
कोकणातले गाव : कसबे शिवथर
लागणारा वेळ : शिवथरपासून बोपे ४ तास.सांगवी ५ तास.
पाणी: शिवथर ,घाटमाथा.
श्रेणी : सोपी.

सवंगडी : प्रशांत कोठावदे, मुकूंद पाटे, देवा घाणेकर, तुषार पोमण, शलभ पारिक आणि निलेश वाघ.

सह्याद्री हे जैववैविध्याने नटलेले पर्यावरण स्थळ असून आपण ते जपले पाहिजे.










Tuesday 14 March 2017

रडतोंडी, निसणी - जावळी खोरयातील ऐतिहासिक वाटा!



"तेजतम अंसपर , कन्हजिमि कंसपर |
तो म्लेंछ बंसपर, शेर सिवराज है ||
-कवी भूषण


ऐतिहासिक महत्व -

जावळी - आधुनिक महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वरच्या पश्चिमेस पसरलेला सदाहरित वनराजीने नटलेला प्रदेश!निसर्गाच्या सौंदर्याबरोबरच अनेक ज्ञात अज्ञात ऐतिहासिक घटनांचा मूक साक्षीदार! १६४८ नंतर छत्रपती शिवरायांची सार्वभौम राजा म्हणून ईतिहासाने नोंद घ्यावी अशा ज्ञात दोन ठळक घटना म्हणजे जावळीचे तत्कालिन राज्यकर्ते चंद्रराव मोरेंवर महाराजांनी केलेली कारवाई व त्यात जावळीचा स्वराज्यात केलेला समावेश आणि आदिलशाहीचा बलदंड सरदार आणि वाईचा सुभेदार अफजलखानाचा महाराजांनी केलेला कायमचा बंदोबस्त!




यात अफजलखानाने जावळीच्या चक्रव्यूहात  ज्या वाटेने प्रवेश केला ती वाट म्हणजे रडतोंडी घाट! आणि चंद्रराव मोरेंना जावळीत धडा शिकवताना महाराजांनी वापरली ती निसणीची वाट!

ईतीहासाचा धांडोळा घेण्याकरता यावेळी आम्ही निघालो याच वाटांच्या शोधात! शनिवारी सकाळी ६ वाजता महाबळेश्वरकडे प्रस्थान केले. वाईला पोटभर न्याहारी ऊरकून पसरणीच्या वळणदार वाटेने पाचगणी व नंतर महाबळेश्वरच्या मुंबई पाँईंटच्या अलिकडे राजभवनच्या आत गाडी सुरक्षित पार्क केली. (रखवालदारास कल्पना देऊन) सर्व जण मोहीमेसाठी तयार झाले.


राजभवनापासून साधारण १.३० ते २ कि.मी.वर महाबळेश्वरचा सुप्रसिद्ध मुंबई पाँईंट पर्यटकांचे मोठे आकर्षण.याच मुंबई पाँईंटच्या आधी डावीकडे जंगलात एक ठळक वाट दक्षिणेकडे जाते. ५ मिनीटे चालल्यावर ऊजवीकडे ती वाट खाली ऊतरली.मस्त दाट झाडीतून थोडे ऊतरल्यावर डांबरी सडक ओलांडून हीच वाट एका फार्महाऊसला लागून मेटतळे या गावात ऊतरते.हनुमान मंदीराच्या पुढे बसस्थानकाच्या शेजारून ओंकार हाँटेल समोरून डावीकडे रडतोंडी घाट पारसोंडसाठी ऊतरतो.



थोडं पुढं गेल्यावर समोर मधुमकरंदडापासून प्रतापगडापर्यंत पसरलेल सदाहरित रान डोळ्याच पारण फेडणारं! आजही दुर्गमता जपणारा हा प्रदेश! ३६० वर्षापूर्वी अफजलखानाला या प्रदेशात वाईतून महाराजांनी काय विचाराने आणि किती अफलातून नियोजनाने खेचून आणले असावे!



समोरच्या सुखद नजारयाच्या साथीने हिरव्यागर्द वनराजीतून खाली ऊतरताना सगळे खुशीत होते.साधारण तासाभरात मधुमकरंद जास्तच जवळ वाटायला लागला आणि काहीतरी चुकतेय अस वाटत असतानाच एक गावकरी दादा त्यांच्या सहचारिणीसोबत वर येताना दिसले.त्यांच्याशी बोलताना चूक लक्षात आली आम्ही सरळ ऊजव्या वाटेऐवजी डावीकडची वाट धरली होती.ही वाट शिरवली गावात ऊतरते.आता परत फिरण्याऐवजी आम्ही खाली असणारया गावातून जननी मातेचे मंदीर पाहून पारकडे जाण्याचा निर्णय घेतला.गावातल्या मूळच्या उमरठच्या मालुसरे दादांनी मंदीर दाखवून रस्ता समजवला.



हे जननी आणि कुंभळजाईचे  संयुक्त पुरातन पण नव्याने बांधकाम केलेले मंदीर त्याच्या आतल्या विहीरीमुळे वैशिष्ट्यपूर्ण आहे.आवारात सुस्थितील वीरगळ आणि बाहेर ठेवलेल्या रेखीव मूर्तीही बघण्यासारख्या!








थोडे पाणी पिऊन ताजेतवाने होऊन पारचा मार्ग धरला.डांबरी पण वळणदार मार्ग पूर्ण जंगलाने वेढलेला.मागे काही वेळेला हातलोटच्या फेरया केल्या असल्याने तसा परिचीत आणि मनात घर करून राहीलेला.३ कि मी गेलो आणि एक सिमेंटचा ट्रक आला त्याला हात करुन मागे बसून पारफाटा गाठला.वाटेत एक शिवकालीन पुल लागतो.परत आत २ कि मी पारमध्ये प्रसिद्ध रामवरदायिनीच्या अतिसुंदर राऊळात भोजन, वामकुक्षी असा कार्यक्रम पार पडला.याचे मूळस्थान पश्चिमेकडील प्रतापगडाच्या पलिकडे पारघाटात आहे.
अफजलखानाची छावणी ईथे पारमध्येच होती.आता दुपारचे २ वाजलेले!




परत सामान आवरून समोर दिसणारया प्रतापगडाकडे कूच केली.मार्ग ऊभ्या चढाचा!



सरळ सध्या प्रतिबंधित अफजलखानाच्या कबरीकडे घेऊन जाणारा.कबरीपाशी पोहचलो आणि प्रतापगड स्वच्छ आणि संपूर्ण ऊभा ठाकला पण पार गाव दिसेना.ईथेही महाराजांचे नियोजन ध्यानात आले.शामियानाची जागा आपल्या लोकांच्या नजरेच्या टप्प्यात रहावी पण खालून पारमधून अफजलसेनेच्या नजरेतून दूर!!



पोलिसांनी निरूपद्रवी भटक्यांना प्रेमाने आतून बाहेरचा रस्ता दाखवला.मग प्रतापगडाचा बुरूज गाठून जावळीचे रुप डोळ्यात साठवले.खाली पार्कींगपाशी येऊन कोकम सरबत ,जलजीरा यांनी शरिरातील पाण्याची पातळी संतुलित केली आणि प्रतापगड म.श्वर एस टी ने जावळी फाटा गाठला.६ वाजलेले.



आम्हाला मुक्कामास दरे गाव गाठायचे असल्याने लगेच चालायला सुरूवात केली.साधारण २ कि मी वर जावळीतील मंदीर लागले. त्याशेजारीच जावळीचे राज्यकर्ते चंद्रराव मोरेंचा वाडा होता.आता मात्र झुडूपांचे माजलेले रान आणि शेतावरल्या बांधास्वरूप चौथरा ईतकेच त्याचे अस्तित्व ऊरलेय.काळाचा महिमा अगाध आहे ज्या चंद्रराव मोरेंच्या अधिपत्याखाली जावळीचा तत्कालिन एवढा महत्वाचा प्रदेश आणि रायगड, चंद्रगडसारखे गड होते त्यांची साधी पाऊलखूणही शिल्लक नाही!! आणि ज्या महाराजांना त्यांनी राजा मानायला नकार दिला त्या छत्रपतींच्या नावावर आजही ३७० वर्षांनंतर राज्यकर्ते गादीवर बसतात.(शिवछत्रपती का आशिर्वाद).असो.



जावळीच्या  दोन तीन वाड्या ओलांडून रस्त्याच्या शेवटी असणारे दरे गाठेपर्यंत अंधार दाटला होता.मुक्कामासाठी शाळेच्या आवारात पथारया पसरल्या.शेजारील काकांनी जेवणाचे विचारले आणि झणझणीत पिठल भातावर ताव मारुन ९ च्या सुमारास स्लिपींग बँगमध्ये शिरलो.आजचा मोठा दिवस संपला होता.



दुर्गम गावातील पहाटही तेवढीच नयनरम्य! पहिला गजर गावातील कोंबड्यांचा.आश्चर्य म्हणजे एकाच वेळी रानकोंबड्या आणि गावातील कोंबड्याचा आरवल्याचा आवाज ऐकू येत होता.रात्री झोपायच्या वेळी जोर गावात क्रिकेटची मँच खेळायला गेलेली पोर निसणीच्या वाटेन ऊतरली होती.वरून येताना पडणारया टाँर्चच्या प्रकाशझोतात वाटेचा अंदाज येत होता.सर्व सकाळचे विधी ऊरकून चहा घेऊन बरोबर ७ वाजता मोरे मामांचा निरोप घेतला.



गावच्या शेजारचे कोरडे सावित्री नदीचे पात्र ओलांडून सरळ वर ऊत्तरेला निसणीची वाट आहे.एक छोटी टेकडी चढून एक टप्पा पार करताना मागे वळून टुमदार दरे गाव मागे लोडविक पाँईंट आणि जावळीच्या वाड्या पूर्ण घनदाट जंगलात ऊठून दिसत होत्या.



परत एक टेकडी मागे टाकून वरच्या निसणीच्या दांडाला लागलो.आता चढ अतितीव्र होत होता.



थोड्या अवघड प्रकारच्या घसारयाचा टप्पा पार करताना एक जीर्ण घाटदेवतीची घुमटी ऊनंपावसाचा मारा सहन करत ऊभी होती.



सर्व सुरक्षित वर आल्यावर पुढे एक अरुंद ट्रँव्हर्सवरुन वरच्या पठारावर जोडणारया जंगलाच्या वाटेला लागलो.



अगदी काही मिनीटात वरच्या पठारावर पोहचलो.वरुन खाली जावळीचे खोरे, मागे महाराजांनी जावळी ताब्यात घेतल्यावर निर्मीत प्रतापगड आणि पलिकडे मधुमकरंदगडपर्यंतचा परिसर! काही नजारे ह्रदयाच्या कोपरयात कायमचे कोरले जातात त्यापैकीच हा एक!

क्षणभर विश्रांतीनंतर क्षेत्र महाबळेश्वरची वाट पकडली पण ही वाट घनदाट अरण्यात जाऊन हरवली.आता काय करावे? मागे जावे? पण एकमताने पुढे जायचा निर्णय घेतला.आता थोडाफार अनुभव आणि सक्षम सवंगडी असताना कठीण प्रसंगावर मात करण्यास फार वेळ लागत नाही.जंगलात कुठे चाललोय हे समजेना अधूनमधून जंगली जनावरांच्या पायवाटा ओलांडत, कुठे वाकून, कुठे काटेरी झुडूपं चुकवत पूर्वेच्या दिशेन चालत राहीलो आणि अचानक वाहनाचा आवाज आला.जल्लोषात सर्व जवळजवळ पळत आर्थर सीट क्षेत्र महाबळेश्वर या डांबरी सडकेला लागलो.४ कि मी चालत मंदीरापाशी पोहचलो.तिथून एका जीपने राजभवन आणि कपडे बदलून वाईकडे प्रस्थान ठेवले.वाईत शिवशाहीमध्ये सुग्रास भोजन करून दुपारी ३ ला पुणे गाठले.

अनेक घाटवाटा पालथ्या घातल्या पण ह्या भटकंतीने छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाटा आणि ह्या लोकातित राजाच्या पराक्रमाची साक्षीदार असलेली भूमी अनुभवायला मिळाली ही फार मोठी जमेची बाजू!

धन्यवाद मित्रांनो! भेटू परत एखाद्या भन्नाट घाटवाटेसह!



भौगोलिक स्थान आणि अंतर :

पुण्यापासून महाबळेश्वर १२० कि मी अंदाजे.

सुरूवात : बाँबे पाँईंट  ; शेवट : क्षेत्र महाबळेश्वर.

गड : प्रतापगड

घाटवाटा : रडतोंडी आणि निसणी

श्रेणी : मध्यम 

काय पहाल : शिरवली मंदीर, जुना शिवकालीन पुल, रामवरदायिनी मंदीर पार, प्रतापगड, जावळीचे चंद्रराव मोरेंच्या वाड्याचा चौथरा आणि जुने महाबळेश्वर मंदीर.

मुक्काम : दरे गावातील प्राथमिक शाळा.

Link for article published in saptahik sakal.

http://www.saptahiksakal.com/SaptahikSakal/20170227/4855103307649065500.htm

सह्याद्री हे जैववैविध्याने नटलेले पर्यावरण स्थळ असून ते आपण जपले पाहीजे.