Friday 12 February 2016

तळपेवाडी ते भिमाशंकर




 "हजार महफ़िलें हों, 

   लाख मेले हो...
   पर जब तक खुद से न मिलो,

   अकेले हो..."
             

कुठल्यातरी शायराने केलेला हा शेर चार ओळीत आपल जगण्याच प्रयोजन काय हा विचार करायला भाग पाडणार आहे.सह्याद्रीच्या अनेक आडवाटा मला व्यक्तीश: स्वत:चा शोध घेण्यास मदत करत आहेत.कुठ् तरी एखाद चंद्रमौळी घर जेव्हा ऊन्हातन बेजार झाल्यावर राजस स्वागत करत दूरवरन आणलेल्या पाण्यान भरलेली कळशी रित करत, कुठल्यातरी मुक्कामी एश टीच्या गावातील मंदीरात हरिनामाचा गजर होतो, एखादा फाटका माणूस जेवण देतो आणि पैसे घेण्याच नाकारतो तेव्हा शहरी मापात फीट बसत चाललेले हे मन परत जाग होत.खर सांगायच तर ट्रेकमधले हे अनुभव परत माणसातल माणूसपण जाग करतात आणि आत्मभान परत मिळवायला मदत करत.

अशाच जानेवारी 2016 च्या शनिवारी मल्लिकार्जुन श्रीशेट्टी (दोन तीन वर्षात सह्याद्रीतील सर्व अवघड जागा पादाक्रांत करण्याचा मानस बाळगणारा) याच्या आग्रहाने त्याचा हक्काचा साथीदार संतोष कुलकर्णी (वेळ पडली तर अर्जुन खांद्यावर टाकून परत आणेल असा आत्मविश्वास असणारा), प्रशांत आणि मी चौघे प्रसिद्ध लोणावळा भिमाशंकर मार्गातील तळपेवाडी ते भिमाशंकर हा ऊत्तरार्धाचा भाग करण्यासाठी शिवाजीनगरहून सायंकाळी पाचच्या लोकलने कान्हे स्टेशनकडे निघालो.तसा पुणेकर ट्रेकरला लोकल प्रवास हा नवीनच कारण लोहगड राजमाची अशा ट्रेकलाचा असा योग येतो.तिकीट प्रत्येक माणशी 10 रू बघून दोन वेळा चेक केल कारण पाषाणहून शिवाजीनगर या 8 कि मीचे रिक्षाचे 125 रू मोजून नुकतच ऊतरले होतो.रेल्वेने या जमाऩ्यात अशा सुविधा देणे सुखद धक्का देणारे होते.

कान्हे फाट्याला ऊतरल्यानंतर नकाशाप्रमाणे कुसूर कडे जायचे अर्जुनचे प्लॅनिंग होत.मी मॅनेजमेंटच्या
भानगडीत नाय पडत किंवा ट्रेक कुठन चालू होईल आणि कुठ संपेल एवढच विचारतो.जीप वाल्याने डायरेक्ट बाराशे सांगितल्यावर व नंतर सातशेवर ऊतरल्यावर शेवटची मुक्कामी एश टीची चौकशी करायला बाहेर पडलो.मग ऊगाचच लिफ्टसाठी हात केले.आश्चर्य म्हणजे एक स्कॉर्पीओवाले दादा थांबले. गाडीत तिशीतला गुंठामंत्री वाटावा असा पैलवान.“कुठ निघाला?“ आम्ही कुसूर म्हटल्यावर मी फक्त टाकव्यात जातोय तिथ सोडतो फाट्यावर.मग गाडीत गप्पात नवनाथ मोडवे यांनी विचारल कुठला ट्रेक? भिमाशंकरचा मग त्यांनी सांगितल कुसूर ते तळपेवाडी डांबरी सडक आहे तुमचा ट्रेक तळपेवाडीतून चालू होतो.कस जाणार? आता तुम्हीच सांगा या विनंतीवर त्यांनी कुठतरी फोन केला मग टाकव्यात त्यांच्या माती वाहतूक करणारया हायवातून आम्हाला ईंगळूनपर्यंत सोडायची व्यवस्था केली परत तिथून त्यांच्या मामाच्या जोरी साहेबांच्या गाडीतून तळपेवाडीपर्यंत सोडून देण्याची सूचना ड्रायवरला दिली.अतिशय निरपेक्ष मदत करणारी अशी माणस ही ट्रेकरला भेटतातच.पैसे भरपूर असून अशी मनाची श्रीमंती ठेवणारे मात्र कमीच.

रातच्या आठला तळपेवाडीत ऊतरून मारूतीरायाच्या गावच्या मंदीरात विचारून सॅक टाकल्या.थोड पाणी मागून घरून आणलेल्या डब्यातून जेवण आटोपली आणि शतपावली करायला आणि ऊद्यासाठी कोणी वाटाड्या मिळतो का याची चौकशी केली.रामचंद्र म्हणून तरूण त्याच्या मित्रासह येण्यास तयार झाला त्याला सकाळी नाष्टा त्याच्याच घरी तयार करायला लावला.


सकाळी प्रातर्विधी ऊरकून सूर्यनारायणाच्या पहिल्या किरणांसहित आम्ही भिमाशंकरच्या दिशेने मार्गस्थ झालो.बरोबर तळपेवाडीतील तीन तरूण होते.वांद्रे खिंड तळपेवाडीच्या ऊत्तरेला आहे.कोकणातून येणारी हाय टेंशन वायर टॉवर ओलांडून  खिंडीच्या दिशीने मार्गाक्रमण चालू केले.


ऊन वाढायच्या आधीची चाल खूप सुखकारक असते मग जसजस ऊन आणि अंतर वाढत तसतस कमी सवय असलेले गडी सर्व ग्रुपची चाल हळू करतात आता थोड्याफार अनुभवातून हे शिकलोय.म्हणून जरा जोर लावून सकाळी लवकर पाऊल ऊचलले तर त्रास कमी होतो.


पण अर्थात आजूबाजूचा निसर्ग न्याहाळून चित्रबद्ध करूनच ट्रेलची मजा आहे अस मला पण वाटत म्हणून नाना प्रशांतसारख्या माणसांबरोबर ट्रेक करणे जास्त आनंददायी! अर्थाच शारिरीक क्षमतेचा कस लावायचा तर मिलिंददादा कुलकर्णी, एऩ डी गवारे यांच्यासोबत पण मी कधीकधी जातो पण त्यांचे fast & furious असे ट्रेक असतात.भल्याभल्यांना फेस आणणारे ट्रेक ते मॅरेथॉन वेगाने करतात.असो.





वांद्रे खिंड गाठताना वर खडकात एका ठिकाणी पाण्याचे टाके कोरलेय पण पिण्यायोग्य नाही.





वर डोंगरावर भल्यामोठ्या विंडमिलस् ओळीने आपले स्वागत करतात.खिंड ओलांडल्यावर समोर दूरवरचे खोरे दृष्टीक्षेपास पडते.सकाळच्या कोवळ्या ऊन्हात समोरचा परिसर सोनेरी प्रकाशात न्हाऊन गेला होता.






पडारेवाडीच्या परिसरात प्रवेश करताना लोकांची सकाळची लगबग चालू होती.एका घरासमोर छोटा पाणी थांबा घेतला.






पुढ एक छोटी नदी ओलांडून समोरच्या डोंगराच्या अंगाला भिडलो.



एक भिमाशंकरला जाणारी सडक आडवी आली की पाच सातशे मीटर पूर्वेकडे चाल केल्यानंतर
एका डोंगराच्याबाजूने जंगलात डावीकडे भिमाशंकरची वाट भिमाशंकर अभयारण्याच्या पोटातून ही कुठे कारवीच्या जंगलातून जाणारी तर कुठे घनगर्द झाडीतून जाणारीवाट सुखद वाटणारी.
मध्ये एक कोरडा धबधबा लागला.




पुढे थोडे गेल्यावर कोकणाच्या बाजूचे विहंगम आणि पेठचा किल्ला त्याआधी सरळ हजारभर मीटर खाली ऊतरणारी घळ असा अप्रतिम नजारा थकवा पळवणारा होता.







तिथे थोडे फोटो घेऊन पुढे निघालो एक छोटा झाडीचा टप्पा पार केला आणि समोरच्या पठाराच्या पल्याड पदरगड व त्याबाजूचा अजस्र डोंगर डोकावला.



मागच्या ऊन्हाळ्यात नानाच्या बरोबर ऩाशिककर मंडळींसोबत साखरमाची भट्टी रान आणि आहुपे घाटाच्या ट्रेकच्या वेळी याच्या पलिकडून ऊचलेतून खाली कोकणच्या दमटपणात केलेली चढाई आठवली.घाटवाटा करायला लागल्यापासून आजूबाजूचे डोंगर आता ओळख द्यायला लागलेत.


परत समोर घनदाट झाडीत प्रवेश केला.ही वाट ऊन्हाचा त्रास वाचवणारी होती.


मध्ये सुवर्ण किरणांनी व्यापलेला गवताचा गालीचा त्यामध्ये लोळण घ्यायची सुप्त ईच्छा जागृत करणारा होता.


पण अशा अधूनमधून डोकावणार्या बालहट्टांना अजून कमळादेवीचे पठार किती आहे याचा अंदाज नसल्याने वेसण घातली. थोड्या अंतरावर जंगलातून बाहेर पडल्यावर पुन्हा पठार लागले या पठारानंतर वाट दोन्ही बाजूला दगड रचून अधोरेखित केली आहे.संतोषभाऊचा पाय जरा त्रास देत होता आणि तो लाड करून घ्यायच्या मूडमध्ये येण्याच्या आत ऊरलेले अंतर कापण्याच्या दृष्टीने थोडे वरकरणी कठोर वाटावे असे नाईलाजाने पण चेष्टेच्या स्वरूपात त्याला समजावून ऊठवले.पण खरच त्रास होत असल्यावर तो तरी काय करणार मग नेहमीच्या पद्धतीने त्यांना आपण मागे राहीलो असा भास व्हावा एवढा वेग वाढवला पण मागे ते आहेत याची खात्री करतच पुढे चाल चालू होती.




अर्जुन मात्र एकदम लांब पल्ल्याचा गडी.बहाद्दराने मध्ये ऐनवेळी कोणी आले नाही म्हणून तोरणा ते रायगड बोराट्याच्या नाळेतून एकट्याने केला.अर्थात त्याला जमेल तेवढे टोचून परत सोलो ट्रेक करू नये यासाठी मिलिंददादा, एवरेस्टवीर किशोरभाऊ, एन डी दादांच्या ट्रेकला बोलावले म्हणजे पायाची रग जिरण्यासाठी पर्याय असणे चांगले.
अजून थोड्या अंतरानंतर कमळदेवी मंदीर लागले.तिथे थोडे विसावलो.




 खाली दरीत भोरगिरीकडून येणारी वाट बघून भिमाशंकर मंदीर टप्प्यात आल्याची खात्री पटली पण अजून तास दीड तासाची पायपीट नक्की होती.ऊन्हाळ्यात पाणी बरोबर असणे किती चांगले हे आटलेले जलाशय पाहून पटत होते.एक ट्रॅव्हर्स मारून नदीच्या पात्रात ऊतरल्यावर भोरगिरीचा मार्ग लागला.पावसाळ्यातल्या सुंदर ट्रेकची आठवण झाली.पण आता डोहातले म्हशी बसून खराब झालेले पाणी पाहून ऊन्हाळातला विसावा निराशाजनक झाला.येथून आता शेवटचा टप्पा गर्द झाडीतून क्षेत्र भिमाशंकरच्या मंदीरात घेऊन जाणारा.नाईलाजाने ऊठलो आणि मार्गस्थ झालो.न थांबता अर्ध्या तासात बरोबर दीड वाजता मंदीराच्या प्रांगणात दम घेतला.






संतोष आल्यावर वर हॉटेल क्षितीजमध्ये भरपेट जेवण हाणले आणि बाहेर येऊन भिमाशंकर पुणे निमआराम गाडीने बसून सायंकाळी 7 वाजता घरी पोहचलो.

हा ट्रेक पावसाळ्यात जास्त आनंददायी आहे यात शंकाच नाही पण ऊन्हाळ्यात साधारण 6 तासात 20 कि मी अंतर आमची सह्याद्रीतल्या किंवा हिमालयातील भविष्यातील भटकंती सुखकर करेल यात शंका नाही.
धन्यवाद! परत भेटू!

ट्रेक रूट:  तळपेवाडी ते भिमाशंकर
ट्रेक मेटस्:  प्रशांत कोठावदे, मल्लिकार्जुन श्रीशेट्टी, संतोष कुलकर्णी आणि मी.
वाटाड्या:  रामचंद्र, तळपेवाडी
ग्रेड:  मध्यम
लागणारा वेळ:  6 ते 7 तास ऊन्हाळ्यात.लवकर चालू केला तर.

4 comments:

  1. Khup mast blog Tushar...asech lihit ja ..

    ReplyDelete
  2. Thanks dear! Yes decided to keep it up in future but for that we have to explore some untroden paths meanwhile!

    ReplyDelete
  3. जबरदस्त ब्लाॅग..तुषार
    बराेबर लय सापडलीय...

    ReplyDelete