Tuesday 3 October 2017

दारयाघाट आणि डोणीदार - दमदार भटकंती





'ओ दादा' असा बेंबीच्या देठापासून आवाज किरणदादांनी दिला आणि दुर्ग ढाकोबा पठारावर चाललेल्या आँफलाईन गुगल मँपच्या भटकंतीला दुर्गवाडीची दिशा मिळाली.

मावळलेल्या दिवसासोबत आम्हा भटक्यांचा संयमही मावळतीच्या टोकाकडे चाललेला त्यात रानवाटा तुडवून निर्मनुष्य पठारावरच्या भटकंतीला चोहीकडे घनगर्द जंगलाने वाट अडवलेली! दुर्गवाडीतील एक आदिवासी कुटूंब पावसाच्या आगमनाबरोबर बाहेर येणाऱ्या चिंबोरयांना मशाली च्या प्रकाशात पकडण्यासाठी या आडरानात शिरलेले आणि दोन पोरांना सोबत देऊन शेवटची अर्ध्या तासाची चाल त्यांनी सुकर केली अन्यथा धुक्याच्या चादरीत पावसाच्या शक्यतेने आणि जंगली जनावरांच्या सानिध्यात रात्र जागवणे असाच या भटकंतीचा मुक्काम होणे आहे याची बहुसंख्य सवंगड्यांना तीव्र जाणीव निश्चित झालेली.
आज सकाळी ५ वाजता पुणे सोडून लोणावळा कर्जत म्हसा असा प्रवास करुन ८.३० ला जेव्हा हाँटेल गुरुप्रसाद समोर गाडी थांबली तेव्हा सर्व जण यथेच्छ पेटपुजेच्या तयारीत आणि नेमके पूर्ण गावच बंद! मग तसेच पुढे सिद्धगड, गोरखगड यांच्या पावसाळी नभांना कवेत घेणाऱ्या आणि गत भटकंतींची आठवण जागवणारया सह्यरांगेच्या सानिध्यात धसई गाठले.चौकात खमंग वडापाव, मिसळ, समोसा यावर तुटून पडत वरुन गरमागरम चहा घेतला आणि गाडी पळूच्या दिशेने वळली.पळूत नाशिककर ४ साथीदार आधीच पोहचलेले.त्यांना सोबत घेऊन पुन्हा एकदा विदाऊट पासपोर्ट सिंगापूर!

वाहन एका घरासमोर पार्क करून सर्व जण ९.३० च्या आसपास पाठीवर सँक लादून तयार झाले.गावातील दोन पोर वरच्या ओढ्यापर्यंत वाट दाखवायला तयार झाले.
डावीकडे नानाचा अंगठा, जीवधन, वानरलिंगीचा सुळका नाणेघाटाच्या वैशाखरेतून केलेल्या भटकंतीची आठवण जागवत होते.समोर ढाकोबाचा पहाड छातीवर होता.ऊजवीकडे दुर्गपर्यंत पसरलेले पठार आणि खालच्या बाजूला पळूची लेणी डोकावत होती.एकंदर ऊंची बघता चांगला घाम काढणार याचा अंदाज करत पुढे सरकत होतो.

दोन टेकड्या पार करून वरच्या ओढ्याला लागलो आणि वाटाड्या पोरांना निरोप दिला आता ओढा ओलांडून वाट शोधत नाळेत पोहचलो.भल्यामोठ्या दगडांच्या राशी अन ऊभा चढ! लहान मोठ्या असंख्य शिळा वाट शोधत पार करत हळूहळू वर चढाई करताना वाटेत एक छोटा धबधबा लागला तिथ थोडी विश्रांती घेतली.
पुढ थोड्या सोप्या कातळचढाई नंतर नाळेच्या वरच्या टप्प्यात पोहचलो.आता चढाई अजून तीव्र होत होती आणि वर धुक्याची दुलई! नाळ संपली तशी वाट डावीकडे कड्याला चिटकून वर गेली.थोड्या पायरयांच्या टप्प्यावरून परत ऊजवीकडे वळाल्यावर नाळ संपली त्यावर पोहचलो.एक कारवीचा चढ चढून ढाकोबाच्या अंबोली खिंडीत पोहचलो.पलिकडे अंबोली गाव ता.जुन्नर! तिथ शेंदूर फासलेले ढाकोबाचे वनमंदिर ( मूळ मंदिर पुढे आहे)

दुपारचे १.३० वाजलेले मग सर्वांनी शिदोरया सोडून धुक्यात हरवलेल्या दरीशेजारी यथेच्छ मेजवानी झोडली.
खर तर काही काळ विश्रांती जेवणानंतर अशा पायपीट असणाऱ्या भटकंतीत आवश्यक आहे पण एकंदर दुर्गवाडीत पोहचायचे असल्याने तो विचार मनातून काढून टाकला आणि पाठपिशव्या लादून निघालो. मंदिरापासून पूर्वेस वर एक दरीच्या बाजूचा कडा चढण्यास सर्व सज्ज झाले.हा जरा अवघड श्रेणीचा याचे कारण दरीच्या बाजूस पूर्ण मोकळा आणि फक्त पाऊल बसेल एवढ्या खोबण्या! एका गावकरी दादाच्या प्रोत्साहनाने ही अवघड चढाई सर्वांनी सुरक्षित पार केली.थोडा ऊभा कडा चढून वर पठारावर पोहचलो.वाटेत एका झाडावर बांबू पीट वायपर गुंडाळून आराम करत होता.त्याला तसाच लांबून रामराम करून वर पोहचलो.
तेथून पुढ गाववाल्या दादांनी वाट दाखवली आणि सांगितले की सरळ वाट सोडायची नाय बरोबय दुर्गवाडीत पोहचाल.खर तर आमचा वाटाड्या दारयाघाट खिंडीत पोहचण अपेक्षित होत तसा निरोप त्याला दिला होता पण तो आला नसल्याने आणि अंधार आणि पावसाच्या आधी मुक्कामी पोहचावे या गरजेपोटी आम्ही वाटाड्या विना निघालो होतो.थोड पुढ रम्य वातावरणात एका ओढ्यापाशी पोहचून एक पाण्याचा थांबा घेतला.अजून पावसाचा पुर्ण जोर नसल्याने पाणी स्वच्छ आणि शांततेत खाली दरीकडे वाहत होते.अर्ध्या तासात ढाकोबा मंदिर आणि पुढे दिड तासात दुर्गवाडीत! एवढ साध गणित असल्याने मावळतीपूर्वी आम्ही सहज मुक्कामी पोहचू ही जवळजवळ खात्री होती.

थोड पुढ जात असताना वाटा अनोळखी वाटायला लागल्या तासभराच्या जलद चालीनेही ढाकोबा मंदिर दिसेना! आता काहीतरी चुकतेय अस वाटत असताना दुरवर मंदिर डोकावले पण अजून अर्धा तास गेलाच.साधारण पाच वाजलेले.पण पुन्हा एक विसावा घेतला आता वाट चुकीची नाही म्हटल्यावर जरा गाफील झालो.पण निघाल्यावर सरळ दक्षिणेकडे जाताना ठळक पण खाली दरीकडे जाणारी वाट लागताच सावध झालो आणि ऊजवीकडे वळालो.

आता सर्व जण जरा चिंतित झाले.मी आणि मिलिंद दादू जरा पुढे खळग्यान पर्यंत गेलो पण बाकी लोक मागे थांबले.मग परत मागे फिरून एक चर्चा विनिमय झाला.साधारण ६ वाजलेले आणि वातावरण पाहता दुर्गवाडी गाठणे अवघड होईल असेच बहुसंख्य मतांचा कौल होता पण बरोबरचे सर्व जण अनुभवी असल्याने थोडे साहस करायला हरकत नाही म्हणून सर्वांना तयार केले.ढाकोबा मंदिरात परत गेलो तर उद्या जास्त अवघड होणार होते रात्रीच्या जेवणाचा प्रश्न होताच कारण डबा दुपारचा आणला होता आणि रात्री वाटाड्या घरी जेवण देणार होता.नाही म्हणायला प्रत्येकाकडे काहीतरी खायला होतेच आणि ते असायलाही हवे.
खळगे पार करून पलीकडे डोंगर धारेला वर चढलो काही बाण दिसले पण एका ठिकाणी बाण खाली दरीकडे जाणारा होता आता सरळ वाट सोडून खाली जाणे म्हणजे अडचणीत जाणारे वाटले म्हणून सरळ चालू लागलो पण ही वाट ढोर वाट असावी कारण ती जंगलात शिरली.धुके आणि अंधार आता जास्त गूढ वाटू लागला.जंगलाच्या मध्ये एका मोकळ्या जागेत परत एक विचारविनिमय झाला आणि बऱ्याच दिवसांनी ट्रेकला आलेला आमचा जुना सवंगडी समीर कदम म्हटला दादा माझ्याकडे ऑफलाईन जीपिस मॅप आहे तो चालू होतो का बघतो.

बघितले तर आम्ही कड्याच्या जवळ आणि वेगळ्या बाजूला आलो होतो.आता मनाचा हिय्या करून मॅप नुसार परत जंगलात शिरलो.थोडे अंतर पार केल्यावर एका डोंगरउतारावर लागलो.परत मॅप चालू आहे का खात्री केली आणि त्यानुसार चालू लागलो.वाट एका ओढ्यापाशी येऊन थांबली.पुढे गहन जंगल!
आता आमचा धीर सुटायला लागला.नशिबाने पाऊस नसल्याने तेवढा एक दिलासा! ओढ्याच्या कडेने बरेच आत गेलो पण आता वाट संपली.परत मघाशी जेथे होतो तिथे परत आलो.प्रशांतने उजवीकडे एक वाट दिसतेय म्हटल्यावर काही पर्याय नसल्याने परत एकसाथ त्याच्यामागे चढाई चालू केली.ओढ्यावर जागोजागी बांध दिसायला लागले पण वनखाते अशी काम करत त्यामुळे अजून किती चालावे लागेल याचा अंदाज बांधणे अवघड होते.आणि मग किरण दादांना अंधारात टॉर्च चमकल्याचे दिसले आणि आवाज ऐकू आला आणि त्यांनी बेंबीच्या देठापासून आवाज दिला ओ दादा.

सामान्य वाटणारी वाट आपली किती वाट लावू शकते याचा प्रत्यय आम्हाला आला होता.अर्थात असे साहस शक्यतो टाळावे पण टॉर्च, खाण्याचे पदार्थ, पाणी आणि योग्य शारीरिक आणि मानसिक स्थितीचे सवंगडी सोबत असल्याने यावर मात करून आपले ध्येय गाठणे आम्हाला शक्य झाले.
दूर्गवाडी पोहचल्यावर गरमागरम जेवण आणि संजय कुलकर्णी यांनी बनवलेला अप्रतिम शिरा खाऊन आजची सिंगापूर मधून सुरू झालेली दाऱ्या घाटाची मोहीम दुर्गवडीत विसावली.आता उद्या दुर्ग आणि मंदिर दर्शन घेऊन डोनिदार घाटाने खाली उतरायचे होते.

भाग एक समाप्त !











Thursday 8 June 2017

फडताळ नाळ - दुर्गम आणि दुर्लभ घाटवाट






थकल्या भागल्या मनाने आणि शरीराने दापोली गाठले तेव्हा दिवेलागणीची वेळ झालेली.एका टुमदार घराच्या ओसरीत शरिरावर सकाळी ७.३० पासून लादलेले सँक, पाऊच, कँमेरा ऊतरवले आणि न मागताच थंडगार पाण्याची बाटली मिळाली आणि चहासुद्धा! २/४ मिनीटात श्वास नैसर्गिक पातळीवर पोहचल्यावर मग बाहेर ठेवलेल्या ड्रममधले पाणी डोक्यावर थोडे ओतले आणि मग जरा तरतरी आली.

काल रात्री २ च्या सुमारास सिंगापूरला (विदाऊट पासपोर्ट) झालेले आगमन आणि पोटे मामांच्या ओसरीत लगेच निद्रीस्त होत बरोबर सकाळी ६ ला आलेली जाग! मामा पहाटेच बाहेर आले आणि आज तुम्ही आमच्याबरोबर दापोलीला यायचे आणि तेही फडताळ नाळेने अशी गळ घातली.७० वर्ष वय आणि २० एक वर्षापूर्वी ऊतरलेली नाळ करायला ते सुरुवातीला फार खुष नव्हते.लय लांब हाये, वाट मोडलीय, वय झालय अस नेहमीच्या कारणाने आम्ही बधणार नाही अस लक्षात येताच आम्हाला चहा सांगून ते आत आवरायला गेले.
ईतर गाववाले विचारायला लागले तिकड कशापायी? त्यांना शांतपणे सांगितले अहो राजगड आणि रायगड ह्यांना जोडणारया महाराजांच्या अस्तित्वाने पुनीत झालेल्या आणि कधीकाळी त्यांचे पाय लागलेल्या या वाटा कशा आहेत ते तर बघाव यासाठी हा सर्व ऊपद्व्याप!



सर्व तयार झाल्यानंतर गाडी कच्च्या रस्त्यावरुन सांभाळून चालवत एकलगाव गाठले.शाळेसमोर गाडी लावून फडताळच्या दुर्गमतेबद्दल आणि काठीण्याबद्दल थोडीशी सर्व भिडूंना कल्पना देऊन सकाळी ८ च्या सुमारास दुर्गाच्या डोंगराकडे कुच केले.



पावसाळ्या आधीचे ढग जमायला सुरुवात झालेली आणि ऊनसावलीच्या खेळात ही चाल लांबलचक असली तरी सुखकारक भासणारी. 



अगदी तासाभरात जननीचे ठाणे गाठले.वाटेत समोर बा रायगड , रौद्रभीषण लिंगाणा आणि घाटावरून कोकणात ऊतरणारया नाळा यांची सोबत होती.



जननी देवीला मनोमन सुरक्षित ट्रेक पार पडण्याची प्रार्थना केली.



खुरट्या झुडूपातून वाट धुंडाळत प्रथम फडताळ च्या वरच्या पठारावर आलो.



तेथून टोकाकडे जाऊन परत रायगड, दापोली, लिंगाणा आणि त्याच्या अंगाखांद्यावरून कोकणात सांडलेल्या विविध नाळा, घळा छायाचित्र बद्ध केल्या.





थोडक्यात आवरून नाष्टा थोडी सावली बघून करावा असे ठरले आणि ऊजवीकडे जात वर चढलो.पहिलाच एक अरूंद घसारा आणि तोही अगदी विनाआधार. 



पण मनाचा हिय्या करून वाटाड्या मागून शिरलो.सावकाश दोर न लावता हा घसारा सर्वांनी पार केला आणि मग नाळेच्या मुखात पोहचलो.




८० अंशाच्या कोनात धडकी भरवणारी वाट फडताळ बद्दल जे ऐकले होते त्याच्यापेक्षाही हे कठीण प्रकरण आहे त्याची साक्ष पटवणारी.तेथेच थोडी न्याहारी ऊरकली.




तोपर्यंत मामा ऊजवीकडे अजून खुल्या घसारयाच्या अवलोकनास गेले.मग आमचे आटोपताच तिकडे येण्यासाठी त्यांनी आवाज दिला.



आता खरी कसरत चालू झाली.विरागने आणि सुनीलने स्वत: अँकर होत डावीकडच्या भयानक दरीपासून बचाव करण्यासाठी दोर लावला.अशा वेळी दोर हा फक्त एक मानसिक आधार असतो आणि ही गोष्ट तो वापरणारयाने निश्चित लक्षात ठेवावी.जोरात हिसका बसला तर अँकर करणारयाला घेऊन खाली पडायला वेळ नाही लागणार.असो.

आता ते वळण पार करताच खाली जवळ जवळ सरळ घसारयाच्या वाटेने पार्श्वभागाचा आधार घेत खोल ऊतरायला सुरूवात केली.हा चांगला ६०० /७०० फुटाचा पँच फक्त बरयाच कालावधीत कोणी वापर केला नसल्याने दोर न लावता ऊतरता आला नाही तर गवत सरकून माती मोकळी झाली तर दोर अवश्य लावावा असा.




हा भाग ऊतरताच डावीकडे एक कातळाची भिंत ऊतरावी लागली.फडताळला श्वास न रोखता १ फूटही ऊतरणे अवघड!कसाबसा हा पँचही ऊतरलो.



ईथून पुन्हा नाळेत प्रवेश झाला.मग थोडा सह्यकर ऊतार म्हणजे आधार असणारा!






 काही अंतर पार केले आणि मग बघतो तर पोटे मामा दिसेनात. थोड पुढे झालो तर १००/१५० फूटाचा धबधबा! त्याच्या डाव्या बाजूला खाली २००/२५० फुटावर मामा एक टेकाड बघून वर बसलेले.



त्यांना विचारले मामा कुठून ऊतरायचे ? हे काय या अस तिरप तिरप! ८०/८५ अंशाच्या कोनात कुठलाही होल्ड नसणारा आणि ऊजवी कडे घसरलो तर सरळ ३०० फूट दगडांच्या नाळीत! घाम फुटला होताच, आता ठोके बंद पडतात अस वाटायला लागल.




फक्त म्हातारा समोर ऊतरलाय म्हणजे ऊतरता येईल या विश्वासाने एक एक पाऊल सावकाश ऊतरत डावीकडे सरकलो.आता खाली ऊलट होऊन ऊतराव तर सँकच्या वजनाने थोडा झटका बसला तरी विषय संपला आणि सरळ ऊतराव तर पुन्हा मागून सँकचा झटका बसला तरी सरळ खाली.शेवटी सावकाश खाली बसलो.मागे नामदेव दादा होते.बसल्यावर पाय खाली पोहचेनात.२ फूट खाली घसार्याचा ऊतार मग दादांना म्हटल तुम्ही माझी सँक मागून पकडून ठेवा म्हणजे मी घसरणार नाही.कसेबसे हळूहळू पाय टेकले आणि स्थिर झालो.मग पुन्हा १५ /२० फूटावरच्या कातळ ऊतारापर्यंत बसून घसरत सरकलो.मग कठीण दगड आल्यावर जरा हायसे वाटले.गवत माती आणि बारीक खड्यांचा घसारा वरुन एक्सपोजर असे समीकरण मला नेहमी त्रास देणारे वाटते त्यात केचूआची अशा ठिकाणी सुप्रसिद्ध ग्रिफ!(बोट दाबले जाणार नाहीत आणि पायही घसरणार नाहीत अस बनवा रे कोणीतरी एकाच वेळी!)मामांच्या जवळ पोहचून थांबलो पण तेथे ऊभ राहण पण कठीण! सँक ऊतरवली कोपरा बघून ऊभी केली कशीबशी! 



मागच्या लोकांच्या चेहरयावर तेच प्रश्नचिन्ह! मग सुनीलला दोर लावण्याची विनंती केली .त्याने अवघड जागी स्वतः अँकर होत दोर लावला.वरून दगड सरकून सरळ अंगावर येत होते पण सरकायला पण जागा नाही. कसे बसे सर्व खाली आले.अपघात होण्याची दाट शक्यता असणारी ही जागा! पण यात जवळजवळ २ तास गेले.परत ट्रँव्हर्स घेऊन नाळेत जाण्याचा मार्गही भयंकर! कड्याच्या दगडांचा आधार घेत हळूहळू घसरणारी पावल सांभाळत सर्व नाळेत पोहचले.




मग खाली काही ऊतार ऊतरल्यावर शेवटचा कातळाचा धबधबा तेथेही सांभाळून ऊतरलो.




परत सर्वांच्या सँक दोराने ऊतरवत बाकी लोकही आले.तेथे जेवण ऊरकले.एकंदर दमछाकीने जेवणही जाईना.त्यात पुढे आलेले भिडू एवढा वेळ लागला म्हणून आवाज देऊन थकल्यावर एक झोप काढूनही वैतागलेले.पण ट्रेक म्हटला की सर्व जण एकत्र आणि सुरक्षित येण महत्वाच.कोणी घसारयाच्या वाटेला, कोणी ऊंचीला, कोणी तंगडतोडीला घाबरत पण एकमेकांना आधार देत ट्रेक करण हे तुम्हाला एक चांगला ट्रेकर बनवत नाही का? 

 


आता चांगले ३.३० वाजलेले.४ लि पाण्यापैकी २ ते २.३० ली.पाणी संपलेले.त्यामुळे अजून वेळ दवडणे म्हणजे संकटाला निमंत्रण.त्यात खाली वापर नसल्याने कुठलीही पाऊलवाट नाही ना पाण्याचा कुठला झरा.मग रेंगाळलेल्या साथीदारांना थोडी परिस्थितीची जाणीव करुन देत पहिले लक्ष्य म्हणजे जंगलातून बाहेर पडणे हे पटवून दिले.नाहीतर तुमचे पाणी संपले तर ते या ठिकाणी आणणे शक्य नाही याची ही जाणीव करुन दिली.मग मात्र चालू झाली तंगडतोड.आपली ईच्छाशक्ती जागवत सर्व एकसाथ चालू लागलो.





पूर्ण डोंगराला वळसा घालून वरच्या धारेने पणदेरेची वाट सोडून दापोलीकडे निघालो.



शेवटी दापोली नजरेस पडल्यावर थोडे विसावलो.



भयंकर जळालेल्या आणि ८० अंशाच्या घसरड्या ऊतारावरून आग्या नाळीकडे जाणाऱ्या ओढ्यात ऊतरलो तेव्हा सूर्य मावळला होता.



आणखी काही मिनीटात दापोलीत पोहचलो.मंदिरासमोरच्या घरात पसारा टाकून विहीरीवर स्नान केले.पोटभर जेवण केले आणि झोपलो.फणशी चा आग्रह सोडून तुलनेने सोप्या अशा सिंगापूर नाळीतून सकाळी सिंगापूरला वर येत परत विहीरीवर स्नान करत एकलगाव गाठले.गाड्यात सर्व सामावल्यावर वेल्ह्यात हाँटेल स्वप्नीलमध्ये जेवणावर तुटून पडलो आणि नसरापूर मार्गे पुण्यात ६ वाजता परतलो.



आजपर्यंत केलेल्या सर्व घाटवाटांमधील सर्वात अवघड श्रेणीतील एक घाटवाट हि फडताळची ओळख कायम मनावर अधिराज्य गाजवेल.ट्रेक करत असताना अशा वाटा करण्याचे स्वप्न प्रत्येकाने बघावे पण ते प्रत्यक्षात आणताना आपली मानसिक, शारीरिक क्षमता आपण ओलांडत नाही ना ह्याचाही विचार करावा.सक्षम साथीदार, टेक्नीकल सपोर्ट, पाणी पुरवून जास्तीत जास्त चाल करण्याची क्षमता, योग्य माहिती, स्थानिक वाटाड्या आणि नशीबावरचा भरोसाही यासाठी आवश्यक आहे.तर मित्रांनो फडताळचे स्वप्न जरूर बघा आणि ते प्रत्यक्षात ऊतरवताना मला आलेल्या अनुभवाचीही ठळक जाणीव ठेवा हि विनंती.काही देण्यायोग्य माहिती सक्षम लोकांना देण्यास मला आनंद वाटेल.धन्यवाद!

भेटू परत अशाच अनवट भटकंतीसह!

सह्याद्री हे जैववैविध्याने नटलेले पर्यावरण स्थळ असून आपण ते जपले पाहिजे.






दिनांक : २७/२८ मे

घाटवाट : फडताळ
माथ्याचे गाव : एकलगाव
कोकणातले गाव : पणदेरे आणि दापोली.
योग्य वेळ : नोव्हेंबर, डिसेंबर
श्रेणी : अवघड ( दुर्गम, पाण्याचा अभाव, ठिसूळ दगड, भयंकर ऊतार आणि त्याचा खुलेपणा, जंगलात नसलेली पाऊलवाट)

साथीदार : मिलिंद कुलकर्णी, एन डी गवारे, सुजाता रायगडे, देवा घाणेकर, सुनील पाटील, विराग रोकडे, क्रांतीवीर, प्रशांत कोठावदे आणि तुषार कोठावदे.





Thursday 1 June 2017

जावळीचे रत्न - कोळेश्वर!




           मे महिन्याच्या मध्यावर पाण्याचे बहुसंख्य स्रोत आटलेले असताना आणि तळपत्या आग ओकणारया सूर्याच्या धास्तीने बहुसंख्य सह्याद्रीत भटकणाऱ्या आमच्यासारख्या भटक्यांना सवंगडी मिळणे जिथे दुरापस्त तिथे एक दोन नव्हे १४ हौशी लोक जमा होणे यासारखे आश्चर्य नाही.पण सातत्याने नवीन वाटा पालथ्या घालताना असे साथीदार आता विश्वासाने जमा होऊ लागलेत.अनुभवी काही नवीन पण ऊत्साही सह्यमित्रांना घेऊन यावेळी भटकंती ठरली ती वाईपासून ३८ कि मी आत असणारया जोर या गावाला मध्यवर्ती ठेवून त्याच्या ऊत्तरेला पसरलेले कोळेश्वर पठार आणि दुसरया दिवशी बहिरीच्या घुमटीवरून आँर्थर सीट ( मढीमहल) चढून क्षेत्र महाबळेश्वरच्या मागून जोरला ऊतरणारया गणेश घाटातून जोर परत असा वर्तुळाकार ( loop ) ट्रेल! विनीत दातेंनी नियोजनाची पूर्ण जबाबदारी ऊचलली, वाटाड्या ठरवून जेवणाची सोय करण्यापर्यंत!


शुक्रवारी रात्री १०.३० ला पुण्यातून निघून वाई नंतर बलकवडी धरणाच्या कडेने धोम धरणाच्या मागे असणाऱ्या जोरला रस्ता शोधत पोहचलो तेव्हा २.३० वाजलेले.महादेव मामा हे स्थानिक वाटाडे एवढ्या रात्री जोरच्या सीमेवर आमचे स्वागत करायला आले आणि त्यांनी कुंभळजाईच्या कौलारू मंदिरात झोपण्याची सोय लावून दिली. काही क्षणातच ऊद्याच्या आव्हानाचा विचार करत सर्वांच्या स्वारया गुडूप झाल्या.



पहाटे ५.४५ ला सर्वांना जागे करुन सकाळची आन्हिके ऊरकत मस्त गरमागरम पोहे आणि चहा घेऊन महादेव मामा आणि बाळू मामा ह्या वाटाड्यांच्या द्वयी समवेत १४ भिडू ऊंच आणि लांबलचक पसरलेल्या कोळेश्वर च्या पठारास भिडले.वाट तशी वनराजीने नटलेली पण छातीवर चढणारी. 




हळूहळू ऊगवतीच्या प्रकाशासह पहिल्या दोन टप्प्यात वर जाताना चांगली दमछाक होत होती.वाट तशी सोपी , कालच पडून गेलेल्या वळवाच्या पावसान रान भिजल होत त्यामुळे घसारा कमी जाणवणारा! 



साधारण तासभर चढाईनंतर वर पठारावरच्या घनगर्द जंगलात पोहचलो.हवा आल्हाददायक होती.कोळेश्वरची ऊंची जवळपास रायरेश्वर आणि महाबळेश्वर एवढीच!



आता आम्ही ठरवलेला बेत सुरुवातीला कोळेश्वराचे दर्शन घेऊन मग पश्चिम टोक गाठायचे आणि परत येताना पूर्व टोक पाहून खाली ऊतरायचे.पण बाळूमामा आमचा बेत शांतपणे ऐकून घेत म्हटले की आता आपण पूर्व टोकाच्या जवळ आहोत तर दर्शन घेऊन ते पाहून घ्या नंतर पश्चिम टोकाकडे जाऊ आणि वाटेत पाण्याच्या ठिकाणी जेवण ऊरकू.स्थानिक वाटाड्या ह्या दरयाखोरयात वाढलेला त्याच्या अंगाखांद्यावर खेळलेला त्यामुळे काही अपवाद वगळता त्याचा शब्द शक्यतो मोडू नये असा अनुभव गाठीशी असल्याने त्यांचा प्रस्ताव आनंदाने स्विकारला.येथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावी वाटते आपली शारीरिक क्षमता आणि अनुभव कितीही असूदे  पण  कायम आपल्याबरोबरचा सर्वात कमी क्षमतेच्या माणसाला बरोबर घेऊन सुरक्षित भटकंती करताना स्थानिक माणसाचे म्हणणे नक्की ऐकायला हवे.असो.


पूर्व क्षितीजावर केंजळगड आणि दूरवर कमळगड ऊजवीकडे म्हणजे दक्षिणेकडे पाचगणीपासून आँर्थरसीटपर्यंत पसरलेले महाबळेश्वर चे पठार आणि ऊत्तरेला अफाट रायरेश्वर! अशा संगतीने घनगर्द जंगलातून कोळेश्वर चे मंदीर हसतखेळत अर्ध्या तासात गाठले.



तिथे कोळेश्वर चे दर्शन घेत थोडा अल्पोपहार ऊरकला.तेवढ्यात जांभळाच्या झाडावर नजर गेली.आकाराने छोटी पण सुमधूर जांभळांनी सर्वांना बालपणाचे दिवस आठवले आणि जीभ ओठ रंगेपर्यंत ह्या रानमेव्याचा आस्वाद सगळ्यांनी घेतला.तेथून अगदी थोड्या म्हणजे २० मिनीटात आम्ही पूर्वेच्या टोकाजवळ असणाऱ्या आणि कोळेश्वर वर असणाऱ्या एकमेव मानवी वस्तीजवळ (तीही दोन घरांची) पोहचलो.



थोड पुढ जाताच धोमचा जलाशय मागे कमळगड ,एल्फिन्स्टन पाँईंट, रायरेश्वरची जांभळी कडची बाजू असा नयनरम्य नजारा पटलावर ऊभा ठाकला.




किती पहावे आणि किती छायाचित्र बद्ध करावे? तिथूनच खाली जांभळीला कोळेश्वराशी जोडणारे कोळीयाचे दार ही सुंदर वाट ऊतरते.


बराच वेळ झाला मग ऊरलेल्या ट्रेकचा अंदाज बघून जड पावलाने पश्चिम टोकाकडे निघालो. धनगरांच्या घराजवळ एक पाण्याचा झरा असून त्याला मे महिन्यात ही पाणी असते.


आता वाट रायरेश्वर च्या बाजूने कधी मोकळी तर कधी जंगलान वेढलेली.साधारण १ च्या सुमारास पाण्याचा दुसरा झरा लागला आणि आम्ही वनभोजनास विसावलो.


एकमेकांना घरचा डबा शेअर करत निवांत भोजन ऊरकले.जरा पोट जास्तच भरले म्हणून सगळे तिथेच जागा पाहून वामकुक्षीसाठी पसरले.( एवढे श्रम करूनही ट्रेक करताना वजन वाढतेय त्याला बहुतेक हेही कारण असावे).


आकाशात ढग जमा व्हायला लागले आणि मग आवरते घेतले.आता २.३० वाजलेले.सगळे बरयापैकी वेगाने पश्चिमेकडे सुटले.



तरीही वाटेत संधी मिळताच शिंदीच्या मधुर रानमेव्याचा मोह काही सुटला नाही.


 सर्व भिडू दमदार असल्याने आणि सर्व प्रकारची तयारी असल्याने अशा विरंगुळ्याची फारशी चिंता नव्हती.थोड पुढ गेल्यावर बाळूमामांनी आमचे लक्ष डावीकडे टेकडीकडे वेधले.ब्रिटीश काळापर्यंत येथे लोखंडाची खाण होती आणि धावड लोकांची वस्ती होती ही महत्वपूर्ण माहिती त्यांनी दिली.परत जाताना वस्तीचे अवशेष आणि खाणीचे अवशेषही निरखले.पूर्वी धातू मिळवण्यासाठी असणाऱ्या ह्या खाणी दुर्मिळ अवशेषांसारख्या आणि आपल्या पूर्वजांच्या पुढारलेल्या बुद्धिमत्तेची साक्ष देणारया !


४.३० च्या आसपास पठाराचे पश्चिम टोक गाठले आणि समोरचे रौद्र तितकेच मंत्रमुग्ध करणारे सह्याद्रीचे रूप पाहून विस्मयचकित होत सारे स्तब्ध झाले.कुठल्याही शब्दात किंवा छायाचित्रात ते ऊतरवण्याची क्षमता माणसात नाही.एवढा ऊपद्व्याप करून ईथपर्यंत पोहचल्याचे सार्थक झाले.समोर रायरेश्वर आणि त्याचे नाखिंद टोक, कामथे घाट, जननीचा डोंगर किंवा मोहनगड, कांगोरीगड ऊर्फ मंगळगड, महादेव मुर्हा, चंद्रगड आणि ढवळे खोरे क्षितीजापर्यंत पसरलेल्या अजस्र सह्याद्रीसमोर पुन्हा पुन्हा नतमस्तक व्हावे असे हे सर्व काही! कितीतरी क्षण स्वत:ला विसरून आम्ही त्या नजारयाला आत ह्रदयाच्या कुपीत जतन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो.पण पावसाची शक्यता असल्याने महादेव मामांनी भानावर आणले आणि अनिच्छेने परत निघालो.




आता जोरच्या बाजूला तासभर चालत एका नवीन पण थेट कुंभळजाई मंदिराच्या शेजारी ऊतरणारया अवघड घसारयाच्या वाटेवर आलो.अतिशय काळजीपूर्वक ऊतरत एकदाचे कठीण आणि विनाआधार दरीला खेटून ऊतरणारया टप्प्याला ओलांडत खालच्या दांडाला लागलो.



वाईच्या बाजूने पाऊस कोळेश्वर पठारावर पोहचत होता आणि आम्ही त्याला हुलकावणी देत त्याने गाठायच्या आत मंदिर गाठले.

कोळेश्वरची आजची सफर माझ्या सर्वोत्तम भटकंत्यापैकी एक म्हणून कायम लक्षात राहील.जोरपासूनच्या दोन वाटा, पुर्व ते पश्चिम पूर्ण पठाराची चाल, वरचे घनगर्द कमी हस्तक्षेप असणार रान, मे महिन्यात पाझरणारे झरे, पूर्व आणि पश्चिम टोकावरून दिसणारा सह्याद्रीचा नजारा हे सर्व एका दिवसात खात्यावर जमा झाले.या आनंदात मस्त भोजन करुन आणि ऊद्याच्या बहिरी, आँर्थर, गणेश घाट या अजून एका जबरदस्त पायपीटीची स्वप्ने बघत झोपी गेलो!

धन्यवाद!

साथीदार : 



सह्याद्री हे जैववैविध्याने नटलेले पर्यावरण स्थळ असून आपण ते जपले पाहिजे .