Wednesday 1 April 2020

"नांगरदरा : मोरोशीच्या भैरवाचे तिसरे नेत्र" - भाग २

         

पर्वत चढाई साठी जितके कठीण तितकेच त्यांचे अनुभव कठीण नारळाच्या आतील मऊशार गाभ्यासारखे!
 
सुरुवातीला दिलीपसर आणि संजय एकामागे एक चढाई करत वरच्या बाजूला दोर बांधायची जागा शोधत निघाले पण बराच वेळ त्यांचा आवाज येईना.आता अंधार पण दाटलेला.खरतर आहे ती जागा मुक्काम करायला योग्य होती पण वरच्या बाजूला कुठतरी अजून चांगली जागा मिळते का असा दिलीप सरांचा प्रयत्न असावा.सगळे जण दिवसभराच्या श्रमाने खूप थकलेले आणि अस्वस्थ होते.जेव्हा तुम्ही सलग चालता तेव्हा जेवढे थकणार नाही एवढा दम दोराचे नियोजन करेपर्यंत वाट बघणे, तीही घोड्यासारखी सरळ उभं राहून आणि परत जीव मुठीत घेऊन पुढचा टप्पा गाठणे, जे आधी होतं ते बरं होतं याची जाणीव करुन देणारा याने लागला होता."आगीतून निघून फुफाट्यात" ही म्हण अशाच कुठल्या अनुभवानंतर जन्माला आली असावी.

एकदाचा वरून आवाज आला की दोराला पकडून हळूहळू वर या.आता अंधारात हेडटाँर्च च्या प्रकाशात डावीकडे असणारी दरी जरी दिसत नसली तरी दूरवर लुकाकणारे दिवे आपण कोणत्या उंचीवर आहे याची सतत मनाला भिती दाखवणारी.हातपाय या थोड्या विश्रांती नंतर अजून शिथील झालेले.एक एक जण वर जाताना माझा तणाव अजून वाढायला लागला.पायाखाली घसारा आणि अधूनमधून कातळ आणि जवळजवळ ९० अंशाच्या कोनात वर चढाई! आणि ज्याची भिती होती तेच व्हायला लागले.एका अवघड कातळावर एक जण अडकला.ना खाली ना वर ! कसेबसे एकाने खाली जाऊन त्याला आधार देऊन सोडवल आणि बाजूच्या नाळीत दोघ बसले.मी शेवटी एकटाच खाली!

आता वरून बिले देऊन त्याला खेचून घेणे हेच योग्य होते कारण लोंबकळून त्याच्या हातापायाला क्रँप आलेले आणि या प्रकारात मानसिक  दृष्ट्या तो खचून गेला होता.मग वरुन दिलीपसर स्वतः खाली यायला निघाले पण हा प्रकार बघून मला स्वतः वर असणारा विश्वास डळमळीत झाला.मग मी वर येऊ का? अस विचारून दोर पकडला पण खरोखरच हे अवघड होत.आता मी खाली त्या दोघांपाशी नाळेत जाव अस त्यांना वाटत असावं पण आता जर इथ थांबलो तर कदाचित यांची वर येण्याची मानसिक तयारी होणार नाही हा विचार मनात आला आणि तसच वर निघालो. ठिकठिकाणी नाळीत कड्याला चिकटून जागा मिळेल तस सगळे बसलेले, त्यांना ओलांडून अजून वर जिथे हिरासर आणि परमभैया दोर अँकर करून बसलेले तिथवर पोहचलो.कड्यात कोरलेल्या पायरयांवर कसबस सांभाळून बसलो पण हातपाय हालवायला जागा नाही आहे तसच बसायच नाही तरी समोर आणि डावीकडे असणाऱ्या दरीत एक टप्पा आऊट!

दिलीपसर खाली गेले आणि मग हार्नेस बांधून दोघांना वर खेचले.परमभैया हे दोर खेचायचे काम करत होते तेही त्यांच्या पायाखाली अस्थिर दगडं! थोडा पाय हलवला तर १० फूट खाली बसलेल्या कोणाचा तरी दगड पडून कार्यक्रम व्हायचा! खालच्या बाजूला दोघ पोहचले आणि सर परत वर गेले दोर घेऊन! अर्धा तास काही उत्तर नाही.संजय वर गेला तोही उत्तर देईना.माझ्याही वर विजय बसलेला तो अजून अवघडल्या स्थितीत! माझी पण वाटच लागलेली.थोडी चिडचिड होत होती की अजून कस हे लोक वर बोलवेनात! 

मग अचानक संजयने आवाज दिला आता रात्रीचे ९ वाजलेत सर्वांनी आहे त्याठिकाणी थांबायचे.उरलेली चढाई उद्या उजाडल्यावर!  जागेवर दोराला अँकर करा आणि जेवण करुन घ्या.सगळे शांत! पण विजय आणि मी न खाली न वर! मग विजयनेच विचारले मी वर येऊ का? जागा आहे का? संजय म्हटला बरं ये पण जागा कमी आहे.तो दोराला पकडून गेला.परमभैया आहे तिथेच बाजूला हिरा सर जेमतेम नाळीतील कातळाला टेकून उभे! मला जागा नाही. मग मीही वर गेलो.

खरतर त्यावेळी कड्यात खोबण्या पकडून आणि एका हातात दोर गुंडाळून वर जाणे ही कठीण गोष्ट होती पण पर्याय नव्हता.वर पोहचलो तर एक प्रचंड घसारा साधारण १५ फूटाचा आणि त्यानंतर २ फूट कातळाच्या जागेवर तिघ बसलेले.कसबस आहे ती ताकद वापरत दोर ओढून त्यांच्यापाशी पोहचलो.मग त्यांच्या शेजारी जागा करत बसलो आणि मग मलाही त्यांनी दोराला अँकर केले.आज रात्र इथेच बसून काढायची.समोर १८०० ते २००० फूट दरी वर कडा आणि छोटीशी लेज ज्यात दिलीपसर, संजय, विजय आणि मी आमच्या पाठपिशवी सह! दूरवर खाली माळशेजकडे जाणारा महामार्ग आणि गावातील लुकलुकत असणारे दिवे असा नजारा! काही खाण्याची इच्छा मरून गेलेली.काही संत्री खाल्ली आणि पाणी प्यालो.पाठपिशवी मधून विंड शीटर जे मी नेहमी बाळगतो कसेबसे काढून चढवले.स्लिपींग बँग काढून करणार काय? खाली कातळ पार्श्वभागाला टोचत होता आणि पाय दुमडून एका दगडाच्या होल्डवर रुतवून ठेवले होते.अँकर असल्याने खाली पडणार नव्हतो पण झोप येण्याची शक्यता नव्हती.फारतर ग्लानी येऊन डोळे मिटणार! 


दिलीपसर तर एकदम कड्याच्या बाजूला स्लिपींग बँग काढून चक्क झोपले! खाली गावात कोणाचे तरी लग्न असावे त्याचा डीजे चा आवाज कड्यावर दाणदाण आदळत होता परत एकच टोन! हे सर्व रात्री २ ते २.३० पर्यंत चाललेले.मध्येच थोड पुढं सरकूून सू केली ! आता सकाळ होण्याची वाट बघत मध्येच बसल्या बसल्या डुलकी आणि परत जाग यायची! खाली कातळची टोक टोचत असल्याने कधी डावीकडे जोर द्यायचा कधी उजवीकडे! दिलीप सर मात्र गुडूप! संजय आणि विजयही थोड पाय लांब करून झोपलेले.

जीवनात अनेक अनुभव घेतले पण असा अनुभव आपल्या आतल्या शक्तीची जाणीव करुन देणारा ठरला.उजाडताच समोर अफाट प्रदेश दिसायला लागला अगदी आजोबापासून कळसूबाई पर्यंत आणि हरिश्चंद्रपर्यंत! खाली इवलीशी गावे सगळीकडे विखूरलेली.आता येथून आपली सुटका होणार या आनंदात साथीदारांना आवाज दिला."सकाळ झाली रे"चला आवरा! 

परत एकेकाला आम्ही होतो तेथपर्यंत वर घेतले आणि तोपर्यंत मी आहे त्याच जागी! रात्री १० पासून सकाळी ११ पर्यंत! कारण सगळे जसे आले तसे दोर घेऊन दिलीप सर परत वरचा कडा येंगून पुढं! संजय त्यांच्या मागे जरा वरचे नजरेला येईल किंवा त्यांचा आवाज येईल इतका चढला.साधारण २५ फूटाचा कातळ होता पण मागे भयावह दरी आ वासून उभी! चुकीला क्षमा नाही! मग एकंदर लक्षात आले २०० फूट दोर अपूर्ण आहे कारण मध्ये अँकरला जागा नाही. आपण तयारीने गेलो तर कुठली वस्तू उपयोगाला येईल ते सांगता येत नाही. श्रीकांतला आमच्या १० फूटी प्रत्येकी अशा ६/७ स्लींग दिल्या त्याने आपल्या बेसिक माऊंटेनियरींगच्या मध्ये शिकलेल्या "फिशर नाँट"प्रकारच्या गाठी मारून एका मागून एक सर्व दोराला जोडल्या.

मग कुठेतरी सरांनी अँकरला जागा शोधली.दोर जेमतेम कातळाच्या खाली आला.अँकर सेल्फ असेल किंवा साधा बोल्डरही असेल खालून काही कल्पना नाही. म्हणून एक जण वर जायचा तो अगदी ठराविक ठिकाणी पोहचेपर्यंत बाकी थांबून रहायचे असे करत मागे हिरा काका आणि मी राहिलो.मग काका म्हटले तू चल मी तुझ्या मागून येतो.तोपर्यंत काकांच्या प्रोत्साहनाने दोर न पकडता तो कातळ त्यातल्या कोरलेल्या खोबण्या पकडून पण मागे वळून न घेता पार पाडला होता कारण दोरावर वर अजून कोणीतरी असले तर त्याला हिसका बसण्याची शक्यता होती.

वर जाऊन बघतो तर दिलीप सर परत नजरेच्या टप्प्याबाहेर पण दोराच्या मध्येच एका अवघड जागी संजय दिसला.तो एकेकाला पुढे पाठवत होता.मीही हळूहळू त्याच्यापर्यंत पोहचलो आणि वर त्याहून अवघड ७० अंशाची उजवीकडून वळून डावीकडे जाणारी वाट दिसली.पण दोर तर सरळ दरीच्यापासून गेलेला.मग संजय म्हटला भाऊ दोर सोडा आणि उजवीकडून हळू जा! आता बाकी गेले म्हणजे मीही जाणार एवढेच समाधान!पण हे खतरनाक प्रकरण होते.कसेबसे मध्ये एका बोल्डरपाशी पोहचलो. तिथून वर दूरवर दिलीपसर एका मध्यम आकाराच्या बोल्डरला दोर अडकवून तो निघू नये म्हणून त्यावर बसलेले दिसले.मला आहे तिथेच थांबायला लावून मग हिराकाकांना वर घेतले आणि दोर वर खेचून संजय पर्यंत आणला.आता त्या १० मिनिटात मी पुढची वाट कशी चढायची या चिंतेत तर खाली बघायची सोय नाही. पाय जेमतेम रोवलेले.मग इशारा मिळताच वर सरकलो आणि मग शेवटी दोराला पकडतच वर दिलीप सरांच्या मागे जिथे बाकी बसले होते तेथे जाऊन बसलो पण इथेही पाय खाली दगड बघून रोवून बसायला लागले कारण थोडा घसरलो तरी भैरवाच्या पायाशी पण थेट कैलासावर!

मग हिराकाका संजय आले आणि परत वरात उजवीकडे अजून घसारयाचा भाग ओलांडत खिंडी खालच्या नाळीत.पण आता खिंड नजरेच्या टप्प्यात म्हणजे १०० फूट वर होती.हळूहळू सगळे दोर पकडून शेवटच्या ३० फूट चढाईच्या जागी पोहचले आणि मग दोर पकडून चिमणी क्लाईंब करत वर खिंडीत!

तिथून पुढे डावीकडून दौंड्याच्या कड्यातून ट्रँव्हर्स मारत एका अतिसुंदर पाणवठ्यापाशी आणि कोरड्या धबधब्यापाशी थांबून भेळ भत्ता सरबत आणि २ लिटर पाणी असा कार्यक्रम पार पडला.संध्याकाळचे ४ वाजलेले पण आता चिंता नव्हती.आम्ही कसेही करून अंजनावळेपर्यंत पोहचणार याची खात्री होती.दरी आणि जंगलाच्या मधून कोकणाच्या बाजूने नितांतसुंदर वाटचाल करत अंजनावळे पठार गाठले आणि त्याची अंजनावळेकडची एक सोपी वाट उतरत रात्री ८ ला अंजनावळेमधील एका घरात चहापाणी, जेवण उरकले.दरम्यान एक गाडी ठरवली त्याने आम्हाला मोरोशी सोडले.रात्री १२ वाजलेले मग तेथेच आराम करुन सकाळी उठून आपापल्या गावी सगळे रवाना झाले.

जीवनात अनेक ट्रेक केले, अनेक थरारक वाटा केल्या पार मे मध्ये फडताड, माकडनाळ, गायनाळ यासारख्या सुद्धा.पण नांगरदरा उर्फ भिल्लीणीचा पुड ही वाट आमच्या सर्व संयमाची, सहनशीलतेची कसोटी बघणारी होती.शारीरिक, मानसिक क्षमतेचा एक क्रँश कोर्स आम्ही सह्याद्रीच्या विद्यापीठात आज गुणवत्तेसह पूर्ण केला होता.

मित्रांनो खरतर हा अनुभव मी लिहीणार नव्हतो पण आपल्याला सह्याद्रीची शिकवण आहे नितळ आणि स्वच्छ मनाने वाटून टाकण्याची त्यामुळेच हे लिहीतोय.

नांगरदरा किंवा भिल्लीणीचा पूड ही नेहमीची घाटवाट नसून तो एक टेक्नीकल क्लाईंब आहे आणि तोही आपल्याकडे कितीही अनुभवी मार्गदर्शक असतील किंवा साहित्य असेल तरी देवाच्या भरवश्यावर एक एक टप्पा पार करण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. कारण अँकरींगला जागा नाही, झाड नाही, कातळ नाही आणि आपली सोबतीण कारवीही नाही असा ६०% भाग आहे.कातळात असणारया पायरया किंवा खोबणी ३/४ ठिकाणी आहेत पण त्या संपूर्ण वाटेच्या ०.०१ टक्का पण नाहीत. 

माझ्या मताने ही वाट करू नये!आणि अगदीच करायचे ठरवले तर सर्व काळजीसह नोव्हेंबरमध्येच करावी कारण तेव्हा गवत असल्याने पाय घसरणार नाहीत. 

दिनांक :
पायथ्याचे गाव :मोरोशी, फांगुळगव्हाण
माथ्यावरचे : अंजनावळे
पाणी: भैरवगड टाक्यानंतर थेट दौंड्या खिंडीत!
श्रेणी : तांत्रिक अवघड
योग्य वेळ : नोव्हेंबर / डिसेंबर
साहित्य : ३०० फूटाचे २ दोर आणि वैयक्तिक सुरक्षा साधने.

टिम : हिरा पंडीत काका आणि दिलीप झुंजारराव सर, मुंबई
संजय अमृतकर नाना, डॉ. भोजराज गायकवाड, परमजीत भैया, श्रीकांत पाटील, नाशिक
मिलिंद कुलकर्णी, संजयभाऊ शेळके, विजय गुर्जर, तुषार पोमण आणि तुषार कोठावदे, पुणे.

छायाचित्रे : डॉ. भोजराज गायकवाड, विजय गुर्जर, श्रीकांत पाटील आणि तुषार कोठावदे.

विशेष धन्यवाद : हिरा पंडित काका, दिलीप झुंजारराव सर आणि गुरुवर्य नाना!

नांगरदरा : मोरोशीच्या भैरवाचे तिसरे नेत्र

"The choices we make lead up to actual experiences. It is one thing to decide to climb a mountain. It is quite another to be on top of it. "

Herbert A. Simon

समोर हिरव्यागार झाडांनी वेढलेली फारसा मानवी हस्तक्षेप दिसत नसलेली दरी बघून माझ्या तोंडून आपसूक शब्द फुटले "स्वर्गाचे दार"! हो "Door to Heaven" !! बाजूला उभ्या असलेल्या परमभैयाच्या चेहरयावरचे भावही हेच होते.

दौंड्या पर्वताच्या खिंडीत पोहोचताना दुपारचे दोन वाजलेले, अजून काही सवंगडी खाली कड्यापाशी चढाईच्या प्रतिक्षेत होते!शेवटचा ३० फूटाचा कातळ दोराच्या सहाय्याने चढून इतर लोक वर येईपर्यंत मी खाली झाडाखाली विसावलो आणि काल सकाळी ७.३० ला मोरोशीहून सुरु झालेली ही चढाई आता संपली आहे या अवर्णनीय आनंदाने दोनचार घोट पाणी पित पाठपिशवी ला टेकत इतरांची वाट बघू लागलो.खरतर अजून अंजनावळेपर्यंत पोहचायला ४/५ तास लागणार होते पण ती चाल आपण कालपासून जे अनुभवतोय त्यामानाने किरकोळ आहे याची मला खात्री होती.

नाशिक पुणे सह्यमित्रमंडळाच्या यादीत आज गिर्यारोहण क्षेत्रातील दिग्गज हिरा पंडीत काका आणि दिलीप झुंजारराव सर यांच्या सोबतीने एका अतिशय अवघड आणि अशक्य चढाईची "नांगरदरा"वाट सुरक्षित जमा झाली होती.नानांच्या आग्रहाखातर ऐनवेळी तयारी करुन येताना हा मार्ग किती कठीण आहे याची जाणीव आमचे सह्यसवंगडी दिलीपभाऊ वाटवे यांनी टाकलेलया एका चित्रफिती वरुन आली होतीच पण ज्याचा विचार केला होता त्यापेक्षाही कस बघणारी ही चढाई होती.

रात्री उशिरा नाशिक, पुणे, मुंबई येथून सर्व जण मोरोशीच्या भैरवनाथ ढाब्यावर जमले.सकाळी उठून आवरून खराब होऊ नये म्हणून ताजी पाणी न टाकता बनवलेली मटकी ऊसळ मनूकडून पार्सल घेतली, बाकी चपाती, दशमी आणि इतर खाण्यापिण्याच्या गोष्टी सोबत होत्याच पण मुख्यत: प्रत्येकी ४ लिटर  पाणी जे भैरवगडाच्या टाक्यावर परत भरून घ्यायचे ठरले तेही होते.

सुरक्षा साधने म्हणजे स्क्रूगेट, हेल्मेट, स्लींग, दोर, मेखा सर्व होत्या.हिरा काका, दिलीपसर यासोबत संजयभाऊ शेळके आणि श्रीकांत पाटील हे आमचे दोघे तांत्रिक गिर्यारोहक मदतीला! हेडटाँर्च, स्लिपींग बँग इ.महत्वाच्या गोष्टी पण सोबत आवर्जुन घेतलेल्या! थोडक्यात सर्व तयारीनिशी आणि योग्य मार्गदर्शनाखाली आम्ही हे साहस करणार होतो.ऐनवेळी येणाऱ्या अडचणी ला तोंड द्यायलाही या सर्व बारीक सारीक गोष्टीसह आमच्या प्रत्येकाची तयारी होती.

मोरोशीच्या कमानीतून भैरवगडाच्या पायथ्याशी जाणारी वाट तशी रूळलेली कारण प्रत्येक गिर्यारोहकाला आपण मोरोशीच्या भैरवगडाच्या पायरया चढून आणि उतरुन आल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही याची जाणीव असते.

हळूहळू वर जाताना सकाळ च्या रम्य वातावरणात मजा येत होती.आज नानांच्या शब्दाखातर ज्यांनी महाराष्ट्रात गिर्यारोहण क्षेत्रातील कातळरोहणाची चळवळ चालू केली असे हिराकाका आणि दिलीपसर असल्याचे वेगळेच अप्रूप होते.नानाच्या सर्वसमावेशक वृत्तीने आजपर्यंत अनेक थोरामोठ्यांचा सहवास लाभला आहे हे नक्की नमूद करावे असे.एका टप्प्यावर सकाळच्या सोनेरी रंगात उजवीकडे गेलेली सोंड काही जण वाकडी वाट करून पाहून आले नव्हे छायाचित्रे काढण्यासाठी मुद्दाम गेले. दरम्यान उजवीकडे भोरांड्या च्या दाराच्या दिशेने कसे जाणार याविषयी गुरुवर्यांची चाललेली चर्चा समजून घेण्याचा मी प्रयत्न करत होतो.

भैरवगडाच्या कातळचढाई मोहिमांसाठी मुक्काम करण्याची जागा काही वेळात आली.सकाळच्या थंड वातावरणात तिथली हिरवीगार दाट झाडी अतिशय सुखद होती.त्यानंतर सरळ भैरवगडाच्या कातळभिंती कडे जाणारी ६० अंशाची चढाई करत आम्ही भैरवच्या दक्षिणेकडे म्हणजे मोरोशीच्या दिशेने असलेल्या कातळातील थंडगार खांबटाक्याच्या पाशी विसावा घेतला.छान गप्पा गोष्टी करत वर जाऊन टाक बघून पोटभर पाणी प्यालो आणि सगळ्यांनी सर्व पाण्याचा साठा १००% भरुन घेतला.आता पाणी थेट दौंड्याच्या खिंडीतून खाली उतरल्यावर मिळणार होते.

टाक्यापासून पूर्वेस जाऊन भैरवगडाच्या मागच्या भिंतीपाशी जिथून सुप्रसिद्ध कातळातल्या अवघड पायरया आहेत तिथ जायला निघालो. ती चढाई पण तशी नवख्या माणसाला कठीणतेची कल्पना देणारीच आहे.अगदी २० मिनिटात आम्ही बरोबर पायरयांच्या खाली असणाऱ्या खिंडीत पोहचलो.तिथे एक ग्रुपफोटो नानांनी घेतला आणि तिथून दौंड्याची खिंड बघत असताना सरळ घसारा चढ बघून खरया आव्हानाची जाणीव सर्वांना झाली. पायरया, खोबण्या आहेत म्हणजे वाट आहे ही एकच दिलासा देणारी नोंद असल्याशिवाय या ठिकाणी चढाई करायला कोणी धजवणार नाही. असो.

वेळ शनिवार सकाळी ९ ची.एक घसारयाचा चढ चढून आम्हा सर्वांना एका जागी थांबवून हिराकाका आणि दिलीपसर पुढे वाट बघायला निघाले आणि आम्ही भैरवच्या पायरया कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय चढणाऱ्या ५/६ मुलांची गंमत बघत थांबलो.गुहेपासून वर त्यांना चढताना पाहून न राहवून मी चार गोष्टी सुनावल्या पण तरीही दोन आगाऊ कार्टी वर गेलीच.मात्र बाकी घाबरून थांबले.१५/२० मिनिटात वरुन दोर लावल्याचा आवाज दिलीप सरांनी दिला आणि कसेबसे दोराच्या खाली पोहचलो.इथून डावीकडे भयंकर दरी आणि उजवीकडे ८० अंशाची चढाई चालू झाली ती अजून भयप्रद उंची गाठत दौंड्याच्या खिंडीपर्यंत कायम राहिली.



एक एक जण दोर पकडून वर १५० फूट चढला आणि खालची जागा लय भारी होती अस वाटायला लागले.अगदी कातळाला पाठ चिकटून समोर ७००/८०० फूट खोल दरी असे सगळे उभे राहिले काही बसले.सर्व वर आले आणि दिलीप सरांनी दोर कमरेला गाठ मारत गुंडाळून तशा खतरनाक वाटेवरून परत डावीकडे समांतर वाटचाल चालू केली.परत ते आमच्या नजरेआड! मग दोराच्यालांबीचा अंदाज घेत परत बोल्डरला अँकर करून आवाज दिला.जीव मुठीत घेऊन आणि दोर पकडत परत आम्ही अँकरपर्यंत पोहचलो.


ईथे पहिल्या ७/८ पायरया दिसल्या आणि वाट बरोबर असल्याची खात्री पटली.पण पायरया म्हणजे एखाद्या मुलाला दिवसभर घरात डांबून ठेवायचे आणि एखादे चाँकलेटचे आमिष दाखवायचे इतकेच नुसता दिलासा देण्यापुरत्या!
मात्र आता अंगावर असणारा छोट्या नाळीसारख्या जागेतून वर जाणारा कातळ! खाली न बघता वर पकड घेत सावकाश वर चढलो आणि मग परत तिरपी वर चढणारी घसारयाची वाट! 


कुठं बुड टेकायच समाधान या वाटेत असण्याची शक्यता संपुष्टात येत होती.एकदा चक्रव्यूहात घुसलो की एकामागून एक अवघड कोडी आणि त्यातून मागे येण्याचा दरवाजा बंद!

आता मात्र सहनशीलता तपासणी चालू झाली होती.डावीकडून डोळे फिरवणारी दरी उजवीकडे तसाच उंच ७० अंशाचा घसारा, ना कारवी, ना कातळ ना झाडं! बरं एका जागी पुढची व्यवस्था होईपर्यंत थांबावे तर पायाखालची भुसभुशीत माती दरी कडे घसरायची, पकडायला काही नाही. काठी गाडायची आणि बर्फात क्रँपाँनने करतो तशी डोंगराकडच्या बाजूची माती उकरायची बुटानं आणि स्थिर व्हायचं!

इथे आता एक गडबड झाली. समोर वाट अजून अवघड घसारायुक्त असल्याने आणि दोर बांधायला जागा नसल्याने हिरा सरांना वाटले की वर कातळकड्यापर्यंत जाऊन ट्रँव्हर्स मारावा.दिलीप सर मात्र सरळ गेले.मग संजय शेळकेने दोर कमरेला गुंडाळत वर कड्याकडे चढाई चालू केली.तो कसाबसा एका अवघड जागी पोहचला जो की खालून आम्हाला दिसेना.मग मोठ्या मुश्किलीने एका जागी दगडाला पाय रोवून बसत आम्हाला वर येण्यासाठी दोर पकडून यायला त्याने सांगितले. मग एक वर जाईपर्यंत दुसरा खाली अस करत एक एक जण वर चढाई करु लागला.दोर हा संजयला अँकर असल्याने त्यावर फार भार द्यायचा नाही. फक्त आधारापुरता धरायचा आणि बाकी फ्री क्लाईंब! 


त्यात सगळे वेगवेगळ्या टप्प्यात आणि हिरासर वर जाऊन बघतात तर तिथून जाणे शक्य नाही. मग परत आहे त्या ठिकाणी परत यायची जी कसरत झाली ती तुम्ही विचारू नये आणि आम्ही सांगू नये अशी.७० ते ८० अंशाची उतराई तीही फक्त आम्हाला दोरावर लोंबकळत करण्याची सुविधा आणि दोर गुंडाळून संजय आणि हिरासर कसे उतरले असतील ही त्यांनाच कल्पना! मात्र या भानगडीत दुपारचे ३ वाजले.म्हणजे ६ तासात आम्ही फक्त दोन टप्पे चढून आणि एका अवघड घसारयावर! परत जायचे म्हटले तर तिरप परत कस उतरणार कारण अँकरींगला जागा नाही आणि दरी ९०० ते १००० फूट सरळ घसारयाची.कातळ, नाळ, झाड काही नाही! मग दोघं खाली आल्यावर त्यांच्यामागे दिलीपसर ज्या बाजूने गेले तिकडून चालू लागलो.एकामागे एक! बोलती बंद! 

माझ्यासमोर विजय त्यामागे नाना आणि त्यामागे डॉ. गायकवाड! आता डॉ चे वजन ८७ किलो! खालचे गवत त्यांचे वजन घेण्याचे कबूल करेना आणि पुढ माग व्हायची संधी नाही. कसबस त्यांना माझी कल्पना सांगत डोंगराकडचा भाग बूट घासून माती उकरुन जागा करत उभ राहण्याचा प्रयत्न करणच आमच्या हाती.बर पुढ दोर लावण्यासाठी जागा बघायला गेलेले मागे येऊ शकत नव्हते.मग सावकाश आम्ही एकमेकांना धीर देत पुढे सरकू लागलो.बर त्यातही वाट कधी खाली उतरायची तर कधी वर चढायची.आता वर चढायचे जेमतेम पाऊल बसेल अशा घसारयावर तर पाठपिशवी सह शरीर ओढणे अजून अवघड! मला स्वतः पेक्षा समोरच्यांचे प्रयत्न बघून त्यांचीच भिती वाटायची! परत थांबून आपल्याला तेच करायचं आहे हा नकळत तणाव! खालून सुरु केल्यापासून आतापर्यंत एकदाही बूड टेकून काही करता आले नव्हते आणि अजून काही तस होण्याची संधी ही नव्हती.मी पाणपिशवी घेऊन त्याची नळी समोर अडकवल्याने अधूनमधून पाण्याचे दोन घोट घेऊ शकत होतो नाही तर पाण्याची बाटली काढणे आणि परत ठेवणे ही कसरत पण मागच्या भिडूच्या मदतीने! 

काही अंतर गेल्यावर समोर अशक्य असा वक्राकार ट्रँव्हर्स आणि समोर एक झाडं! त्या झाडाला दोर बांधून एकीकडे संजय उभा.एकेकाने देवाचे नाव घेत झाड गाठले आणि संजय मागून रोप गुंडाळत आला.इथे वरून दूरून दिलीपसरांचा आवाज आला.या वाटेची गंमत म्हणजे प्रत्येक टप्पा १०० फूटांच्या पलिकडे नजरेआड! म्हणजे दोर घेऊन गेलेला माणूस काय करतो हे त्याने जागा शोधून दोर बांधेपर्यंत दिसायचे नाही आणि ईकडे काही तरी करुन पुढे गेलो तर कुठतरी विसावता येईल ही "भाबडी"आशा!सारखा आवाज द्यायचा आणि समोरचा कधी ये म्हणतो याची वाट बघायची.वेळ संध्याकाळी ६! 


आता उरलेली न दिसणारी वाट बघता आपण आज याबाहेर पडणार नाही हे नक्कीच याची खात्री पटलेली! फक्त नाळीत पोहचलो तर सुरक्षित जागी मुक्काम करता येईल  एवढीच समाधानकारक बाब आणि उद्दिष्ट! पाणी आणि खाण्याचे भरपूर असल्याने बाकी चिंता नव्हती.हेड टाँर्च प्रत्येकाने आता तयार केल्या आणि डोक्याला लावल्या.

परत एक कातळ चढत हिरासर वर गेले आणि आम्ही कसरत करत त्यांच्या मागे दोर धरून! वर परत घसारा पण काही कारवीचा आधार पहिल्यांदा मिळाला. आता डावीकडे नाळ आमच्या नजरेच्या टप्प्यात आली आणि दिलीप सर जे सकाळपासून गायब होते ते समोर दिसले.ते म्हटले अरे मी बँग वर पायरया पाशी ठेवून आलोय चला.आता उजवीकडे नाळ चालू झाली. सुरुवातीला काही १०० /२०० फूट बरी जागा आणि कमी उतार पण परत सरळसोट उभा कडा आणि नाळेतून वर जाता येणार नाही तर डावीकडे कड्याच्या बाजूने चढावे लागेल म्हणून परत दोर वर जाऊन लावला.तोपर्यंत आम्ही थोडावेळ बसून काही संत्री खाल्ल्या! सकाळपासून अन्नाचा कण नाही. डबे तसेच पाठपिशवीत! पण आता ७ वाजलेले! अंधार पडलेला.आता पुढ काय वाढून ठेवलेय याची कल्पना पुरेशी नव्हती!

भाग १ समाप्त!

धन्यवाद!