Wednesday, 25 March 2020

अज्ञाताचा शोध

किती तास झाले असतील ? 
कदाचित काही वर्षे? 

कड्यावरच्या एक एक खोबण्यामध्ये जीवावर उदार होऊन वर सरकताना खाली २००० फूट कोसळणारी कातळाची उंची अजिबात खाली नजर जाऊ नये अशी! पण असेल ती शक्ती पणाला लावून हळूवार एक एक होल्ड घेत वर वर सरकत रहाण्याशिवाय पर्याय त्याच्याकडे नव्हता.कसेबसे शेवटचा काही फूटाचा टप्पा पार करत आणि त्यावरचा घसारा पार करत माथ्यावर एका सुरक्षित जागी त्याने बसकण मारली.खरतर त्याच्या बाबतीत जे घडले होते हे अविश्वसनीय होते.

सुट्टी चे दिवस बघून पाठपिशव्या अडकवायच्या त्यात जरूरीपुरते सर्व सामान भरून सह्याद्रीच्या दरयाखोरयात गडकोटांच्या भटकंती चा छंद गेली अनेक वर्ष त्याने जोपासला होता.खर पाहता ट्रेकींगचे हे वेड त्याच्यापुरतेच मर्यादित नव्हते तर समविचारी अनेक सह्य सवंगडी त्याच्यासोबत गेली अनेक वर्ष सोबतीला होते.नवनवीन माहिती काढून फारसे कुणी फिरकत नसणाऱ्या ठिकाणांची भटकंती करायची आणि तेथील भूगोलाचा आणि ईतिहासाचा मेळ जमतो का ते बघायचे हा त्याच्या भटकंती चा एक अविभाज्य घटक आताशा बनला होता.

त्यादिवशी त्याने फोन करुन विचारले की भंडारदरा धरणाच्या मागे असणाऱ्या कळसूबाई रांगेतील अलंगच्या भटकंती साठी कोणी तयार आहे का? पण का कुणास ठाऊक त्याला एकही जोडीदार मिळाला नाही. एकट्याने कुठे भटकायचे नाही हा अलिखित नियम मोडून जाण्यासाठी त्याचे मन धजावेना अनं घरीही शांत बसणे जमेना मग त्याने विचार केला की स्थानिक वाटाड्या ज्याला तो खूप वर्षापासून ओळखत होता त्याच्या सोबतीने हा ट्रेक पार पाडावा.त्याप्रमाणे त्याने सर्व तयारी केली.स्लिपींग बँग, पाणी, खाण्याचे पदार्थ, एक शिट्टी, स्विस नाईफ, स्लींग, हेड टाँर्च, हेल्मेट, १०० फूटी दोर, कँराबिनर, प्रथमोपचार पेटी आणि बरेच काही! वर्षानुवर्षे असणाऱ्या अनुभवातून यातील कोणती वस्तू कधीही उपयोगी पडू शकते हे तो जाणून होता.

शिवाजीनगर बसस्थानकावरून भंडारदरा जाणारी शेवटची बस त्याने पकडली आणि पहाटे ५ वाजता शेंडी स्थानकावर उतरुन समोरच्या हाँटेलात पाठपिशवीला टेकून हाँटेल उघडायची वाट बघू लागला.थोडा डोळा लागला आणि ओ पाव्हणं या हाँटेलमालकाच्या हाकेने त्याची झोप चाळवली.सकाळचे ६.३० वाजलेले.त्याने शांतपणे तोंड धुवून गरमागरम बटाटेवडे आणि चहा घेतला.मामा घाटघरला जायचे आहे बस किती वाजता आहे? ही काय समोर लागली हाय.बरोबर ७ वाजता सुटेल.त्याने मामांच्या हातात पैसे दिले आणि बसमध्ये जाऊन बसला.ड्रायव्हर आणि कंडक्टर आले आणि बस निघाली. 

भंडारदराच्या विल्सन जलाशयाच्या बाजूबाजूने उडदावणे, सामरद आणि घाटघर असा १.३० तासाचा प्रवास! घाटघरला एकनाथ च्या घरापाशी उतरून त्याने आत हाळी दिली.”एकनाथ” आतून एकनाथ ची वहिनी बाहेर आली.भाऊ या ! अनेक वर्षाच्या ओळखीतून एकनाथच्या घरचेही आता त्याला ओळखायला लागलेले.वहिनींनी कोरया चहाचा कप आणि पाण्याचा लोटा आणून ठेवला.एकनाथ वाईच नाशिकला गेलाय आज घरी नाही.

झाली का पंचाईत! पण अलंगचचा रस्ता त्याच्या अंगवळणी पडलेला.त्याने तिथ निरोप दिला की वहिनी मी अलंगला वर जातोय आज गुहेत मुक्काम करणार आहे.उद्या सकाळी एकनाथ ला नाष्टा घेऊन पाठवा.आणि तो एकटाच घाटघर उदंचन धरणाशेजारून निघाला.अलंग उजवीकडे ठेवत हळूहळू गाव ओलांडून पुढच्या ओढ्यात प्रातर्विधी उरकण्यासाठी पाठपिशवी उतरवली.नंतर थोडे हातातोंडावर पाणी मारून पुढच्या उभ्या चढाला लागला.दिवस उन्हाळ्याचे होते आणि साधारण ९ वाजलेले.पहिला झाडीचा टप्पा ओलांडून वरच्या पठारावर पोहचणारया दोन छोट्या टेकड्यांची चढाई एका लयीने चढत त्याने अलंगच्या कातळभिंती खाली असणारे पठार गाठले.तिथून हळूहळू सरळ एका नाळेपर्यंत तो आला आता ही नाळ वर चढली आणि सोपे कातळटप्पे पार केले की अलंगच्या त्यामानाने सोप्या वाटेवरची शिडी आणि शाबूत पण दगडाने चिणलेला दरवाजा.

हा टप्पाही त्याने सराईतपणे पार केला आणि दरवाजाशेजारून दगडाच्या भिंतीवरून दरवाजाच्या वरच्या कातळभिंती शेजारचा निमुळता पण सुरक्षित ट्रँव्हर्स गाठला.काही वेळातच उजवीकडची वाटेतील गुहा ओलांडून मोकळ्या मैदानात तो पोहचला आता वर उजवीकडे असणारी प्रशस्त गुहा हे त्याचे आजचे मुक्कामाचे ठिकाण! साधारण दुपारचा १ वाजलेला.गुहेकडे जातानाच मैदानावरच्या टाक्यात त्याने पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या.गुहेत पण एक टाके आहे पण ते पाणी पिण्यायोग्य नसते हे त्याला माहिती होते. गुहेमध्ये पोहचताच पाठपिशवी उतरवून तो विसावला.काही वेळ आराम करुन घरून आणलेला दुपारच्या जेवणाचा डबा त्याने उघडला आणि एकट्यानेच जेवण केले.रात्रीसाठी दोन जादाच्या दशम्या असणारा डबा बंद करुन परत व्यवस्थित ठेवला आणि स्लिपींग बँग काढून मस्त ताणून दिली.

रात्रभरचा प्रवास आणि सकाळची चढाई या थकव्याने अगदी काही सेकंदातच तो निद्रादेवीच्या आहारी गेला.त्याचे डोळे उघडले तेव्हा सायंकाळचे ५ वाजलेले.हळूवारपणे स्लिपींग बँग गुंडाळून त्याने पाठपिशवी उचलत बाहेर येत अंदाज घेतला.आज शुक्रवार असल्याने गडावर कोणी चिटपाखरूही नव्हते.खरतर एखादा घाबरला असता पण त्याला सह्याद्रीच्या दरयाखोरयात कधीही भिती वाटली नाही. नाही म्हटले तर साप आणि जंगली जनावरांची मात्र थोडी काळजी होतीच.पाठपिशवी त्यामुळेच त्याने गुहेत न ठेवता बरोबर घेतली आणि गुहेच्या वरचा कातळ चढत पाण्याच्या टाक्यांचा समुह गाठला.थोडे फ्रेश होत चिकीचे पाकीट काढून उगाच दोन तुकडे तोंडात टाकले.मावळतीच्या सूर्यनारायणाच्या साक्षीने वरच्या पडक्या राजवाड्याच्या एका अखंड भिंतीभोवती चक्कर मारत वर आत जाऊन एक दोन फोटो घेतले.

राजवाड्याच्या पलिकडे एक तलाव आणि त्यापुढे उघड्यावरचे मंदिर आणि पुरातन शिलालेख गाठायला त्याला अजून अर्धा तास लागला.का कुणास ठाऊक पण न वाचता येणारा शिलालेख आज त्याला स्पष्ट पणे वाचता येईल असे वाटत होते.सायंकाळच्या गूढरम्य वातावरणात एकेकाळी गजबजलेला गड, त्याचा ईतिहास आणि शिल्लक अवशेष यांच्यामध्ये तो हरवून गेला आणि जेव्हा भानावर आला तेव्हा सरळ अजून पुढे गडाच्या दक्षिण टैकाकडे अनाहूतपणे चालायला लागला.

जणू कोणीतरी त्याला तिकडे नेत होते. अगदी शेवटच्या टोकाजवळ पोहचताच तो आश्चर्यचकित झाला.त्याला उजवीकडे एक पायरयांची वाट उतरताना दिसली.आजवर कोणीही उल्लेख न केलेली आणि कदाचित कोणीही न पाहिलेली.अंधार आता काही क्षणात दाटणार होता.पण एखाद्या जादूगाराने त्याच्या मनाचा ताबा घ्यावा असे तो त्या अवघड पायरया सराईतपणे उतरला आणि कड्याच्या बाजूला आत त्या पायरया वळत होत्या.

आत वळताच आतल्या अंधारात त्या गुडूप झाल्या आणि काही समजायच्या आत तोही त्या भुयारात आत कैक फूट घसरत जाऊन जमिनीवर पडला.त्याची शुद्ध हरपली आणि……

घाटघरच्या एकनाथ च्या घराच्या समोरच्या मैदानात रात्री ८ वाजता एक चारचाकी उभी राहिली.गाडीमधून एकनाथ बरोबर अजून दोघ उतरले.एकनाथ घरामध्ये जाईपर्यंत त्या दोघांनी गाडीमधून आपल्या पाठपिशव्या उतरवल्या.आणि शेणाने सारवलेल्या पडवीमध्ये ते विसावले.आतमधून एकनाथ पाण्याची बादली आणि लोटा घेऊन आला.डॉ साहेब हातपाय धुवा आत जेवण बनवायला सांगितले आहे.दोघही शांतपणे हातपाय धुवेपर्यंत एकनाथ आत गेला आणि आवरायला लागला.

ओ भावजी ते पुण्याचे भाऊ आलते.

एकनाथने विचारले अर् त्यांनी फोन बी केला नव्हता नाही तर थांबलो असतो वाईच घरी.

नाय वो ते वर गडावर गेले.

अजून कोण हाय संग? कोणीबी नाय बगा.एकटंच गेलेत.मी थांबा सांगेस्तोवर निगाले.

कस काय एकटं? ते कदी आस येत न्हाईत.वर गडावर आज तर कुणी बी गेल नाय इथून.

हो त्यास्नी तुमाला उद्या बोलावल हाय सकाळी भाकरी घेऊन.

बरं.

बाहेर येऊन डॉ आणि त्यांच्या जोडीदाराला एकनाथ ने वहिनीने सांगितलेली खबर दिली.डॉ पण आश्चर्यचकित झाले.चला उद्या कुलंगला जायच रद्द करु आणि वर अलंगलाच जाऊ! मागच्या आठवड्यात भाऊशी झालेले दूरध्वनीचे बोलणे आठवून त्यांना कल्पना आली की भाऊ नक्कीच त्याचा शोध घ्यावा म्हणूनच आला असेल.तशी सह्याद्री मध्ये भटकणारी मंडळी वारंवार भेटत नसली तरी त्यांची नाळ आजकालच्या सोशल मिडीयाच्या जगातही जुळलेली आहे किंबहुना आपल्याला जाणून घ्यायच्या असणारया किंवा समोरच्याला स़ागाव्याशा वाटणारया गोष्टी आवर्जुन या माध्यमातून वाटल्या जातातच.पण निदान कल्पना तरी द्यायची लवकर आलो असतो आज.
असो.

भाकरी आणि झुणका खाऊन अंगणात त्यांनी पथारया पसरलया.तशी सवयच प्रत्येक भटक्याला असते.मऊ बिछान्यावर लागणार नाही अशी झोप स्लिपींग बँगमध्ये लागते.आकाशातील तारे बघत आणि उत्तर पूर्वेला पसरलेला अलंग मदन कुलंगचा अफाट पसारा बघत कधी डोळा लागला त्यांना समजलेच नाही. 

सकाळी ६ वाजताच एकनाथ ने दिलेला गरमागरम चहा आणि पोहे खाऊन तिघं अलंगच्या वाटेला लागले.साधारण ९.३० ला च अलंगची गुहा गाठली तर गुहेत कोणीही नाही. एवढ्या लवकर उठून एकटेच असल्याने भाऊ गडफेरीसाठी गेला असेल बहुतेक.थोडा विसावा घेत त्यांनी थोड फार खाल्ल आणि पाणी पिऊन गडफेरीसाठी निघाले. 

वर टाक्यांचा समुह, राजवाडा, पुढचा तलाव आणि उघड्यावरचे मंदिर! भाऊचा काही मागमूस नाही. आता जरा त्यांना काळजी लागली.
एकनाथ आपण त्यादिवशी बघायला गेलेल्या दक्षिण टोकाकडे तर ते गेले नसतील? तिघही लगबगीने निघाले.अगदी टोकावरच्या अवघड जागेवर जिथ उभ्या कड्यात त्यांनी पायरया बघितल्या तिथवर गेले तरी काही नाही. आता मात्र एकनाथसह सगळे चिंतीत झाले. अरे हे गेले कुठं? 

लहानपणापासून या गडाच्या अंगाखांद्यावर खेळलेला एकनाथही फार क्वचितच या भागात फिरकलेला.आणि एवढ्या कठीण जागी उतरण्याचे त्याचेही काळीज नव्हते.किमान दोर लावून बिले घेऊनच जावे असे हे ठिकाण! काय झालं असेल? काही वंगाळ तर नाही ना असा सहज विचार त्याच्या मनात आला.पण एकंदर भाऊंना ओळखता ते एकटे हे धाडस करणार नाहीत असे पुटपुटत त्याने तो विचार दूर लोटला.थोडा विचारविर्मश करुन तिघही परत खालच्या बाजूला निघाले.सगळ बघून गुहेपाशी परत आल्यावरही भाऊंचा काही तपास नाही. 

आता मात्र डॉ अस्वस्थ झाले. काय करावे? एकनाथ खाली फोन करून बघ बर उतरून गेलेत का? अलंगच्या कातळभिंती वरुन आंबेवाडीत उतरायच्या दुसरया मार्गाने उतरण्याचीही शक्यता नाही कारण परत एकट्याने अस कोणी करणे हा वेडेपणाच ठरु शकतो.त्यातल्या त्यात घाटघरकडे उतरण्यासाठी असणारी वाट सोपी.एकनाथने सवयीने उंचीवर जाऊन खाली फोन केला आणि पडत्या चेहरयाने तो परत आला.

डॉ. ते खाली पण उतरले न्हाईत.

दुपारचे ३ वाजलेले.आता आपण काही करायचे तर अंधाराच्या आत ते करणे शक्य नाही. तरीही एकनाथने त्याच्या सामरदच्या मित्रांना झालेलया घटनेची माहिती दिली.डॉ नी आता सूत्रे हाती घेतली आणि त्यांना दक्षिणेकडे कड्याच्या खाली तपास करुन कळवायला सांगितले. बाहेर कुठे अजून काही बोलू नका ही सूचनाही ते द्यायला विसरले नाहीत. त्यांच्यासोबत ३०० फूटाचा दोर आणि कातळरोहणाची सामुग्री त्यांनी तपासली आणि उद्या सूर्याच्या उगवतीला दक्षिण कड्याला गरज पडली तर भिडायचे याची त्या़नी मनोमन तयारी केली.तशा सूचना त्यांनी त्यांच्या जोडीदाराला आणि एकनाथलाही दिल्या…..

 एक मंदशी वारयाची झुळूक शुद्ध हरपलेल्या भाऊच्या अंगावर आली आणि त्याचे डोळे उघडले.पण सभोवताली संपूर्ण अंधार! कसबस बसत त्याने त्याच्या पाठपिशवीच्या वरच्या कप्प्यातून त्याची हेडटाँर्च चाचपली.अंधारातच अंदाजाने त्याचे सेलही टाकले आणि टाँर्च सुरु केली.सर्वप्रथम हातपाय हलवत तो उभा राहिला.आश्चर्य म्हणजे एवढ्या उंचीवरुन घसरुनही त्याला कुठलीच दुखापत झाली नव्हती.त्याने आँफलाईन मोडला टाकलेल्या मोबाईल वर वेळ बघितली.३ वाजलेले.पण दुपारचे की रात्री चे हे समजायला मार्ग नव्हता.बहुतेक रात्रीचे असावेत की दुपारचे? त्याला आता भूकेची जाणीव झाली आणि पाठपिशवीच्या आत ठेवलेल्या दोन दशम्या आणि चटणी तिथंच बसून त्यानी खाल्ली आणि पाणी प्याल्यावर जरा तरतरी आल्यावर त्याने मोबाईल परत चेक केला त्यावर ३.४३ पी.एम.बघितल्यावर त्याला जाणीव झाली की तो काल संध्याकाळ पासून पूर्ण रात्र आणि अर्धा दिवस बेशुद्ध अवस्थेत होता.

कालची घटना त्याच्या डोळ्यासमोर झरझरत आली पण शिलालेखापासून पुढे अशा ठिकाणी आपण कस पोहचलो आणि एवढ्या वरुन घसरुन काही न होता कस राहिलो हे त्याच्या विचारशक्ती पलिकडले होते.बरोबरच्या माणसांना साध्या साध्या सुरक्षितता गोष्टींचा आग्रह धरणारा मी अस कस आलो? विचारचक्र चालू असताना आता काही तरी करणे आवश्यक आहे हे त्याला जाणवले.त्याने टाँर्चच्या प्रकाशात त्या जागेची पाहणी केली पण तो जिथून पडला ते ठिकाण छताच्या बाजूला ७/८ फूट उंचीवर असावे त्यामुळे साहित्य असूनही वर जाता येण्याचा प्रश्नच नव्हता.मग हळूहळू तो किती संकटात सापडला आहे याची त्याला जाणीव झाली. 

मग घाटघरवरुन एकनाथ भाकरी घेऊन आला असेल हे पण आठवले.पण एकंदर वेळ बघता आतापर्यंत आपण गायब झालो हे त्याला समजले असेलच पण आपल्यापर्यंत तो कसा पोहचणार? त्याने आपल्या मित्रांना सांगितले असेल का? ते काय विचार करत असतील? माझा शोध ते घेत असतील का? असे एक ना अनेक प्रश्नांनी त्याचे डोके भंजाळून गेले.

पण काही तरी हातपाय स्वतः हलवणे गरजेचे होते.त्याने उगाच मोबाईल आँनलाईन केला पण रेंजचा प्रश्नच नव्हता.मग शिकलेल्या गोष्टी मधून त्याने मदतीचा टेक्स्ट मेसेज आपल्या परिचित भटक्यांना टाकला.बरयाच वेळा नेट चालत नाही पण टेक्स्ट मेसेज जातात हे तो जाणून होता.आता पुढचे काम आपल्याला बाहेर पडायचा काही मार्ग मिळतो का? त्याने ती गुहा निरखली ती एका बाजूला निमूळती होत जात होती म्हणजे इथून बाहेर पडायचा एकच मार्ग तोही आपल्या आवाक्या बाहेरचा.त्याने उगाच पाठपिशवी उभी करून वर होल्ड मिळतो का असा अयशस्वी प्रयत्न केला.निराशेने त्याने बसकण मारली.का आपल्याला एवढ्या वर्षानंतर एकटं अस काही करण्याची बुद्धी झाली? आता सगळे किती तणावात असतील किंबहुना आपले बरे वाईट झाले असावे अशीच शक्यता सर्वांनी आतापर्यंत ग्रहीत धरली असेल.

असाच काही वेळ गेला आणि अचानक परत वारयाची मंद झुळूक आली.त्याबरोबर तो परत भानावर आला.अरेच्चा हा वारा तर निमूळत्या भागाकडून येतोय.मग तिकडून काही तरी मार्ग नक्की असणार. त्याने जवळ जाऊन बघितले जेमतेम माणूस सरपटत जाईल एवढी जागा.आणि ती संपली तर परत कसे फिरणार?जाऊ की नको? पण एकंदर परिस्थिती बघता हे धाडस केले नाही तर इथेच आपला जीव जाणार.एक शक्यता कोणीतरी तपास करत येईल मग? हे अवघड असले तरी अशक्य नव्हते.मग थोडा विचार करुन त्याने आपल्या स्टीकचा वापर करुन तिथ एक बाण गुहेच्या निमूळत्या बाजूने काढला.

पिशवीतून दोर काढला आणि त्याचे एक टोक आपल्या पाठपिशवीला बांधले आणि एक टोक कमरेला बांधले.पाण्याचे दोन घोट घेत सगळ व्यवस्थित असल्याची खात्री करुन मग देवाचे नाव घेत त्या निमूळत्या भागात तो सरपटत निघाला.समोरुन येत असणाऱ्या हवेने जीव गुदमरत नव्हता त्यामुळे हळूहळू सरपटत जात असताना मध्ये एका ठिकाणी अगदीच निमूळता भाग आला.जिवाच्या अकांतांने त्याने स्वतः चे शरीर पुढे ढकलले.त्यानंतर मात्र ती पोकळी रुंद होत होती.एका जागी तो बसू शकेल एवढी जागा मिळताच त्याने त्याची पाठपिशवी ओढून घेतली कारण साहित्याशिवाय अशा जागी तो काही तासही जिवंत राहू शकेल अशी परिस्थिती नव्हती.अजून एक घोट पाणी पिऊन तो पुढे जाण्यास सज्ज झाला.खरतर पाणी त्याच्याकडे अजून ४ लिटर शिल्लक होते आणि खाण्याचेही ४ दिवस जगता येईल असे पदार्थ. त्यामुळे २/३ दिवस तो सहज तग काढू शकत होता.

आता ती पोकळी चांगलीच रुंदावली आणि नंतर एका दालनात जाऊन मिळाली.हो ते दालनच होते.१५ फूट उंचीचे आणि ४०/५० फूट लांब रुंद.खाली उतरायला त्याला ७/८ फूट हळूवारपणे उतरावे लागले.हे नैसर्गिक आहे की मानवनिर्मित हे मात्र त्याला समजेना.खाली उतरुन त्याने सगळीकडे ते निरखले आणि काय आश्चर्य त्याच्या एका भिंतीवर काही तरी कोरलेले त्याला दिसले आणि छन्नी हातोड्याचे घाव घालून तासलेला कातळ आजूबाजूला. 

अरे बापरे हे काय? एवढ्या कठीण जागी असे दालन आणि शिलालेख! त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसेना.त्याने हळूवारपणे हाताने ती अक्षर चाचपडली.ही कोणती लिपी असावी? भटकंती करताना काही ईतिहासाचा अभ्यास करणारया मित्रांच्या नादाने मागे एकदा कधीतरी याचा अभ्यास त्याने अर्धवट केला होता.नक्की काय असावे हे? त्याने काही अक्षरं जुळवायचा प्रयत्न केला आणि त्याचा थोडाफार अर्थ असा होता..

हे प्रभो तू सर्वशक्तिमान आहेस,
तू सगळ्याचा रक्षणकर्ता आहेस,
तुझ्या उदरात या जगाचे सर्व वैभव दडलेले आहे!

या इतक्या दुर्गम जागी आणि गडाच्या उदरात हे दालन तेही सहजासहजी आत येणारयासही सापडणार नाही अशा ठिकाणी एवढ्या मेहनतीने असा शिलालेख कोरण्यामागचा उद्देश त्याच्या लक्षात येईना.काय असेल बरं हे? काय रहस्य आहे? आणि मी इतक्या शतकांनंतर इथे पोहचणारा पहिला मानव असेल तर त्याचे कारण काय? कालचा घटनाक्रम बघता मी इथे आलो यापेक्षा मला ईथपर्यंत कोणीतरी पोहचवले असा भास सतत मला का होतोय.अन्यथा जेथे डोकावून पाहतानाही भिती वाटावी अशा ठिकाणी इतक्या सहज सुखरुप मी कसा पोहचलो? यामागे ईश्वराचा काय संकेत आहे? अशा अनेक विचारांनी त्याचे मन गोंधळून गेले.

बर पोहचलो तर आहे आता बाहेर कस पडाव.हवा वाहून येणारे भुयार तर अजून वरच्या बाजूला दिसतेय आणि त्यातूनही हवा सोडून उजेडाची तिरीपही नाही. सायंकाळचे ६ वाजलेले आणि आता काही प्रयत्न करावा की थोडा विसावा घ्यावा या विचारात तो एका दगडाला टेकला.
पाण्याची बाटली काढून दोन घोट पाणी प्याला, बाटली परत ठेवण्यासाठी वाकला आणि बाटली चुकून खाली पडली.त्याने ती उचलून परत पिशवीत कोंबली.आणि तो दचकला! परत त्याने बाटली पिशवीतून बाहेर काढली आणि अलगद खाली आपटली! खण् खण्! आतमध्ये मोठी पोकळी असल्यासारखा! हे काहीतरी वेगळेच दिसतेय! बँटरीच्या प्रकाशात त्याने त्यावर असणारी थोडी माती दूर सारली आणि एक गोलाकार तयार केलेले छिद्र असावे असे वाटले.त्याने अजून थोडी साफसफाई करत ते मोकळे केले.आतमध्ये हात घातला आणि आजूबाजूला कुठतरी आवाज झाला.कर् कर् ! जुन्या दरवाजाचा होतो तसा! त्याने भयचकित होत आजूबाजूला टाँर्चच्या प्रकाशात पाहिले तर काहीच दिसेना! एक दोन वेळा हाच प्रकार आणि काही नजरेस पडेना! आता मात्र तो भयभीत झाला.
कसेबसे अवसान आणत त्याने पाठपिशवी उघडली आणि आतून स्लिपींग बँग काढली आणि त्याच्या आत शिरून स्वतःच्या भितीला सुरक्षिततेचे कुंपण घालण्याचा प्रयत्न करु लागला. 

त्याने आता ऐकले तो भास आहे की खरोखर अस काही वाजलय ? या विचारात त्याने डोळे मिटले.आता संध्याकाळचे ७.३० वाजले होते.बाहेर पडायचा प्रयत्न करायचा तो उद्या लवकर कारण तरच दिवसा उजेडी जर आपल्याला मार्ग गवसला तर काही तरी करता येईल आणि किमान आपल्याकडच्या शिट्टी ने गडावर असणारया कोणाचे तरी लक्ष वेधता येईल असे त्याला वाटले.तसाही आज शनिवार होता आणि उद्या गडावर कोणी नी कोणी चढाई किंवा उतराई करणारे असेल किमान एकनाथ मला शोधण्याचा प्रयत्न करणार असला तर त्याला तरी समजेल.

ईकडे एकनाथ, डॉ आणि त्यांचा जोडीदार गुहेपाशी मुक्काम करण्यास थांबले.एकनाथने डॉ नी आणलेल्या फोल्डींग स्टोव्हवर रात्रीसाठी भाजी बनवली.सोबत बांधून आणलेल्या भाकरया होत्याच! खरतर आज भाऊ भेटले असते तर गप्पांची भारी मैफील रंगली असती आणि जेवणही साग्रसंगीत आरामात सगळ्यांनी हातभार लावून बनवले असते.पण एकंदर तणाव बघता डॉ आणि जोडीदारही उपाशी झोपतील या भितीने एकनाथने न सांगताच तयारी केली.भाकरी खाताना मात्र त्यालाही कसेसे वाटले.भाऊने भाकरी घेऊन बोलावलं प्रेमाने आणि आता असे कसे झाले? तिघही एकमेकाशी फार न बोलता पडून राहिले. डॉ उद्याचा दिवस काय घेऊन येतोय या चिंतेत तर एकनाथ खालचे मित्र काही विपरीत तर बातमी देत नाहीत ना या विवंचनेत! कायम सुखावह आणि चढाईसाठी केलेल्या श्रमाची पुरेपूर परतफेड करणारा असा हा अलंग मुक्काम आज विवंचनेचा होता.

भाऊचा डोळा लागला आणि अचानक त्याला कोणीतरी बोलतेय असा भास झाला.संवाद मात्र मराठीत नसावा.शब्दही आजवर कधी न ऐकलेले! ही भाषा राजस्थानी असावी! हुकूम! डोळे उघडे करुन बघायची काही हिंमत होईना.पण कान टवकारलेलेच!

 हुकूम! आपने दिया हुवा काम, पुरा हो गया!
 सब सामान यहाँ लाके रख दिया है! 

कल रस्सी काटके रास्ता बंद कर देंगे.

जी! हम नही जानते की इस लडाई मे क्या होगा, लेकीन हम राजपूत है, खून की आखरी बूंद तक हार नही मानेंगे! और शिकस्त हुई भी तो दुश्मनो को सिर्फ हमारी लाँशे मिलेंगी! जिसके लिए वो यहाँ आना चाँहते है वो कभी हासिल नही कर पाऐंगे! 

जी हुकम! 

ये तयखाने की सिडीया बंद करके उसका ताला बंद कर देना!

आता मात्र भाऊने डोळे किलकिले करुन बघण्याचा प्रयत्न केला! एक उंचापुरा राजस्थानी सरदार आणि ५/६ ताकदवान सैनिकांच्या आक्रत्या त्याला समोरच्या हवा येणारया भुयारुतून बाहेर जाताना दिसल्या! 
दचकून त्याने डोळे पूर्ण उघडले आणि समोर पूर्ण अंधार! अंगाला दरदरुन घाम फुटलेला! अर्धा तास काही हालचाल करण्यासाठी त्याच्यात त्राण शिल्लक नाही राहिले. नंतर हळूवारपणे उठत त्याने मोठ्या हिमतीनं टाँर्च सुरु केली.पण सगळीकडे काही हालचाल झाल्याचे लक्षण दिसेना.पाण्याचे दोन घोट घेत त्याने मोबाईल चालू केला.रात्रीचे बरोबर १२.३० वाजलेले.

बापरे आपण अनुभवले ते स्वप्न होते की खरच आपण हे बघितले.आणि खोटे असेल तर परत जाताना बरोबर समोर हवा येणाऱ्या मार्गातून ते कसे गेले? आणि आपल्यासमोर ही चर्चा का केली ? आज २०२० चा मार्च महिना चालू आहे आणि ही लोक १५व्या १६ व्या शतकातील असल्यासारखी होती.त्यांनाच आपल्याला हे दाखवायचे होते म्हणून तर कालपासूनचा हा अघटित क्रम घटला नसावा ना? 

एकंदर सगळीच परिस्थिती कल्पनाशक्तीच्या पलिकडची अन् आधुनिक विज्ञानाच्या कक्षेला मान्य नसणारी.विश्वास ठेवावा की नाही हा प्रश्न गौणच होता कारण सगळे अघटित हे देखील सत्य होते.त्याचा परत डोळा लागेना आणि स्लिपींग बँगच्या बाहेर  पडण्याचीही हिमंत होईना.पण आता काही पर्यायही नव्हता.

 काही तरी हालचाल करावी असे त्याला वाटले किंबहुना अनाहूतपणे तो उठला आणि सरळ शिलालेखाजवळ गेला.टाँर्चच्या प्रकाशात नीट निरखून परत ते वाचण्याचा प्रयत्न केला “वैभव उदरात दडलेय” हे वाक्य आणि आता त्याने अनुभवलेला प्रकार म्हणजे नक्कीच असे ईथे काही तरी दडलेय की जे शतकानुशतके सर्वांच्या नजरेपासून दूर आहे.”खजिना”त्याचे डोळे एवढ्या अंधारातही विस्फारले! त्याने आजूबाजूच्या भिंती नीटपणे चाचपडायला सुरुवात केली मघाशी तो कर् कर् चा आवाज या भिंतीतूनच आला असावा.भास आणि अभासाच्या सीमारेषेवर त्याचे मन हिंदळत होते आणि बुद्धी प्रमाण शोधायचा प्रयत्न करत होती.

शिलालेखाजवळ नीट निरखले असता त्याला त्या ओळी मघाशी बघितल्या त्यापेक्षा वेगळ्या रेषेत दिसू लागल्या.अजून निरीक्षण करताना तिथे हा शिलालेख नंतर बसवला असावा हे त्याला जाणवले तो मुळ कातळाचा भाग नसावा हे नक्की! मग यामागे काही आहे का? त्याने सर्व दालन पिंजून काढले.एवढ्या थंड जागी अंगावरुन घामाच्या धारा वाहयला लागल्या! त्याने पुन्हा दोन घोट पाणी पित चाचपणी चालू केली.

काही दगडाच्या कपच्या एका कोपरयात रचलेल्या होत्या.त्या कपच्या त्याने हळू हळू दूर केल्या.त्या करत असताना एक दगड बाजूला फेकल्यावर चटकन काही तरी त्याच्या ध्यानात आले आणि त्याने तो दगड परण उचलला आणि नीट निरखून बघितला.त्यावर काही तरी चिन्ह कोरलेले दिसले.अतिशय नाजूकपणे लंबवर्तुळाकार आकारात घडवलेला दगड आणि त्यावर चिन्ह! याचा काय अर्थ? 

तिकडे डॉ एका कुशीवरुन दुसरया कुशीवर वळत रात्र जागवत होते.आकाश संपूर्ण तारकांनी भरलेले.काल की आजच अमावस्या आहे? त्यामुळे तर चंद्र आकाशात नसताना सर्व नक्षत्रांनी आकाशगंगेने आकाश सजलेय! बापरे आपण तर हा विचारच केला नव्हता.वैद्यकीय क्षेत्रात आधुनिक विज्ञान सोडून अमावस्या पोर्णिमा आणि ईतर अंधविश्वास निर्माण करणाऱ्या गोष्टींसाठी त्यांच्या मनात थारा नव्हता! पण अगम्य अशा घटनांनी तेही विस्मयचकित होते.

एकनाथ?”

 बोला डॉ साहेब?

अरे आज अमावस आहे का?

जी डॉ. साहेब.घरुन निघताना माझा बा आरडत व्हता.कधीबी गडावर जात्यात ही लोकं! अमावस पूनव काय बी बगत न्हाईत.आरं भूतंखेतं असत्यात त्यांचा दिन असतूया.या गडावर लय जीव गेलेले असतील का जाताय अशा वेळी?
 पण तुमाला नाय म्हणू शकत नाही अनं भाऊ बी वर आलते त्यामुळं मी आलो.

शांततेला छेद देणारा हा संवाद डॉ च्या बुद्धी ला विश्वास न ठेवता येणाऱ्या गोष्टींची दखल घ्यायला भाग पाडणारा!काय झाले असेल भाऊला.कधीही एकटा न फिरणारा माणूस का बरं असा आला आणि आला तर गेला कुणीकडं.काही भूतखेताने तर खेचून आणले नाही ना त्याला? शंका कुशंकानी मन चिंतीत झाले.

एकनाथ च्या मनातही हाच विचार चालू होता.लहानपणापासून त्यांच्या आदिवासी समाजात भूतखेतं आणि मंत्रतंत्र याचा मोठा पगडा! पण लांबून येणाऱ्या भटक्यांनी त्याला आधुनिक विचारांचे दालन उघडे केले होते.सुरक्षित पणे दोर लावणे.कातळचढाई, उतराई या सगळ्या गोष्टी त्याच्या अंगवळणी पडलेल्या आणि एक नामवंत वाटाड्या आणि चांगला माणूस म्हणून लोक आता त्याला ओळखायचे.वर्षभर शेतीच्या बरोबर इथल्या दरयाखोरयात गडकोटांच्या अंगाखांद्यावर तो रमायचा. विचार करता करता त्यांचा थोडा डोळा लागला.

भाऊ बसल्या जागी अर्धातास तो दगड आणि शिलालेख अनुक्रमे न्याहळत होते आणि अचानक ते चटकन उठले आणि मघाशी माती बाजूला सारून मोकळ्या छिद्राजवळ पोहचले.लख्ख वीज चमकावी तसे त्यांच्या ध्यानात आले की हा दगड या छिद्राच्या आकाराचाच आहे.शिवरायांच्या नावाचा मनोमन जप करत त्यांनी ती जागा अजून व्यवस्थित साफ केली आणि तो दगडं चपखलपणे तिथे बसला.थोडी हालचाल करुन तो व्यवस्थित बसलाय याची खात्री करताच त्यांनी तो कळ फिरवावी असा फिरवला मात्र आणि कर्रर् कर्र् करत शिलालेख खाली सरकला.अंधारात त्या आवाजाने भाऊची भितीने गाळणच उडाली आणि सर्वांग घामाने डबडबले.त्याने झपाट्याने शिलालेखाजवळ जात टाँर्चच्या प्रकाशात आत डोकावले तर एक प्रशस्त कातळजीना वरच्या बाजूला चढत होता.

भाऊने लगबगीने त्याची पाठपिशवी भरली,दोर गळ्यात अडकवला, हेल्मेट घातले आणि ४/५ फूट वर रेटा देत आत पोहचला.साधारण २०/२५ सरळ रेषेत जाणाऱ्या पायरया आणि नंतर समोर कातळ दिसत होता.जेमतेम १ माणूस जाईल एवढीच जागा! वर जाताना त्याचा जीव घाबराघुबरा व्हायला लागला, मग त्याने परत पाठपिशवीला दोर बांधून ती खाली सोडली आणि एक टोक आपल्या कमरेला बांधले.जर जास्तच त्रास झाला तर परत दोरामुळे मार्ग सोपा होईल असा विचार त्याने केला.

९०अंशात वळणारा जीना अजून ८/१० पायरया असाव्यात त्या संपल्यावर जीना संपला आणि एक अजून दालन लागले.तो जपून आत उतरला! चारही बाजूला ध्यान करायला असतात अशा कातळाच्या बसायच्या जागा आणि त्यावर काही खोबण्या आणि वर छताजवळ एक छिद्र! नक्की काय प्रकार आहे याचा छडा लावण्याचा त्याचा मेंदू प्रयत्न करत होता.मग त्याने कमरेचा दोर सोडला आणि खोबण्या पकडून वर चढत त्या छिद्रापर्यंत पोहचण्यात तो यशस्वी झाला! त्या छिद्रातून आत डोकावताच त्याला आत काही हंडे रचलेले दिसले पण त्यासाठी त्याला ७/८ फूट आत उतरणे आवश्यक होते.त्याने परत खाली येत पाठपिशवी वर खेचून घेतली आणि दोर कमरेला लटकवला.त्याचे दुसरे टोक खाली एका शिळेला बांधले.

परत खोबण्या पकडून वर जात शरीर त्या फार मोठ्या नसणाऱ्या छिद्रातून आत सोडले.थोडे अवघड गेले पण आत जेमतेम ५/६ फूट जागा असावी.एका हंड्यावर जीर्ण जनावरच्या कातडीचे आवरण त्याने त्याच्याकडच्या छोट्या स्विस नाईफच्या सहाय्याने उघडले आणि त्याचे डोळे विस्फारले! त्यात मौल्यवान रत्न आणि खडे याची रास होती आणि एक कातडीचा खलिता!

राजराजेश्वर विक्रमसिंह याच्या मालकीचा राजखजिना किल्ल्याचा रक्षक सरदार उदयभान याने स्वतःच्या उपस्थितीत जमा करुन सुरक्षित केला आहे.

आणि खाली त्यात असणारया संपत्तीची यादी!
भाऊने आजपर्यंत कधीही न बघितलेली रत्नांची खाण बघून काय करावे हे त्याला सुचेना! त्याने परत तो खलिता आत टाकला आणि त्याचे कातडी झाकण परत लावले.आज तो एका ऐतिहासिक खजिन्यापर्यंत पोहचला होता तेही अकल्पित रित्या! त्यातले एक रत्न त्याने पुरावा म्हणून आपल्या खिशामध्ये व्यवस्थित ठेवले आणि परत दोराला जोर लाऊन शरीर बाहेर ओढले.हळूहळू कातळ उतरत त्याने खाली बसकण मारली.

थोडं काही खाण्याचे काढून दोन घोट पाणी कसेबसे घशाखाली उतरवले.अशी अजून काही छिद्र वर दिसत होती.त्याने त्याचा मोबाईल काढून वेळ बघितली.सकाळचे ५ वाजले होते.
आता हा खजिना सुरक्षित रित्या शासनाच्या दरबारी जमा व्हायला हवा आणि यासाठी मला येथून बाहेर पडणे आवश्यक आहे याची त्याच्या मेंदूने नोंद घेतली.त्याने दोर गुंडाळून गळ्यास अडकवला आणि सामान आवरुन खाली उतरण्यास सुरुवात केली.बाहेर पडताच त्या दालनात त्याने परत त्या द्वाराची चावी असणारा दगड फिरवून बाहेर काढला आणि शिलालेख परत हळूहळू त्याच्या जागेवर स्थिर झाला.

आता हवा येणाऱ्या छिद्राच्या दिशेने कसे चढायचे यासाठी त्याने प्रयत्न चालू केला.परत पाठपिशवीला दोराचे एक टोक बांधत आणि एक कमरेला गुंडाळून तो कातळाला काही चढण्यासाठी खोबण्या आहेत का हे चाचपडू लागला.प्रथमदर्शनी अवघड वाटणारा हा कातळ चढायला सुरुवात करताच त्याला एक एक खोबणी जी खालून दिसत नव्हती ती मिळत गेली आणि दोन मिनिटातच तो त्या छिद्रापाशी पोहचला.

ती जागा काही रुंद नव्हती.४/५ फूटानंतर तर सरपटत जावे अशीच! त्याने परत पाठपिशवी वर खेचून घेतली आणि हळूहळू बाहेरच्या दिशेला सरकू लागला.खूप वेळ सरकत गेल्यावर त्याला प्रकाशाचा किरण दिसला! आतापर्यंत पहिल्यांदा तो या काळोखातून प्रकाशाची तिरीप बघत होता.घाईगडबडीत त्याने आपला सरपटण्याचा वेग वाढवला आणि अचानक त्याला जाणीव झाली की या भुयाराचा अंत काही सोप्या जागेत असेल असे नाही. त्याने पाठपिशवी पुढे ओढून घेतली हळू हळू आणि सावकाश पुढे सरकू लागला.आणि ५/१० मिनिटात बाहेरचे आकाश त्याला दिसू लागले.

एकदम शेवटी ते भुयार संपत असणाऱ्या ठिकाणी एक तीन चार फूटांची उभ राहू अशी जागा आणि त्याच्या डोक्यावर एक छोटेसे छिद्र! त्याने बाहेरची हवा फुफ्फुसात भरुन घेतली.आणि वर चढाई करत छिद्रापलिकडे बघितले! बापरे! खाली १००० फूटाचा सरळ कातळ आणि वर साधारण ५०/१०० फूटापर्यंत दिसणारा कातळ! आता काय करावे.समोर बघत असता त्याला कातळभिंती आणि जंगल दिसत होते आणि दूरवर भंडारदरा धरणाचा जलाशय. म्हणजे आपण अलंगच्या नेहमीच्या वाटेच्या अगदी विरुद्ध दिशेला! हे कस शक्य आहे? कारण साधारण येथूनच आपण उतरलो असावोत हा विचार त्याच्या मनात आला.

पण अलंगच्या इतर कातळवाटेप्रमाणे इथेही दगडात एक दोर अडकवण्यासाठी गोल छिद्र बघून त्याला आशेचा किरण दिसला.पण आपला दोर खूप अपुरा असून खाली उतरणे शक्य नाही याचीही जाणीव त्याला झाली.

ईकडे उगवतीच्या रंगात पटापट आवरत तिघ जण आणि ५/६ जणांचा भटकंती साठी आलेला एक ग्रुप साहित्याची जमवाजमव करत रेस्क्यू ची तयारी करत होता.

सगळी तयारी करुन बरोबर ७ च्या ठोक्याला ती मंडळी दक्षिणेकडे कड्याच्या पायरयांच्या दिशेने निघाली.४५ मिनिटात ईप्सित स्थळी पोहचून दोर बांधण्यास योग्य जागा निवडण्याची लगबग चालू झाली. एकनाथ स्वतः खाली उतरणार आणि डॉ त्याला वरून बिले देणार असे ठरले आणि हार्नेस बांधून एकनाथ तयार झाला.

बाकी लोकांनी आपापल्या परिने सेल्फ अँकर होत मदत चालू केली.थोडा घसारयाचा टप्पा सावकाश पार करत दोराच्या सहाय्याने एकनाथ आणि डॉ पायरयांपाशी उतरले.मग डॉ नी एका झाडाला एकनाथचा आणि स्वतःच्या सेल्फ अँकरचा दोर अडकवला.एकनाथ आता हळूहळू त्या कातळकड्यावरच्या पायरया उतरु लागला.एका क्षणी त्या पायरया संपल्या आणि एकनाथ ने आवाज दिला डॉ साहेब पायरया संपल्या खाली सरळ कातळ आहे इथून उतरता येणार नाही.

खरतर जरी भाऊ गेली अनेक वर्ष ट्रेकींग करत असला तरी फ्री क्लांयंबिंग असा प्रकार त्याने आजवर केला नव्हता.आणि काही केले नाही तर इथेच जीव जाण्याचा धोकाही होता.काय करावे? अन्य वेळी असा विचारही त्याच्या मनाला शिवला नसता कारण कातळारोहण हे तंत्रशुद्ध प्रशिक्षण आणि त्यानंतर अविरत मेहनत सातत्याने करण्याची तयारी असेल तरच नादी लागायची गोष्ट आहे हे तो जाणून होता.अनेक अवघड ठिकाणी त्याने असे प्रकार केले होते पण सोबतीला तंत्रशुद्ध प्रशिक्षित आणि अविरतपणे अशा मोहिमा करणाऱ्या सवंगड्यांसह. 

पण आता पर्याय नव्हता न लढता मरायचे की लढून हेच ठरवायचे होते.२ मिनीटं बसून त्याने थोडी गूळपोळीचे पाकीट काढून जबरदस्ती १ पोळी खाल्ली आणि १/२ बाटली पाणी संपवले.कारण चढाई करताना स्नायू आखडले तर अवघड झाले असते.परत ५ मिनिटात पूर्ण झाले असते.परत ५ मिनिटात पूर्ण पाणी संपवत पाठपिशवी व्यवस्थित समतोल भरली.थोडे जागच्या जागी स्नायू मोकळे केले.दोराचे एक टोक गोल छिद्रात अडकवले आणि गाठ मारली, जरी फाँल झाला तरी पूर्ण खाली न जाता कुठेतरी अडकू अशी भाबडी आशा यामागे होती.खरतर क्लाईंब करताना काही अंतरावर असणाऱ्या बोल्ट मध्ये दोर अडकवल्यास १० ते १५ फूटाच्या वर फाँल होत नाही आणि वाचण्याची शक्यता असते पण आता पर्याय नव्हता.कोणीही न केलेले धाडस त्याला करायचे होते.जगलो तर जगासमोर ईतिहासाच्या सुवर्णक्षणांचा खजिना उघड करता येणार होता अन्यथा जेव्हा शोध मोहीम होईल त्यावेळी त्याचा देह दोरावर लटकलेला लोकांना मिळाला असता.

त्याने जवळच्या मोबाईल मध्ये नोटपँडवर १० मिनिटात काही नोंदी केल्या जेणेकरून झाल्या प्रकाराचा शोध बचावकर्त्याला लागावा.आणि तो चढाई करण्यास सज्ज झाला. 

आलेल्या तणावामुळे हाताला असलेला घाम पुसून माती लावली आणि छिद्राबाहेर असणारा पहिला होल्ड त्याने पकडला.हळूहळू पाय योग्य जागी स्थिर केले.त्याच्या अंदाजाप्रमाणे हा खजिना लपवणारया माणसांनी इथे काही खोबण्या बनवल्या असण्याची शक्यता .पण अनेक शतकानंतर ते होल्ड नैसर्गिक झीज झाल्याने संपले असण्याचीही शक्यता होती.पण ज्या शक्तीने त्याला खजिन्यापर्यंत पोहचवले ती त्याच्या मागे सक्षमपणे उभी आहे हीच काय तर जमेची बाजू! 

एक एक खोबण थोडी साफ करायची शरीर वर उचलायचे आणि पाय तिथे स्थिर करायचा असे करत करत तो २०/२५ फूट चढला.साधारण अजून ७०/७५ फूट तरी चढाई बाकी होती पण खाली चुकूनही बघायचे नाही हा नियम त्याने पाळला असला तरी खाली आपला म्रुत्यु जबडा वासून तयार आहे हे पण त्याच्या मनाच्या कोपरयाला माहिती होते.आता साधारण डावीकडे खोबण्या सरकत होत्या.एवढ्या उंचीवर अशी मुव्ह भयानक होती पण जिथे पर्याय नसतो तिथे कुठूनतरी आपले शरीर अचाट गोष्टी साध्य करते हे त्याने अनुभवले होते.एका ठिकाणी खोबणी दिसेना मग चाचपत एका भेगेत हात घातला आणि जीवाच्या आकांताने शरीर वर ओढले.पुढे एका ठिकाणी थोडा कातळ अंगावर येणारा होता.पण आता आपण थोड्या प्रयत्नात हे पार करु शकतो या भावनेने त्याने चढाई सुरु ठेवली.तो श्रमाने अतिशय थकला होता पण एक एक पाऊल त्याला जीवनाकडे घेऊन जात होते.

आता कातळ ६०अंशाच्या उतारात बदलला आणि त्यावर एक लेज दिसत होती त्यावरही एक कडा होता.पण पहिला टप्पा पार पडला तर पुढच बघता येईल या विचारात एक एक पाऊल रोवत त्याने चढाई चालू ठेवली.पण अचानक त्याचा दोर ताणला गेला! बापरे! नशीब त्याची पकड मजबूत होती.दोर संपला असावा.मग हळूच एक पायरी खाली उतरत त्याने कमरेचा दोर सोडून दिला.नियमात न बसणाऱ्या सगळ्या गोष्टी आज त्याला कराव्या लागत होत्या.

यापुढची चढाई तर कसल्याही आधाराविना! पण आता त्याला जरा शरीर हलके झाल्यासारखे वाटले.कदाचित दोराचे वजन त्याला खाली खेचत असावे.उरलेला चढाईचा टप्पा कसाबसा संपवत त्याने लेजवर एका जागी बसकण मारली.पूर्ण कातळटप्पा आज प्रथमच त्याने फ्री क्लाईंब केला होता जणू त्या शक्तीनेच त्याच्याकडून तो करुन घेतला होता.पाण्याची बाटली काढत तो पाणी प्याला.मोबाईल पाठपिशवी मधून काढत वेळ बघितली सकाळचे ११ वाजलेले.आता तो जिवंत राहू शकेल या समाधानाने त्याने डोळे बंद करुन ईश्वराचे आभार मानले.

तिकडे एकनाथ परत वर चढून आला आणि डॉ आणि तो दोर गुंडाळून वरच्या टप्प्यावर आले.सगळे नजर लावून बसलेले सह्यसवंगडी आता निराशेत होते.आजवर कधीही न बघितलेली दुर्देवी घटनेचे ते साक्षीदार होते असे त्यांची शांतता सांगत होती.
“एकनाथ”तुझ्या मित्रांना फोन लावून बघ.ते खाली पोहचले का? सामरदहून भल्या पहाटे ३ वाटाडे एकनाथच्या फोननंतर त्या कड्याखाली शोधाशोध करत होते पण त्यांच्या हाती काही लागले नव्हते.ते आता एकनाथला कळवणार इतक्यात त्याचाच फोन आला.

रम्या कुठ हाय? 

आरं सकाळधरनं इथ कड्यापाशी शोधतो हाय पर इथ कायबी नाय रं.

आर नीट बगितले का? 

हो आर आमी तिगबी बगतूया.

संधन दरीमध्ये रोज शेकडो लोकांना उतरवणारे सगळे अनुभवी वाटाडे होते.
डॉ. खाली काय बी नाय घावलं.
आता मात्र डॉ काय करावे या विचारात पडले.

भाऊने डोळे उघडले आणि आपल्या पिशवीतून शिट्टी काढली.पाच सहा वेळा जोरात फुंकली.सगळ्या दरयाखोरयात त्या शिट्टी चा आवाज घुमला.

डॉ. ते बघा ऐकले का? 

हो हा शिट्टी चा आवाजच आहे.

त्या आवाजाचा मागोवा घेत सगळे तिकडे धावले. भाऊने ५ मिनीटाने परत शिट्टी मारली आणि वरुन कड्याच्या टोकावरून आवाज आला 
भाऊ….।

एकनाथ का? 

हो भाऊ तुम्ही कुठ आहात? 

इथ कड्याच्या खाली बसलोय.रोप सोडा.

डॉ आणि सर्वांच्या आनंदाला पार राहिला नाही. आज एक अघटित घडता घडता राहिले होते.एकनाथने पळत जाऊन रोप आणून एका झाडाला बांधला आणि हार्नेस अडकवत बिले घेऊन खाली उतरु लागला.जागेचा अंदाज घेत १० मिनिटात तो भाऊपाशी पोहचला.भाऊच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या.एकनाथने हार्नेस त्यांच्या कमरेला बांधला आणि क्रँब अडकवत वर आवाज दिला घ्या वर.भाऊची पाठपिशवी त्याने स्वतः अडकवली.अर्ध्या तासात दोघ वर आले.

डॉ नी भाऊला मिठीच मारली.सगळी आवराआवर करुन सगळे गुहेकडे निघाले. अत्यंत जगावेगळ्या परिस्थितीतून बाहेर पडत असल्याने भाऊच्या तोंडून एकही शब्द फुटत नव्हता आणि डॉ, एकनाथ आणि इतरही त्यांना आता फार छेडण्याच्या मनस्थितीत नव्हते.एकनाथने खाली फोन करुन ही आनंदवार्ता आपल्या सामरदच्या मित्रांना दिली आणि त्यांना संध्याकाळी घरी जेवायला यायचे आमंत्रण दिले.

गुहेपाशी काही वेळ थांबून सगळे उतराईला लागले आणि अंधाराच्या आत घाटघरला एकनाथच्या प्रांगणात पोहचले.रात्री जेवणं उरकून एकनाथ आणि डॉ ना घडलेला सगळा प्रकार भाऊने सांगितला.एकनाथच्या म्हतारयानं ते ऐकताच

 आर् तुमी लय शहाणे हायसा! अमावसीच्या वक्ताला आसं गडावर ते बी एकटं जाऊ नये हे बी समजना का! माज्या आजल्याला तो माणूस दिसला व्हता जवा तो पोरगा व्हता त्या वक्तानंतर आमी कदीबी अमावस्येच वर गडावं जात नाय.तुमी बगितलं ते सगळ भूतांच हाय! तुमाला जीतं सोडलं हेच बरं झालं बगा !आनं हे कोणाला बी सांगू नका.कोणाचा जीव गेल्याबीगर रहायचा नाय! 

सर्व जण शांततेत झोपी गेले.सकाळी लवकर नाशिकहून भाऊला पुण्याच्या गाडीत डॉ नी बसवून दिले आणि नंतल यावर बोलू अस म्हणून निरोप दिला.

घरी पोहचून सगळं सामान आवराआवर करताना भाऊचा हात खिशात गेला.आणि एक खडा बाहेर आला.

अहो हा कुठला दगड आणला.उगाच गारगोट्या गोळा करुन आणता दरवेळी! 

भाऊने मंदस्मित करत ही गारगोटी देव्हाऱ्यात ठेव ती आपल्याला सह्याद्रीची देणगी आहे अस म्हणत विषय थांबवला.

काही दिवसांनी पुरातत्व खात्याला भाऊने एक पत्र लिहीत सर्व कळवले पण सरकारी कारभारात अजून हा विषय चर्चेला आला नाही. किंबहुना असे भास लोकांना होतात अस म्हणत एका वरीष्ठ अधिकारयाने पत्र केराच्या टोपलीत टाकले.पण हा खजिना नक्की आहे हा विश्वास डॉ ना आणि भाऊना आहे.लवकरच एक तंत्रशुद्ध मदतीने ही मोहीम राबवून हे जगासमोर आणण्याचे त्यांचे नियोजन आहे।।।

Wednesday, 21 February 2018

सह्यांकन २०१७ - अनवट वाटांचा सोहळा







प्रस्तावना !

"Life is an adventure, it's not a package tour!"

सह्यांकन २०१५ च्या भन्नाट अनुभूतीनंतर सह्याद्रीच्या वाटांची नव्याने ओळख झाली आणि सातत्याने अशा वाटांवर जुन्या जाणत्यांबरोबर नवीन ऊत्साही भटक्यांना फिरवताना जबाबदार गिर्यारोहणाचा वस्तुपाठ चक्रम हायकर्स, मुलूंडने सर्वांसमोर ठेवलाय.१९८३ साली काही मंडळी एकत्र येऊन चालू झालेला हा चक्रमचा कारवा वाटेत ईतरांना सामील करून वाटचाल करतोय.त्यामुळे अनिकेत रहाळकरने जेव्हा मला डिसेंबर २०१६ मध्ये सह्यांकन पायलट विषयी विचारले तेव्हा मी क्षणार्धात त्याला होकार दिला.

मग हळूहळू चक्रमांचा प्रवास जवळून अनुभवताना त्यांच्या टिमचा सभासद कधी झालो कळलेच नाही.डिसेंबर २०१६ ला केलेला पायलट रूट हा सह्यांकन २०१७ चा रूट असेल असे तेव्हा वाटले नाही. मार्ग निश्चितीची ही प्रक्रिया म्हणजे ऊसापासून साखर बनण्यासाठी त्यावर जितके सोपस्कार केले जातात तेवढी मोठी!☺️त्यावर पायलट रिपोर्ट बनवून त्याचे पुर्ण पोस्ट मार्टम करुन मगच तो मार्ग निश्चित केला जातो.

 अर्थात ते जरूरीचे आहे कारण जेव्हा १५० नव्या जुन्या सहभागी भटक्यांना आपण डोंगरात नेतो तेव्हा त्यांची क्षमता, त्यांची सुरक्षितता, पर्यावरणाला बाधा पोहचणार नाही अशा छावण्या असे बारीकसारीक अनेक घटक तपासले जातात.दोन छावण्यांमधील अंतर, त्याला लागणारा वेळ, पाण्याची ऊपलब्धता, मार्गातील सुरक्षित करण्याची गरज असलेले अडथळे! बापरे!

 मीही आमच्या सवंगड्यांसह अनेक दुर्गम वाटा गेल्या काही काळात भटकतोय पण व्यवस्थापन कसे असावे हे शिकायचे तर डोंगरातील व्यवस्थापन या विषयात आय आय एम ला चक्रमचा कोणताही नेता मानद प्राध्यापक होऊ शकतो!
असो!

यावेळीचा मार्ग होता,

दिवस १ : गुंडे वालशेत पाथरा घाट कुमशेत पठार!
दिवस २: आजोबा माथा, गुहिरीचा दरा आणि देहने!
दिवस ३ : करोली घाट, सामरद, घाटघर!
दिवस ४ : अलंग मदन खिंड, मदन, कुलंग ट्रँव्हर्स, कुलंग!
दिवस ५ : छोटा कुलंग माथा, ट्रँव्हर्स, गाढवघाट, लादेवाडी!

एकूण छावण्या ५ : १.गुंडे
२.कुमशेत पठार
३.देहने
४.घाटघर
५.कुलंग माथा.

एकूण घाटवाटा ४ : १.पाथरा
२.गुहिरी
३.करोली
४.गाढवघाट

एकूण गड व पर्वत माथे ३ :
१.आजोबा
२.कुलंग
३.छोटा कुलंग.

असा भरगच्च शारीरिक आणि मानसिक क्षमता तपासणारा कार्यक्रम! त्यातच महेश भालेराव, भाऊ वैंशंपायन, पिनाक पुराणिक यांच्यासोबत दुसरयांदा मार्गाचे अवलोकन आणि वाटेवर बाण मारण्यासाठी आँक्टोबर मध्ये गुंडे ते देहने असा ट्रेक केला.यावेळी चक्रमचा गटनेता म्हणून अनिकेत मिरवणकरसोबत पहिला ३० लोकांचा गट नेण्याचा बहुमान मिळाला.ईतक्या मेहनतीनंतर प्रत्यक्षात आपली योजना काम करतेय की नाही हे तपासण्याचे काम पहिला गट करत असतो ( गिनी पिग) !☺️ त्याचे नेतृत्व करायचे अवघड काम कसे पार पडणार याची चिंता कधी नव्हे ती लागली.पायलट, रुट मार्किंग केलेले असल्यामुळे खरतर सोप वाटायला पाहिजे पण जबाबदारी आल्याने थोड टेंशन होतच! अर्थात चक्रमचा पाठिंबा आणि अनिकेतसारखा सक्षम नेता सोबत असल्याने आणि गटातील बहुसंख्य सदस्य माझ्यापेक्षा जास्त क्षमतेचे आणि सोबत अनेक ट्रेक केलेले असल्याने सगळे व्यवस्थित पार पडेल याची शाश्वतीही होती.

अखेर २१ डिसेंबर २०१७ ला सर्व तयारी पुर्ण करून काही पुण्यातील सहकारयांसह चक्रमचे मुलूंड आँफीस गाठले आणि रात्री १० च्या सुमारास बसने मुलूंडहून गुंडे प्रवास सुरु झाला.निरोप द्यायला चक्रमचे अध्यक्ष किरणदादा देशमुख, माधव फडके आणि ईतर सदस्य ऊपस्थित होते.किरणदादा आणि माफा ( माधव फडके) यावेळी वाँर रूम सांभाळणार होते मुलूंडहून!


रात्री १२.३० च्या सुमारास गुंडे गाठले आणि लगेच झोपायची तयारी केली.येथे विनय नाफडे ( लांबा)  आणि प्रणव नाफडे ( पंकू) हे छावणी प्रमुख! ऊद्या पहाटे प्रत्यक्ष ट्रेकला सुरूवात होणार होती त्याचा विचार करत निद्राधीन झालो!

भाग १ ..... 



Tuesday, 3 October 2017

दारयाघाट आणि डोणीदार - दमदार भटकंती





'ओ दादा' असा बेंबीच्या देठापासून आवाज किरणदादांनी दिला आणि दुर्ग ढाकोबा पठारावर चाललेल्या आँफलाईन गुगल मँपच्या भटकंतीला दुर्गवाडीची दिशा मिळाली.

मावळलेल्या दिवसासोबत आम्हा भटक्यांचा संयमही मावळतीच्या टोकाकडे चाललेला त्यात रानवाटा तुडवून निर्मनुष्य पठारावरच्या भटकंतीला चोहीकडे घनगर्द जंगलाने वाट अडवलेली! दुर्गवाडीतील एक आदिवासी कुटूंब पावसाच्या आगमनाबरोबर बाहेर येणाऱ्या चिंबोरयांना मशाली च्या प्रकाशात पकडण्यासाठी या आडरानात शिरलेले आणि दोन पोरांना सोबत देऊन शेवटची अर्ध्या तासाची चाल त्यांनी सुकर केली अन्यथा धुक्याच्या चादरीत पावसाच्या शक्यतेने आणि जंगली जनावरांच्या सानिध्यात रात्र जागवणे असाच या भटकंतीचा मुक्काम होणे आहे याची बहुसंख्य सवंगड्यांना तीव्र जाणीव निश्चित झालेली.
आज सकाळी ५ वाजता पुणे सोडून लोणावळा कर्जत म्हसा असा प्रवास करुन ८.३० ला जेव्हा हाँटेल गुरुप्रसाद समोर गाडी थांबली तेव्हा सर्व जण यथेच्छ पेटपुजेच्या तयारीत आणि नेमके पूर्ण गावच बंद! मग तसेच पुढे सिद्धगड, गोरखगड यांच्या पावसाळी नभांना कवेत घेणाऱ्या आणि गत भटकंतींची आठवण जागवणारया सह्यरांगेच्या सानिध्यात धसई गाठले.चौकात खमंग वडापाव, मिसळ, समोसा यावर तुटून पडत वरुन गरमागरम चहा घेतला आणि गाडी पळूच्या दिशेने वळली.पळूत नाशिककर ४ साथीदार आधीच पोहचलेले.त्यांना सोबत घेऊन पुन्हा एकदा विदाऊट पासपोर्ट सिंगापूर!

वाहन एका घरासमोर पार्क करून सर्व जण ९.३० च्या आसपास पाठीवर सँक लादून तयार झाले.गावातील दोन पोर वरच्या ओढ्यापर्यंत वाट दाखवायला तयार झाले.
डावीकडे नानाचा अंगठा, जीवधन, वानरलिंगीचा सुळका नाणेघाटाच्या वैशाखरेतून केलेल्या भटकंतीची आठवण जागवत होते.समोर ढाकोबाचा पहाड छातीवर होता.ऊजवीकडे दुर्गपर्यंत पसरलेले पठार आणि खालच्या बाजूला पळूची लेणी डोकावत होती.एकंदर ऊंची बघता चांगला घाम काढणार याचा अंदाज करत पुढे सरकत होतो.

दोन टेकड्या पार करून वरच्या ओढ्याला लागलो आणि वाटाड्या पोरांना निरोप दिला आता ओढा ओलांडून वाट शोधत नाळेत पोहचलो.भल्यामोठ्या दगडांच्या राशी अन ऊभा चढ! लहान मोठ्या असंख्य शिळा वाट शोधत पार करत हळूहळू वर चढाई करताना वाटेत एक छोटा धबधबा लागला तिथ थोडी विश्रांती घेतली.
पुढ थोड्या सोप्या कातळचढाई नंतर नाळेच्या वरच्या टप्प्यात पोहचलो.आता चढाई अजून तीव्र होत होती आणि वर धुक्याची दुलई! नाळ संपली तशी वाट डावीकडे कड्याला चिटकून वर गेली.थोड्या पायरयांच्या टप्प्यावरून परत ऊजवीकडे वळाल्यावर नाळ संपली त्यावर पोहचलो.एक कारवीचा चढ चढून ढाकोबाच्या अंबोली खिंडीत पोहचलो.पलिकडे अंबोली गाव ता.जुन्नर! तिथ शेंदूर फासलेले ढाकोबाचे वनमंदिर ( मूळ मंदिर पुढे आहे)

दुपारचे १.३० वाजलेले मग सर्वांनी शिदोरया सोडून धुक्यात हरवलेल्या दरीशेजारी यथेच्छ मेजवानी झोडली.
खर तर काही काळ विश्रांती जेवणानंतर अशा पायपीट असणाऱ्या भटकंतीत आवश्यक आहे पण एकंदर दुर्गवाडीत पोहचायचे असल्याने तो विचार मनातून काढून टाकला आणि पाठपिशव्या लादून निघालो. मंदिरापासून पूर्वेस वर एक दरीच्या बाजूचा कडा चढण्यास सर्व सज्ज झाले.हा जरा अवघड श्रेणीचा याचे कारण दरीच्या बाजूस पूर्ण मोकळा आणि फक्त पाऊल बसेल एवढ्या खोबण्या! एका गावकरी दादाच्या प्रोत्साहनाने ही अवघड चढाई सर्वांनी सुरक्षित पार केली.थोडा ऊभा कडा चढून वर पठारावर पोहचलो.वाटेत एका झाडावर बांबू पीट वायपर गुंडाळून आराम करत होता.त्याला तसाच लांबून रामराम करून वर पोहचलो.
तेथून पुढ गाववाल्या दादांनी वाट दाखवली आणि सांगितले की सरळ वाट सोडायची नाय बरोबय दुर्गवाडीत पोहचाल.खर तर आमचा वाटाड्या दारयाघाट खिंडीत पोहचण अपेक्षित होत तसा निरोप त्याला दिला होता पण तो आला नसल्याने आणि अंधार आणि पावसाच्या आधी मुक्कामी पोहचावे या गरजेपोटी आम्ही वाटाड्या विना निघालो होतो.थोड पुढ रम्य वातावरणात एका ओढ्यापाशी पोहचून एक पाण्याचा थांबा घेतला.अजून पावसाचा पुर्ण जोर नसल्याने पाणी स्वच्छ आणि शांततेत खाली दरीकडे वाहत होते.अर्ध्या तासात ढाकोबा मंदिर आणि पुढे दिड तासात दुर्गवाडीत! एवढ साध गणित असल्याने मावळतीपूर्वी आम्ही सहज मुक्कामी पोहचू ही जवळजवळ खात्री होती.

थोड पुढ जात असताना वाटा अनोळखी वाटायला लागल्या तासभराच्या जलद चालीनेही ढाकोबा मंदिर दिसेना! आता काहीतरी चुकतेय अस वाटत असताना दुरवर मंदिर डोकावले पण अजून अर्धा तास गेलाच.साधारण पाच वाजलेले.पण पुन्हा एक विसावा घेतला आता वाट चुकीची नाही म्हटल्यावर जरा गाफील झालो.पण निघाल्यावर सरळ दक्षिणेकडे जाताना ठळक पण खाली दरीकडे जाणारी वाट लागताच सावध झालो आणि ऊजवीकडे वळालो.

आता सर्व जण जरा चिंतित झाले.मी आणि मिलिंद दादू जरा पुढे खळग्यान पर्यंत गेलो पण बाकी लोक मागे थांबले.मग परत मागे फिरून एक चर्चा विनिमय झाला.साधारण ६ वाजलेले आणि वातावरण पाहता दुर्गवाडी गाठणे अवघड होईल असेच बहुसंख्य मतांचा कौल होता पण बरोबरचे सर्व जण अनुभवी असल्याने थोडे साहस करायला हरकत नाही म्हणून सर्वांना तयार केले.ढाकोबा मंदिरात परत गेलो तर उद्या जास्त अवघड होणार होते रात्रीच्या जेवणाचा प्रश्न होताच कारण डबा दुपारचा आणला होता आणि रात्री वाटाड्या घरी जेवण देणार होता.नाही म्हणायला प्रत्येकाकडे काहीतरी खायला होतेच आणि ते असायलाही हवे.
खळगे पार करून पलीकडे डोंगर धारेला वर चढलो काही बाण दिसले पण एका ठिकाणी बाण खाली दरीकडे जाणारा होता आता सरळ वाट सोडून खाली जाणे म्हणजे अडचणीत जाणारे वाटले म्हणून सरळ चालू लागलो पण ही वाट ढोर वाट असावी कारण ती जंगलात शिरली.धुके आणि अंधार आता जास्त गूढ वाटू लागला.जंगलाच्या मध्ये एका मोकळ्या जागेत परत एक विचारविनिमय झाला आणि बऱ्याच दिवसांनी ट्रेकला आलेला आमचा जुना सवंगडी समीर कदम म्हटला दादा माझ्याकडे ऑफलाईन जीपिस मॅप आहे तो चालू होतो का बघतो.

बघितले तर आम्ही कड्याच्या जवळ आणि वेगळ्या बाजूला आलो होतो.आता मनाचा हिय्या करून मॅप नुसार परत जंगलात शिरलो.थोडे अंतर पार केल्यावर एका डोंगरउतारावर लागलो.परत मॅप चालू आहे का खात्री केली आणि त्यानुसार चालू लागलो.वाट एका ओढ्यापाशी येऊन थांबली.पुढे गहन जंगल!
आता आमचा धीर सुटायला लागला.नशिबाने पाऊस नसल्याने तेवढा एक दिलासा! ओढ्याच्या कडेने बरेच आत गेलो पण आता वाट संपली.परत मघाशी जेथे होतो तिथे परत आलो.प्रशांतने उजवीकडे एक वाट दिसतेय म्हटल्यावर काही पर्याय नसल्याने परत एकसाथ त्याच्यामागे चढाई चालू केली.ओढ्यावर जागोजागी बांध दिसायला लागले पण वनखाते अशी काम करत त्यामुळे अजून किती चालावे लागेल याचा अंदाज बांधणे अवघड होते.आणि मग किरण दादांना अंधारात टॉर्च चमकल्याचे दिसले आणि आवाज ऐकू आला आणि त्यांनी बेंबीच्या देठापासून आवाज दिला ओ दादा.

सामान्य वाटणारी वाट आपली किती वाट लावू शकते याचा प्रत्यय आम्हाला आला होता.अर्थात असे साहस शक्यतो टाळावे पण टॉर्च, खाण्याचे पदार्थ, पाणी आणि योग्य शारीरिक आणि मानसिक स्थितीचे सवंगडी सोबत असल्याने यावर मात करून आपले ध्येय गाठणे आम्हाला शक्य झाले.
दूर्गवाडी पोहचल्यावर गरमागरम जेवण आणि संजय कुलकर्णी यांनी बनवलेला अप्रतिम शिरा खाऊन आजची सिंगापूर मधून सुरू झालेली दाऱ्या घाटाची मोहीम दुर्गवडीत विसावली.आता उद्या दुर्ग आणि मंदिर दर्शन घेऊन डोनिदार घाटाने खाली उतरायचे होते.

भाग एक समाप्त !











Thursday, 8 June 2017

फडताळ नाळ - दुर्गम आणि दुर्लभ घाटवाट






थकल्या भागल्या मनाने आणि शरीराने दापोली गाठले तेव्हा दिवेलागणीची वेळ झालेली.एका टुमदार घराच्या ओसरीत शरिरावर सकाळी ७.३० पासून लादलेले सँक, पाऊच, कँमेरा ऊतरवले आणि न मागताच थंडगार पाण्याची बाटली मिळाली आणि चहासुद्धा! २/४ मिनीटात श्वास नैसर्गिक पातळीवर पोहचल्यावर मग बाहेर ठेवलेल्या ड्रममधले पाणी डोक्यावर थोडे ओतले आणि मग जरा तरतरी आली.

काल रात्री २ च्या सुमारास सिंगापूरला (विदाऊट पासपोर्ट) झालेले आगमन आणि पोटे मामांच्या ओसरीत लगेच निद्रीस्त होत बरोबर सकाळी ६ ला आलेली जाग! मामा पहाटेच बाहेर आले आणि आज तुम्ही आमच्याबरोबर दापोलीला यायचे आणि तेही फडताळ नाळेने अशी गळ घातली.७० वर्ष वय आणि २० एक वर्षापूर्वी ऊतरलेली नाळ करायला ते सुरुवातीला फार खुष नव्हते.लय लांब हाये, वाट मोडलीय, वय झालय अस नेहमीच्या कारणाने आम्ही बधणार नाही अस लक्षात येताच आम्हाला चहा सांगून ते आत आवरायला गेले.
ईतर गाववाले विचारायला लागले तिकड कशापायी? त्यांना शांतपणे सांगितले अहो राजगड आणि रायगड ह्यांना जोडणारया महाराजांच्या अस्तित्वाने पुनीत झालेल्या आणि कधीकाळी त्यांचे पाय लागलेल्या या वाटा कशा आहेत ते तर बघाव यासाठी हा सर्व ऊपद्व्याप!



सर्व तयार झाल्यानंतर गाडी कच्च्या रस्त्यावरुन सांभाळून चालवत एकलगाव गाठले.शाळेसमोर गाडी लावून फडताळच्या दुर्गमतेबद्दल आणि काठीण्याबद्दल थोडीशी सर्व भिडूंना कल्पना देऊन सकाळी ८ च्या सुमारास दुर्गाच्या डोंगराकडे कुच केले.



पावसाळ्या आधीचे ढग जमायला सुरुवात झालेली आणि ऊनसावलीच्या खेळात ही चाल लांबलचक असली तरी सुखकारक भासणारी. 



अगदी तासाभरात जननीचे ठाणे गाठले.वाटेत समोर बा रायगड , रौद्रभीषण लिंगाणा आणि घाटावरून कोकणात ऊतरणारया नाळा यांची सोबत होती.



जननी देवीला मनोमन सुरक्षित ट्रेक पार पडण्याची प्रार्थना केली.



खुरट्या झुडूपातून वाट धुंडाळत प्रथम फडताळ च्या वरच्या पठारावर आलो.



तेथून टोकाकडे जाऊन परत रायगड, दापोली, लिंगाणा आणि त्याच्या अंगाखांद्यावरून कोकणात सांडलेल्या विविध नाळा, घळा छायाचित्र बद्ध केल्या.





थोडक्यात आवरून नाष्टा थोडी सावली बघून करावा असे ठरले आणि ऊजवीकडे जात वर चढलो.पहिलाच एक अरूंद घसारा आणि तोही अगदी विनाआधार. 



पण मनाचा हिय्या करून वाटाड्या मागून शिरलो.सावकाश दोर न लावता हा घसारा सर्वांनी पार केला आणि मग नाळेच्या मुखात पोहचलो.




८० अंशाच्या कोनात धडकी भरवणारी वाट फडताळ बद्दल जे ऐकले होते त्याच्यापेक्षाही हे कठीण प्रकरण आहे त्याची साक्ष पटवणारी.तेथेच थोडी न्याहारी ऊरकली.




तोपर्यंत मामा ऊजवीकडे अजून खुल्या घसारयाच्या अवलोकनास गेले.मग आमचे आटोपताच तिकडे येण्यासाठी त्यांनी आवाज दिला.



आता खरी कसरत चालू झाली.विरागने आणि सुनीलने स्वत: अँकर होत डावीकडच्या भयानक दरीपासून बचाव करण्यासाठी दोर लावला.अशा वेळी दोर हा फक्त एक मानसिक आधार असतो आणि ही गोष्ट तो वापरणारयाने निश्चित लक्षात ठेवावी.जोरात हिसका बसला तर अँकर करणारयाला घेऊन खाली पडायला वेळ नाही लागणार.असो.

आता ते वळण पार करताच खाली जवळ जवळ सरळ घसारयाच्या वाटेने पार्श्वभागाचा आधार घेत खोल ऊतरायला सुरूवात केली.हा चांगला ६०० /७०० फुटाचा पँच फक्त बरयाच कालावधीत कोणी वापर केला नसल्याने दोर न लावता ऊतरता आला नाही तर गवत सरकून माती मोकळी झाली तर दोर अवश्य लावावा असा.




हा भाग ऊतरताच डावीकडे एक कातळाची भिंत ऊतरावी लागली.फडताळला श्वास न रोखता १ फूटही ऊतरणे अवघड!कसाबसा हा पँचही ऊतरलो.



ईथून पुन्हा नाळेत प्रवेश झाला.मग थोडा सह्यकर ऊतार म्हणजे आधार असणारा!






 काही अंतर पार केले आणि मग बघतो तर पोटे मामा दिसेनात. थोड पुढे झालो तर १००/१५० फूटाचा धबधबा! त्याच्या डाव्या बाजूला खाली २००/२५० फुटावर मामा एक टेकाड बघून वर बसलेले.



त्यांना विचारले मामा कुठून ऊतरायचे ? हे काय या अस तिरप तिरप! ८०/८५ अंशाच्या कोनात कुठलाही होल्ड नसणारा आणि ऊजवी कडे घसरलो तर सरळ ३०० फूट दगडांच्या नाळीत! घाम फुटला होताच, आता ठोके बंद पडतात अस वाटायला लागल.




फक्त म्हातारा समोर ऊतरलाय म्हणजे ऊतरता येईल या विश्वासाने एक एक पाऊल सावकाश ऊतरत डावीकडे सरकलो.आता खाली ऊलट होऊन ऊतराव तर सँकच्या वजनाने थोडा झटका बसला तरी विषय संपला आणि सरळ ऊतराव तर पुन्हा मागून सँकचा झटका बसला तरी सरळ खाली.शेवटी सावकाश खाली बसलो.मागे नामदेव दादा होते.बसल्यावर पाय खाली पोहचेनात.२ फूट खाली घसार्याचा ऊतार मग दादांना म्हटल तुम्ही माझी सँक मागून पकडून ठेवा म्हणजे मी घसरणार नाही.कसेबसे हळूहळू पाय टेकले आणि स्थिर झालो.मग पुन्हा १५ /२० फूटावरच्या कातळ ऊतारापर्यंत बसून घसरत सरकलो.मग कठीण दगड आल्यावर जरा हायसे वाटले.गवत माती आणि बारीक खड्यांचा घसारा वरुन एक्सपोजर असे समीकरण मला नेहमी त्रास देणारे वाटते त्यात केचूआची अशा ठिकाणी सुप्रसिद्ध ग्रिफ!(बोट दाबले जाणार नाहीत आणि पायही घसरणार नाहीत अस बनवा रे कोणीतरी एकाच वेळी!)मामांच्या जवळ पोहचून थांबलो पण तेथे ऊभ राहण पण कठीण! सँक ऊतरवली कोपरा बघून ऊभी केली कशीबशी! 



मागच्या लोकांच्या चेहरयावर तेच प्रश्नचिन्ह! मग सुनीलला दोर लावण्याची विनंती केली .त्याने अवघड जागी स्वतः अँकर होत दोर लावला.वरून दगड सरकून सरळ अंगावर येत होते पण सरकायला पण जागा नाही. कसे बसे सर्व खाली आले.अपघात होण्याची दाट शक्यता असणारी ही जागा! पण यात जवळजवळ २ तास गेले.परत ट्रँव्हर्स घेऊन नाळेत जाण्याचा मार्गही भयंकर! कड्याच्या दगडांचा आधार घेत हळूहळू घसरणारी पावल सांभाळत सर्व नाळेत पोहचले.




मग खाली काही ऊतार ऊतरल्यावर शेवटचा कातळाचा धबधबा तेथेही सांभाळून ऊतरलो.




परत सर्वांच्या सँक दोराने ऊतरवत बाकी लोकही आले.तेथे जेवण ऊरकले.एकंदर दमछाकीने जेवणही जाईना.त्यात पुढे आलेले भिडू एवढा वेळ लागला म्हणून आवाज देऊन थकल्यावर एक झोप काढूनही वैतागलेले.पण ट्रेक म्हटला की सर्व जण एकत्र आणि सुरक्षित येण महत्वाच.कोणी घसारयाच्या वाटेला, कोणी ऊंचीला, कोणी तंगडतोडीला घाबरत पण एकमेकांना आधार देत ट्रेक करण हे तुम्हाला एक चांगला ट्रेकर बनवत नाही का? 

 


आता चांगले ३.३० वाजलेले.४ लि पाण्यापैकी २ ते २.३० ली.पाणी संपलेले.त्यामुळे अजून वेळ दवडणे म्हणजे संकटाला निमंत्रण.त्यात खाली वापर नसल्याने कुठलीही पाऊलवाट नाही ना पाण्याचा कुठला झरा.मग रेंगाळलेल्या साथीदारांना थोडी परिस्थितीची जाणीव करुन देत पहिले लक्ष्य म्हणजे जंगलातून बाहेर पडणे हे पटवून दिले.नाहीतर तुमचे पाणी संपले तर ते या ठिकाणी आणणे शक्य नाही याची ही जाणीव करुन दिली.मग मात्र चालू झाली तंगडतोड.आपली ईच्छाशक्ती जागवत सर्व एकसाथ चालू लागलो.





पूर्ण डोंगराला वळसा घालून वरच्या धारेने पणदेरेची वाट सोडून दापोलीकडे निघालो.



शेवटी दापोली नजरेस पडल्यावर थोडे विसावलो.



भयंकर जळालेल्या आणि ८० अंशाच्या घसरड्या ऊतारावरून आग्या नाळीकडे जाणाऱ्या ओढ्यात ऊतरलो तेव्हा सूर्य मावळला होता.



आणखी काही मिनीटात दापोलीत पोहचलो.मंदिरासमोरच्या घरात पसारा टाकून विहीरीवर स्नान केले.पोटभर जेवण केले आणि झोपलो.फणशी चा आग्रह सोडून तुलनेने सोप्या अशा सिंगापूर नाळीतून सकाळी सिंगापूरला वर येत परत विहीरीवर स्नान करत एकलगाव गाठले.गाड्यात सर्व सामावल्यावर वेल्ह्यात हाँटेल स्वप्नीलमध्ये जेवणावर तुटून पडलो आणि नसरापूर मार्गे पुण्यात ६ वाजता परतलो.



आजपर्यंत केलेल्या सर्व घाटवाटांमधील सर्वात अवघड श्रेणीतील एक घाटवाट हि फडताळची ओळख कायम मनावर अधिराज्य गाजवेल.ट्रेक करत असताना अशा वाटा करण्याचे स्वप्न प्रत्येकाने बघावे पण ते प्रत्यक्षात आणताना आपली मानसिक, शारीरिक क्षमता आपण ओलांडत नाही ना ह्याचाही विचार करावा.सक्षम साथीदार, टेक्नीकल सपोर्ट, पाणी पुरवून जास्तीत जास्त चाल करण्याची क्षमता, योग्य माहिती, स्थानिक वाटाड्या आणि नशीबावरचा भरोसाही यासाठी आवश्यक आहे.तर मित्रांनो फडताळचे स्वप्न जरूर बघा आणि ते प्रत्यक्षात ऊतरवताना मला आलेल्या अनुभवाचीही ठळक जाणीव ठेवा हि विनंती.काही देण्यायोग्य माहिती सक्षम लोकांना देण्यास मला आनंद वाटेल.धन्यवाद!

भेटू परत अशाच अनवट भटकंतीसह!

सह्याद्री हे जैववैविध्याने नटलेले पर्यावरण स्थळ असून आपण ते जपले पाहिजे.






दिनांक : २७/२८ मे

घाटवाट : फडताळ
माथ्याचे गाव : एकलगाव
कोकणातले गाव : पणदेरे आणि दापोली.
योग्य वेळ : नोव्हेंबर, डिसेंबर
श्रेणी : अवघड ( दुर्गम, पाण्याचा अभाव, ठिसूळ दगड, भयंकर ऊतार आणि त्याचा खुलेपणा, जंगलात नसलेली पाऊलवाट)

साथीदार : मिलिंद कुलकर्णी, एन डी गवारे, सुजाता रायगडे, देवा घाणेकर, सुनील पाटील, विराग रोकडे, क्रांतीवीर, प्रशांत कोठावदे आणि तुषार कोठावदे.





Thursday, 1 June 2017

जावळीचे रत्न - कोळेश्वर!




           मे महिन्याच्या मध्यावर पाण्याचे बहुसंख्य स्रोत आटलेले असताना आणि तळपत्या आग ओकणारया सूर्याच्या धास्तीने बहुसंख्य सह्याद्रीत भटकणाऱ्या आमच्यासारख्या भटक्यांना सवंगडी मिळणे जिथे दुरापस्त तिथे एक दोन नव्हे १४ हौशी लोक जमा होणे यासारखे आश्चर्य नाही.पण सातत्याने नवीन वाटा पालथ्या घालताना असे साथीदार आता विश्वासाने जमा होऊ लागलेत.अनुभवी काही नवीन पण ऊत्साही सह्यमित्रांना घेऊन यावेळी भटकंती ठरली ती वाईपासून ३८ कि मी आत असणारया जोर या गावाला मध्यवर्ती ठेवून त्याच्या ऊत्तरेला पसरलेले कोळेश्वर पठार आणि दुसरया दिवशी बहिरीच्या घुमटीवरून आँर्थर सीट ( मढीमहल) चढून क्षेत्र महाबळेश्वरच्या मागून जोरला ऊतरणारया गणेश घाटातून जोर परत असा वर्तुळाकार ( loop ) ट्रेल! विनीत दातेंनी नियोजनाची पूर्ण जबाबदारी ऊचलली, वाटाड्या ठरवून जेवणाची सोय करण्यापर्यंत!


शुक्रवारी रात्री १०.३० ला पुण्यातून निघून वाई नंतर बलकवडी धरणाच्या कडेने धोम धरणाच्या मागे असणाऱ्या जोरला रस्ता शोधत पोहचलो तेव्हा २.३० वाजलेले.महादेव मामा हे स्थानिक वाटाडे एवढ्या रात्री जोरच्या सीमेवर आमचे स्वागत करायला आले आणि त्यांनी कुंभळजाईच्या कौलारू मंदिरात झोपण्याची सोय लावून दिली. काही क्षणातच ऊद्याच्या आव्हानाचा विचार करत सर्वांच्या स्वारया गुडूप झाल्या.



पहाटे ५.४५ ला सर्वांना जागे करुन सकाळची आन्हिके ऊरकत मस्त गरमागरम पोहे आणि चहा घेऊन महादेव मामा आणि बाळू मामा ह्या वाटाड्यांच्या द्वयी समवेत १४ भिडू ऊंच आणि लांबलचक पसरलेल्या कोळेश्वर च्या पठारास भिडले.वाट तशी वनराजीने नटलेली पण छातीवर चढणारी. 




हळूहळू ऊगवतीच्या प्रकाशासह पहिल्या दोन टप्प्यात वर जाताना चांगली दमछाक होत होती.वाट तशी सोपी , कालच पडून गेलेल्या वळवाच्या पावसान रान भिजल होत त्यामुळे घसारा कमी जाणवणारा! 



साधारण तासभर चढाईनंतर वर पठारावरच्या घनगर्द जंगलात पोहचलो.हवा आल्हाददायक होती.कोळेश्वरची ऊंची जवळपास रायरेश्वर आणि महाबळेश्वर एवढीच!



आता आम्ही ठरवलेला बेत सुरुवातीला कोळेश्वराचे दर्शन घेऊन मग पश्चिम टोक गाठायचे आणि परत येताना पूर्व टोक पाहून खाली ऊतरायचे.पण बाळूमामा आमचा बेत शांतपणे ऐकून घेत म्हटले की आता आपण पूर्व टोकाच्या जवळ आहोत तर दर्शन घेऊन ते पाहून घ्या नंतर पश्चिम टोकाकडे जाऊ आणि वाटेत पाण्याच्या ठिकाणी जेवण ऊरकू.स्थानिक वाटाड्या ह्या दरयाखोरयात वाढलेला त्याच्या अंगाखांद्यावर खेळलेला त्यामुळे काही अपवाद वगळता त्याचा शब्द शक्यतो मोडू नये असा अनुभव गाठीशी असल्याने त्यांचा प्रस्ताव आनंदाने स्विकारला.येथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावी वाटते आपली शारीरिक क्षमता आणि अनुभव कितीही असूदे  पण  कायम आपल्याबरोबरचा सर्वात कमी क्षमतेच्या माणसाला बरोबर घेऊन सुरक्षित भटकंती करताना स्थानिक माणसाचे म्हणणे नक्की ऐकायला हवे.असो.


पूर्व क्षितीजावर केंजळगड आणि दूरवर कमळगड ऊजवीकडे म्हणजे दक्षिणेकडे पाचगणीपासून आँर्थरसीटपर्यंत पसरलेले महाबळेश्वर चे पठार आणि ऊत्तरेला अफाट रायरेश्वर! अशा संगतीने घनगर्द जंगलातून कोळेश्वर चे मंदीर हसतखेळत अर्ध्या तासात गाठले.



तिथे कोळेश्वर चे दर्शन घेत थोडा अल्पोपहार ऊरकला.तेवढ्यात जांभळाच्या झाडावर नजर गेली.आकाराने छोटी पण सुमधूर जांभळांनी सर्वांना बालपणाचे दिवस आठवले आणि जीभ ओठ रंगेपर्यंत ह्या रानमेव्याचा आस्वाद सगळ्यांनी घेतला.तेथून अगदी थोड्या म्हणजे २० मिनीटात आम्ही पूर्वेच्या टोकाजवळ असणाऱ्या आणि कोळेश्वर वर असणाऱ्या एकमेव मानवी वस्तीजवळ (तीही दोन घरांची) पोहचलो.



थोड पुढ जाताच धोमचा जलाशय मागे कमळगड ,एल्फिन्स्टन पाँईंट, रायरेश्वरची जांभळी कडची बाजू असा नयनरम्य नजारा पटलावर ऊभा ठाकला.




किती पहावे आणि किती छायाचित्र बद्ध करावे? तिथूनच खाली जांभळीला कोळेश्वराशी जोडणारे कोळीयाचे दार ही सुंदर वाट ऊतरते.


बराच वेळ झाला मग ऊरलेल्या ट्रेकचा अंदाज बघून जड पावलाने पश्चिम टोकाकडे निघालो. धनगरांच्या घराजवळ एक पाण्याचा झरा असून त्याला मे महिन्यात ही पाणी असते.


आता वाट रायरेश्वर च्या बाजूने कधी मोकळी तर कधी जंगलान वेढलेली.साधारण १ च्या सुमारास पाण्याचा दुसरा झरा लागला आणि आम्ही वनभोजनास विसावलो.


एकमेकांना घरचा डबा शेअर करत निवांत भोजन ऊरकले.जरा पोट जास्तच भरले म्हणून सगळे तिथेच जागा पाहून वामकुक्षीसाठी पसरले.( एवढे श्रम करूनही ट्रेक करताना वजन वाढतेय त्याला बहुतेक हेही कारण असावे).


आकाशात ढग जमा व्हायला लागले आणि मग आवरते घेतले.आता २.३० वाजलेले.सगळे बरयापैकी वेगाने पश्चिमेकडे सुटले.



तरीही वाटेत संधी मिळताच शिंदीच्या मधुर रानमेव्याचा मोह काही सुटला नाही.


 सर्व भिडू दमदार असल्याने आणि सर्व प्रकारची तयारी असल्याने अशा विरंगुळ्याची फारशी चिंता नव्हती.थोड पुढ गेल्यावर बाळूमामांनी आमचे लक्ष डावीकडे टेकडीकडे वेधले.ब्रिटीश काळापर्यंत येथे लोखंडाची खाण होती आणि धावड लोकांची वस्ती होती ही महत्वपूर्ण माहिती त्यांनी दिली.परत जाताना वस्तीचे अवशेष आणि खाणीचे अवशेषही निरखले.पूर्वी धातू मिळवण्यासाठी असणाऱ्या ह्या खाणी दुर्मिळ अवशेषांसारख्या आणि आपल्या पूर्वजांच्या पुढारलेल्या बुद्धिमत्तेची साक्ष देणारया !


४.३० च्या आसपास पठाराचे पश्चिम टोक गाठले आणि समोरचे रौद्र तितकेच मंत्रमुग्ध करणारे सह्याद्रीचे रूप पाहून विस्मयचकित होत सारे स्तब्ध झाले.कुठल्याही शब्दात किंवा छायाचित्रात ते ऊतरवण्याची क्षमता माणसात नाही.एवढा ऊपद्व्याप करून ईथपर्यंत पोहचल्याचे सार्थक झाले.समोर रायरेश्वर आणि त्याचे नाखिंद टोक, कामथे घाट, जननीचा डोंगर किंवा मोहनगड, कांगोरीगड ऊर्फ मंगळगड, महादेव मुर्हा, चंद्रगड आणि ढवळे खोरे क्षितीजापर्यंत पसरलेल्या अजस्र सह्याद्रीसमोर पुन्हा पुन्हा नतमस्तक व्हावे असे हे सर्व काही! कितीतरी क्षण स्वत:ला विसरून आम्ही त्या नजारयाला आत ह्रदयाच्या कुपीत जतन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो.पण पावसाची शक्यता असल्याने महादेव मामांनी भानावर आणले आणि अनिच्छेने परत निघालो.




आता जोरच्या बाजूला तासभर चालत एका नवीन पण थेट कुंभळजाई मंदिराच्या शेजारी ऊतरणारया अवघड घसारयाच्या वाटेवर आलो.अतिशय काळजीपूर्वक ऊतरत एकदाचे कठीण आणि विनाआधार दरीला खेटून ऊतरणारया टप्प्याला ओलांडत खालच्या दांडाला लागलो.



वाईच्या बाजूने पाऊस कोळेश्वर पठारावर पोहचत होता आणि आम्ही त्याला हुलकावणी देत त्याने गाठायच्या आत मंदिर गाठले.

कोळेश्वरची आजची सफर माझ्या सर्वोत्तम भटकंत्यापैकी एक म्हणून कायम लक्षात राहील.जोरपासूनच्या दोन वाटा, पुर्व ते पश्चिम पूर्ण पठाराची चाल, वरचे घनगर्द कमी हस्तक्षेप असणार रान, मे महिन्यात पाझरणारे झरे, पूर्व आणि पश्चिम टोकावरून दिसणारा सह्याद्रीचा नजारा हे सर्व एका दिवसात खात्यावर जमा झाले.या आनंदात मस्त भोजन करुन आणि ऊद्याच्या बहिरी, आँर्थर, गणेश घाट या अजून एका जबरदस्त पायपीटीची स्वप्ने बघत झोपी गेलो!

धन्यवाद!

साथीदार : 



सह्याद्री हे जैववैविध्याने नटलेले पर्यावरण स्थळ असून आपण ते जपले पाहिजे .