Wednesday 1 April 2020

नांगरदरा : मोरोशीच्या भैरवाचे तिसरे नेत्र

"The choices we make lead up to actual experiences. It is one thing to decide to climb a mountain. It is quite another to be on top of it. "

Herbert A. Simon

समोर हिरव्यागार झाडांनी वेढलेली फारसा मानवी हस्तक्षेप दिसत नसलेली दरी बघून माझ्या तोंडून आपसूक शब्द फुटले "स्वर्गाचे दार"! हो "Door to Heaven" !! बाजूला उभ्या असलेल्या परमभैयाच्या चेहरयावरचे भावही हेच होते.

दौंड्या पर्वताच्या खिंडीत पोहोचताना दुपारचे दोन वाजलेले, अजून काही सवंगडी खाली कड्यापाशी चढाईच्या प्रतिक्षेत होते!शेवटचा ३० फूटाचा कातळ दोराच्या सहाय्याने चढून इतर लोक वर येईपर्यंत मी खाली झाडाखाली विसावलो आणि काल सकाळी ७.३० ला मोरोशीहून सुरु झालेली ही चढाई आता संपली आहे या अवर्णनीय आनंदाने दोनचार घोट पाणी पित पाठपिशवी ला टेकत इतरांची वाट बघू लागलो.खरतर अजून अंजनावळेपर्यंत पोहचायला ४/५ तास लागणार होते पण ती चाल आपण कालपासून जे अनुभवतोय त्यामानाने किरकोळ आहे याची मला खात्री होती.

नाशिक पुणे सह्यमित्रमंडळाच्या यादीत आज गिर्यारोहण क्षेत्रातील दिग्गज हिरा पंडीत काका आणि दिलीप झुंजारराव सर यांच्या सोबतीने एका अतिशय अवघड आणि अशक्य चढाईची "नांगरदरा"वाट सुरक्षित जमा झाली होती.नानांच्या आग्रहाखातर ऐनवेळी तयारी करुन येताना हा मार्ग किती कठीण आहे याची जाणीव आमचे सह्यसवंगडी दिलीपभाऊ वाटवे यांनी टाकलेलया एका चित्रफिती वरुन आली होतीच पण ज्याचा विचार केला होता त्यापेक्षाही कस बघणारी ही चढाई होती.

रात्री उशिरा नाशिक, पुणे, मुंबई येथून सर्व जण मोरोशीच्या भैरवनाथ ढाब्यावर जमले.सकाळी उठून आवरून खराब होऊ नये म्हणून ताजी पाणी न टाकता बनवलेली मटकी ऊसळ मनूकडून पार्सल घेतली, बाकी चपाती, दशमी आणि इतर खाण्यापिण्याच्या गोष्टी सोबत होत्याच पण मुख्यत: प्रत्येकी ४ लिटर  पाणी जे भैरवगडाच्या टाक्यावर परत भरून घ्यायचे ठरले तेही होते.

सुरक्षा साधने म्हणजे स्क्रूगेट, हेल्मेट, स्लींग, दोर, मेखा सर्व होत्या.हिरा काका, दिलीपसर यासोबत संजयभाऊ शेळके आणि श्रीकांत पाटील हे आमचे दोघे तांत्रिक गिर्यारोहक मदतीला! हेडटाँर्च, स्लिपींग बँग इ.महत्वाच्या गोष्टी पण सोबत आवर्जुन घेतलेल्या! थोडक्यात सर्व तयारीनिशी आणि योग्य मार्गदर्शनाखाली आम्ही हे साहस करणार होतो.ऐनवेळी येणाऱ्या अडचणी ला तोंड द्यायलाही या सर्व बारीक सारीक गोष्टीसह आमच्या प्रत्येकाची तयारी होती.

मोरोशीच्या कमानीतून भैरवगडाच्या पायथ्याशी जाणारी वाट तशी रूळलेली कारण प्रत्येक गिर्यारोहकाला आपण मोरोशीच्या भैरवगडाच्या पायरया चढून आणि उतरुन आल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही याची जाणीव असते.

हळूहळू वर जाताना सकाळ च्या रम्य वातावरणात मजा येत होती.आज नानांच्या शब्दाखातर ज्यांनी महाराष्ट्रात गिर्यारोहण क्षेत्रातील कातळरोहणाची चळवळ चालू केली असे हिराकाका आणि दिलीपसर असल्याचे वेगळेच अप्रूप होते.नानाच्या सर्वसमावेशक वृत्तीने आजपर्यंत अनेक थोरामोठ्यांचा सहवास लाभला आहे हे नक्की नमूद करावे असे.एका टप्प्यावर सकाळच्या सोनेरी रंगात उजवीकडे गेलेली सोंड काही जण वाकडी वाट करून पाहून आले नव्हे छायाचित्रे काढण्यासाठी मुद्दाम गेले. दरम्यान उजवीकडे भोरांड्या च्या दाराच्या दिशेने कसे जाणार याविषयी गुरुवर्यांची चाललेली चर्चा समजून घेण्याचा मी प्रयत्न करत होतो.

भैरवगडाच्या कातळचढाई मोहिमांसाठी मुक्काम करण्याची जागा काही वेळात आली.सकाळच्या थंड वातावरणात तिथली हिरवीगार दाट झाडी अतिशय सुखद होती.त्यानंतर सरळ भैरवगडाच्या कातळभिंती कडे जाणारी ६० अंशाची चढाई करत आम्ही भैरवच्या दक्षिणेकडे म्हणजे मोरोशीच्या दिशेने असलेल्या कातळातील थंडगार खांबटाक्याच्या पाशी विसावा घेतला.छान गप्पा गोष्टी करत वर जाऊन टाक बघून पोटभर पाणी प्यालो आणि सगळ्यांनी सर्व पाण्याचा साठा १००% भरुन घेतला.आता पाणी थेट दौंड्याच्या खिंडीतून खाली उतरल्यावर मिळणार होते.

टाक्यापासून पूर्वेस जाऊन भैरवगडाच्या मागच्या भिंतीपाशी जिथून सुप्रसिद्ध कातळातल्या अवघड पायरया आहेत तिथ जायला निघालो. ती चढाई पण तशी नवख्या माणसाला कठीणतेची कल्पना देणारीच आहे.अगदी २० मिनिटात आम्ही बरोबर पायरयांच्या खाली असणाऱ्या खिंडीत पोहचलो.तिथे एक ग्रुपफोटो नानांनी घेतला आणि तिथून दौंड्याची खिंड बघत असताना सरळ घसारा चढ बघून खरया आव्हानाची जाणीव सर्वांना झाली. पायरया, खोबण्या आहेत म्हणजे वाट आहे ही एकच दिलासा देणारी नोंद असल्याशिवाय या ठिकाणी चढाई करायला कोणी धजवणार नाही. असो.

वेळ शनिवार सकाळी ९ ची.एक घसारयाचा चढ चढून आम्हा सर्वांना एका जागी थांबवून हिराकाका आणि दिलीपसर पुढे वाट बघायला निघाले आणि आम्ही भैरवच्या पायरया कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय चढणाऱ्या ५/६ मुलांची गंमत बघत थांबलो.गुहेपासून वर त्यांना चढताना पाहून न राहवून मी चार गोष्टी सुनावल्या पण तरीही दोन आगाऊ कार्टी वर गेलीच.मात्र बाकी घाबरून थांबले.१५/२० मिनिटात वरुन दोर लावल्याचा आवाज दिलीप सरांनी दिला आणि कसेबसे दोराच्या खाली पोहचलो.इथून डावीकडे भयंकर दरी आणि उजवीकडे ८० अंशाची चढाई चालू झाली ती अजून भयप्रद उंची गाठत दौंड्याच्या खिंडीपर्यंत कायम राहिली.



एक एक जण दोर पकडून वर १५० फूट चढला आणि खालची जागा लय भारी होती अस वाटायला लागले.अगदी कातळाला पाठ चिकटून समोर ७००/८०० फूट खोल दरी असे सगळे उभे राहिले काही बसले.सर्व वर आले आणि दिलीप सरांनी दोर कमरेला गाठ मारत गुंडाळून तशा खतरनाक वाटेवरून परत डावीकडे समांतर वाटचाल चालू केली.परत ते आमच्या नजरेआड! मग दोराच्यालांबीचा अंदाज घेत परत बोल्डरला अँकर करून आवाज दिला.जीव मुठीत घेऊन आणि दोर पकडत परत आम्ही अँकरपर्यंत पोहचलो.


ईथे पहिल्या ७/८ पायरया दिसल्या आणि वाट बरोबर असल्याची खात्री पटली.पण पायरया म्हणजे एखाद्या मुलाला दिवसभर घरात डांबून ठेवायचे आणि एखादे चाँकलेटचे आमिष दाखवायचे इतकेच नुसता दिलासा देण्यापुरत्या!
मात्र आता अंगावर असणारा छोट्या नाळीसारख्या जागेतून वर जाणारा कातळ! खाली न बघता वर पकड घेत सावकाश वर चढलो आणि मग परत तिरपी वर चढणारी घसारयाची वाट! 


कुठं बुड टेकायच समाधान या वाटेत असण्याची शक्यता संपुष्टात येत होती.एकदा चक्रव्यूहात घुसलो की एकामागून एक अवघड कोडी आणि त्यातून मागे येण्याचा दरवाजा बंद!

आता मात्र सहनशीलता तपासणी चालू झाली होती.डावीकडून डोळे फिरवणारी दरी उजवीकडे तसाच उंच ७० अंशाचा घसारा, ना कारवी, ना कातळ ना झाडं! बरं एका जागी पुढची व्यवस्था होईपर्यंत थांबावे तर पायाखालची भुसभुशीत माती दरी कडे घसरायची, पकडायला काही नाही. काठी गाडायची आणि बर्फात क्रँपाँनने करतो तशी डोंगराकडच्या बाजूची माती उकरायची बुटानं आणि स्थिर व्हायचं!

इथे आता एक गडबड झाली. समोर वाट अजून अवघड घसारायुक्त असल्याने आणि दोर बांधायला जागा नसल्याने हिरा सरांना वाटले की वर कातळकड्यापर्यंत जाऊन ट्रँव्हर्स मारावा.दिलीप सर मात्र सरळ गेले.मग संजय शेळकेने दोर कमरेला गुंडाळत वर कड्याकडे चढाई चालू केली.तो कसाबसा एका अवघड जागी पोहचला जो की खालून आम्हाला दिसेना.मग मोठ्या मुश्किलीने एका जागी दगडाला पाय रोवून बसत आम्हाला वर येण्यासाठी दोर पकडून यायला त्याने सांगितले. मग एक वर जाईपर्यंत दुसरा खाली अस करत एक एक जण वर चढाई करु लागला.दोर हा संजयला अँकर असल्याने त्यावर फार भार द्यायचा नाही. फक्त आधारापुरता धरायचा आणि बाकी फ्री क्लाईंब! 


त्यात सगळे वेगवेगळ्या टप्प्यात आणि हिरासर वर जाऊन बघतात तर तिथून जाणे शक्य नाही. मग परत आहे त्या ठिकाणी परत यायची जी कसरत झाली ती तुम्ही विचारू नये आणि आम्ही सांगू नये अशी.७० ते ८० अंशाची उतराई तीही फक्त आम्हाला दोरावर लोंबकळत करण्याची सुविधा आणि दोर गुंडाळून संजय आणि हिरासर कसे उतरले असतील ही त्यांनाच कल्पना! मात्र या भानगडीत दुपारचे ३ वाजले.म्हणजे ६ तासात आम्ही फक्त दोन टप्पे चढून आणि एका अवघड घसारयावर! परत जायचे म्हटले तर तिरप परत कस उतरणार कारण अँकरींगला जागा नाही आणि दरी ९०० ते १००० फूट सरळ घसारयाची.कातळ, नाळ, झाड काही नाही! मग दोघं खाली आल्यावर त्यांच्यामागे दिलीपसर ज्या बाजूने गेले तिकडून चालू लागलो.एकामागे एक! बोलती बंद! 

माझ्यासमोर विजय त्यामागे नाना आणि त्यामागे डॉ. गायकवाड! आता डॉ चे वजन ८७ किलो! खालचे गवत त्यांचे वजन घेण्याचे कबूल करेना आणि पुढ माग व्हायची संधी नाही. कसबस त्यांना माझी कल्पना सांगत डोंगराकडचा भाग बूट घासून माती उकरुन जागा करत उभ राहण्याचा प्रयत्न करणच आमच्या हाती.बर पुढ दोर लावण्यासाठी जागा बघायला गेलेले मागे येऊ शकत नव्हते.मग सावकाश आम्ही एकमेकांना धीर देत पुढे सरकू लागलो.बर त्यातही वाट कधी खाली उतरायची तर कधी वर चढायची.आता वर चढायचे जेमतेम पाऊल बसेल अशा घसारयावर तर पाठपिशवी सह शरीर ओढणे अजून अवघड! मला स्वतः पेक्षा समोरच्यांचे प्रयत्न बघून त्यांचीच भिती वाटायची! परत थांबून आपल्याला तेच करायचं आहे हा नकळत तणाव! खालून सुरु केल्यापासून आतापर्यंत एकदाही बूड टेकून काही करता आले नव्हते आणि अजून काही तस होण्याची संधी ही नव्हती.मी पाणपिशवी घेऊन त्याची नळी समोर अडकवल्याने अधूनमधून पाण्याचे दोन घोट घेऊ शकत होतो नाही तर पाण्याची बाटली काढणे आणि परत ठेवणे ही कसरत पण मागच्या भिडूच्या मदतीने! 

काही अंतर गेल्यावर समोर अशक्य असा वक्राकार ट्रँव्हर्स आणि समोर एक झाडं! त्या झाडाला दोर बांधून एकीकडे संजय उभा.एकेकाने देवाचे नाव घेत झाड गाठले आणि संजय मागून रोप गुंडाळत आला.इथे वरून दूरून दिलीपसरांचा आवाज आला.या वाटेची गंमत म्हणजे प्रत्येक टप्पा १०० फूटांच्या पलिकडे नजरेआड! म्हणजे दोर घेऊन गेलेला माणूस काय करतो हे त्याने जागा शोधून दोर बांधेपर्यंत दिसायचे नाही आणि ईकडे काही तरी करुन पुढे गेलो तर कुठतरी विसावता येईल ही "भाबडी"आशा!सारखा आवाज द्यायचा आणि समोरचा कधी ये म्हणतो याची वाट बघायची.वेळ संध्याकाळी ६! 


आता उरलेली न दिसणारी वाट बघता आपण आज याबाहेर पडणार नाही हे नक्कीच याची खात्री पटलेली! फक्त नाळीत पोहचलो तर सुरक्षित जागी मुक्काम करता येईल  एवढीच समाधानकारक बाब आणि उद्दिष्ट! पाणी आणि खाण्याचे भरपूर असल्याने बाकी चिंता नव्हती.हेड टाँर्च प्रत्येकाने आता तयार केल्या आणि डोक्याला लावल्या.

परत एक कातळ चढत हिरासर वर गेले आणि आम्ही कसरत करत त्यांच्या मागे दोर धरून! वर परत घसारा पण काही कारवीचा आधार पहिल्यांदा मिळाला. आता डावीकडे नाळ आमच्या नजरेच्या टप्प्यात आली आणि दिलीप सर जे सकाळपासून गायब होते ते समोर दिसले.ते म्हटले अरे मी बँग वर पायरया पाशी ठेवून आलोय चला.आता उजवीकडे नाळ चालू झाली. सुरुवातीला काही १०० /२०० फूट बरी जागा आणि कमी उतार पण परत सरळसोट उभा कडा आणि नाळेतून वर जाता येणार नाही तर डावीकडे कड्याच्या बाजूने चढावे लागेल म्हणून परत दोर वर जाऊन लावला.तोपर्यंत आम्ही थोडावेळ बसून काही संत्री खाल्ल्या! सकाळपासून अन्नाचा कण नाही. डबे तसेच पाठपिशवीत! पण आता ७ वाजलेले! अंधार पडलेला.आता पुढ काय वाढून ठेवलेय याची कल्पना पुरेशी नव्हती!

भाग १ समाप्त!

धन्यवाद!




6 comments:

  1. थरारक!
    फक्त माझे वजन कमी करा थोडे😂
    80किलो

    ReplyDelete
  2. खरेच थरारक, तुषार! छान लेखन! फोटोज पाहूनच वाटेच्या भयानकतेची कल्पना येते. प्रत्यक्ष अनुभव तर त्याहून खतरनाक! रोमांच उभे करणारी थरारक अशीच ही वाट! हिरडीचा दरा उतरताना आमची अशीच पंचाईत झालेली! पण वर्णन पाहता ही वाट निश्चितच भयानक! दुसऱ्या भागासाठी तर उत्कंठा ताणली गेली आहेच; लवकर येऊ दे, तुषार!

    ReplyDelete
  3. मस्तच तुषार दादा.
    बाकी एक शालजोडीतला मारलाच का सगळ्यांना?

    मोरोशीच्या कमानीतून भैरवगडाच्या पायथ्याशी जाणारी वाट तशी रूळलेली कारण प्रत्येक गिर्यारोहकाला आपण मोरोशीच्या भैरवगडाच्या पायरया चढून आणि उतरुन आल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही याची जाणीव असते.

    ReplyDelete
  4. थरारक अनुभव ��
    निसर्ग सौंदर्य मस्तच
    फोटोग्राफी सुपर्ब ��

    ReplyDelete